बोधकथा

Wednesday, 14 May 2025

ऑपरेशन सिंदूर विरुद्ध 2.5 फ्रंट

 

दिनांक 8 जून 2017 रोजी आपल्या एका मुलाखतीत तत्कालीन भारतीय आर्मीचे प्रमुख आणि माजी CDS जनरल बिपिन रावत यांचे वाक्य आज आठवले...     

 Indian Army is fully prepared for a simultaneous multi-front war on both external and internal fronts ”

“Indian Army is fully ready for a two and a half front war ”

साभार -  The Hindu

वरील वाक्याचा सोप्या मराठी भाषेत अर्थ म्हणजे, भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर भारताला भारताला एकाचवेळी बाहेरील दोन आघाड्या आणि भारतातील  0.5 आघाडी यासोबत लढा द्यावा लागेल...

बाहेरील दोन आघाड्या कोणत्या असतील हे सांगायला कुण्या जाणकारांची गरज नाही पण अंतर्गत 0.5 आघाडी म्हणजे काय ? आणि कोण ? परत ह्या आघाडीत हेतुपुरस्सर भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारे आणि अजाणतेपणी राजकीय द्वेषाने पछाडलेले आपल्याच सैन्याला कोंडीत पकडू बघत असतात....हा लेख म्हणजे त्याचाच एक आढावा...

            22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील आणि मानवी सभ्यतेचा लाज आणणारा दिवस.पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन घाटीत पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. ह्या नृशंस मानवी हत्याकांडात 26 नागरिक मृत आणि 20 नागरिक जखमी झाले. ही पद्धत हमास ही आतंकवादी संघटना वापरते. ही घटना एका क्रूर मानसिकतेचा ताजा पुरावा आहे. आतंकवाद्यांनी आता त्यांची  रणनिती बदलली आहे. मोठे कट रचून ते वास्तवात आणण्यास खूप अडचणी असतात याउलट जम्मू काश्मिर मध्ये पर्यटनास येणारे पर्यटक आणि भाविक यांच्यावर हल्ला करणे फार सोपे असते. म्हणूनच मागील काही काळात असे हल्ले होण्याचे प्रमाण आणि निष्पाप नागरिक मृत्युमुखी वाढण्याचे प्रमाण वाढले होते. पहलगाम हल्ला हा योजनाबद्ध सुनियोजित हल्ला होता यात शंकाच नव्हती....पण कुठलाही आतंकवादी हल्ला हा जसा प्रत्यक्ष आतंकवादी घडवून आणतात तसाच त्यांना पडद्यामागून मदतीचा हात असतो...आणि हळूहळू हे सिद्ध होत आहे...

ही घटना भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि संपूर्ण भारताच्या अखंडतेला आणि एकतेला एक आव्हान होते. अशातच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबिया या देशाचा शासकीय दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले तिकडे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी  प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री, केंद्रीय सुरक्षा समिती आणि सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन परिस्थिती आणि त्या परिस्थितीची दाहकता समजून घेतली.ह्या नृशंस हत्याकांडाचा भारत बदला घेणार याची कल्पना संपूर्ण जगाला आली होती. प्रधानमंत्री मोदी यांनी 24 एप्रिल 2025 रोजी बिहार येथे एका जनसभेला उद्देशून भाषण करताना सरळ सरळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखविला....आणि हा बदला कल्पनेपेक्षा भयंकर असेल असेही त्यांनी भर सभेत जगाला आणि पाकिस्तानला उद्देशून सांगितले....यावेळी श्री मोदी यांची देहबोली आणि आवाज एक वेगळीच धार होती. मुख्य म्हणजे जगातील कोणताच राष्ट्रप्रमुख अशी भाषा जाहीरपणे वापरत नाही म्हणून मोदींच्या या जनसभेत दिलेल्या या गंभीर संदेशाला एक असाधारण महत्त्व प्राप्त झाले. हे भाषण संपते न संपते तेच 0.5 फ्रंटवाले समोर आलेत आणि त्यांनी तोच आपला आलाप सुरू केला आणि  तो एक “ सरहदो पे गोलिया चल रही है... वाला टुकार शेर समोर केला..मुळात इतक्यात बिहार राज्यात निवडणुका नाहीत....आणि दुसरे म्हणजे गोळीबार सरहद्दीवर नव्हता झाला तर देशांतर्गत झाला होता हे या फ्रंटवाल्यांचा ध्यानात असते...पण त्यांना मुद्दे भटकवायचे असतात...

भारत दहशतवाद आणि दहशतवादाला पोषण देणाऱ्या देशाला धडा शिकवणार हे आता स्पष्ट झाले. अशातच भारताने एकतर्फी सिंधू जलकारार रद्द करण्याची घोषणा करून भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.... १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष आणि फील्ड मार्शल अयुब खान यांच्यात हा करार झाला होता. २३ एप्रिल २०२५ रोजी, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी २०२५ च्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. हा पाकच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा आघात होता...राष्ट्रीय हित लक्षात घेता एका रणनिती अंतर्गत घेतलेला हा निर्णय होता.पण आपल्याच देशातील काही 0.5 फ्रंट वाल्यांना हा निर्णय अमानवीय वाटला आणि अपशकून करायला ते समोर आले....भारत पाकवर हल्ला कधी करणार असे प्रश्न ते जाहीरपणे विचारू लागलेत...प्रश्न विचारणे हा जनतेचा हक्क आहे पण त्याची उत्तरे कृतीतून दिली जातात हे ह्याच्या गावीही नसते. तारीख आणि वेळ सांगायला ती काही लग्नाची आमंत्रण पत्रिका नाही...

अशातच भारताने तिन्ही सैन्यदल यांचा समन्वय साधून ऑपरेशन सिंदूर मोहिमेची आखणी केली...पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करणे हा या ऑपरेशन चा मुख्य हेतू होता..त्याप्रमाणे भारतीय हवाई दलाने आपल्याच हद्दीतून पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणावर अतिशय उच्च दर्जाचे कसब आणि तंत्रज्ञान उपयोगात आणत ताबडतोब हल्ला चढविला. हा हल्ला बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा वेगळा होता...कारण त्यावेळी आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून यशस्वी हवाई हल्ला केला होता. ऑपरेशन सिंदूरने भावी युद्ध कसे असेल त्याची चुणूक जगाला दाखविली. या कारवाईत प्रत्यक्ष जमिनीवर सैनिक (आर्मी ) यांचा सहभाग फार कमी, सजग नौसेना आणि हवाई दलाचा मर्यादित वापर करून आपले भू - राजकीय ईप्सित साध्य करण्याचे कसब भारताने आत्मसात केले आहे हे जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले.अत्याधुनिक त्रिस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा, छोटी व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन व कुशल तंत्रज्ञ यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानात खूप खोलवर मारा केला. यावेळी भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सरळ सरळ पाकिस्तानी हद्दीत त्यांना हवे ते ठिकाण नेस्तनाबूत करत सुटले होते..पाकिस्तानी चायनिज हवाई यंत्रणा सपेशल अपयशी ठरली...याउलट भारतीय हवाई यंत्रणा आणि रशियन  S - 400 यांनी कमाल केली...सर्व पाकिस्तानी हल्ले  अचूक टिपत त्यांना अगोदरच निकामी करण्याचे काम या सर्व यंत्रणांनी चोख बजावले....भारतीय हल्ले आणि बचाव इतका अभेद्य होता की, पाकिस्तानला याचा जबरदस्त सामरिक,आर्थिक आणि मानसिक धक्का दिला...0.5 फ्रंटवाले भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार हे विचारणारे आता, युद्ध नको बुद्ध हवा म्हणून याचना करत होते. अर्थातच जगाला बुद्धाची गरज आहेच...भारताची पण तीच भूमिका आहे. पाकिस्तान या देशाने नेहमीच हिंसेला प्रथम प्राधान्य दिले....आणि स्वरक्षणाचा अधिकार हा निसर्गदत्त आहेच.. देशहितासाठी.या अधिकाराचा वापर करणे ही बाब कायदेशीरच आहे.

भारतीय सैन्यदले पाकिस्तानवर जोरदार हल्ले करून शौर्यगाथा लिहित असताना 0.5 फ्रंटवाले एक नवीन हत्यार उपसत होते की, ज्याची मुले लष्करात नाहीत त्यांनाच युद्ध हवे असते. मग प्रश्न हा उरतो ज्यांची मुले लष्करात असतात त्यांना तरी युद्ध हवे असते काय ? युद्ध हे शेवटचा पर्याय असतो आणि युद्ध जर लादलेले असेल तर ते शर्थीने लढावेच लागते...आणि याआधी तरी जे युद्धे झालीत तेव्हासुद्धा हिच परीस्थिती होती. माजी पंतप्रधान स्व. पंडित नेहरू, स्व. लालबहादुर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा कुठे युद्ध हवे होते....? पण त्यावेळी सुद्धा आपल्या शूर सैनिकांना युद्धात बलिदान द्यावेच लागले...भारतीय सैनिक जे सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना आपल्या देशावर आणि आपले भारतीय सामान्य जनतेवर विश्वास असतो की, माझ्यानंतर हा देश आणि येथील जनता माझ्या परिवाराची काळजी घेईल...ही प्रेरणाच त्याला सर्वोच्च बलिदानास प्रवृत्त करत असते....

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे पूर्णतः मोडले...शेकडो दहशतवादी तर मारले गेलेत पण त्यांच्या मदतीला धावून जाणारा पाकिस्तान संपूर्ण जगासमोर उघडा पडला...कारण भारताने आधीच स्पष्ट केले होते की, कारवाई फक्त दहशतवादी ठिकाणावर होईल.त्यात पाकने प्रतिहल्ला करून संपूर्ण जगाला दाखवून दिले की, आम्ही दहशतवादी समर्थक आहोत. भारताने पाकचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केलेत...त्यात नूर खान,रफीकी,मुरीद,सुक्कुर, सियालकोट,पसरूर,निवडी,सरगोधा,स्कार्दू,भोलेरी आणि जेकबाबाद. या तळाचा प्रामुख्याने सामवेश होतो.यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानचे अनेक प्रशिक्षित वैमानिक आणि कर्मचारी मारले गेलेत कारण त्यांना कल्पनाच नव्हती की, भारत देश इतक्या खोलवर भागात आक्रमण करेल...आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती जगाला मिळावी यासाठी भारतीय सैन्यदलाने विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या बहादुर महिला अधिकाऱ्यांना समोर करून संपूर्ण जगाला आणि पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही भारतीय शेवटपर्यंत एक आहोत.

युद्धविराम :

भारताच्या आक्रमक भूमिकेने पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेले आणि भारत आपले सर्व ईप्सित साध्य करण्याच्या जवळ असताना अचानक युद्धविराम होणार याची कुजबुज सुरू झाली. आतापर्यंत भारताला समर्थन देणारे अमेरिका आणि इतर देश युद्धविराम व्हावा यासाठी आग्रही होते.काय असेल नेमके कारण ? बातमी मध्येच बातमी लपलेली असते...इतके सारे घडत असताना एकाही पत्रकाराला याची कुणकुण लागू नये ? 9 मे रोजी भारतीय ब्रह्मोस मिसाईल आणि स्पाईस 2000 या बंकर भेदी बॉम्बने संपूर्ण पाकिस्तानात एकूण 11 ठिकाणी मारा केला. त्यात महत्वाचे केंद्र म्हणजे 1)नूर खान - रावळपिंडी.2)सरगोधा - पाकिस्तानचे अणुऊर्जा केंद्र.3)जेकबाबाद – एफ-१६ आणि अण्वस्त्रांचा बालेकिल्ला. या ठिकाणावर अचूक हल्ला केला गेला...आणि या युद्धाची चक्रेच बदलली....पाकिस्तानात म्हणे अचानक भूकंप 4.1 आणि 5.7 तीव्रतेच भूकंप आला...अचानक पाकिस्तानी NCA ची मीटिंग त्यानंतर वॉशिंग्टन, बीजिंग इत्यादी ठिकाणी फोन लागले असतील.... आणि अमेरिका सक्रिय झाला....कारणे काहीही असो पाकिस्तान देश कसाही असो....पण अमेरिकेला दक्षिण आशियात पाकिस्तानचे अस्तित्व पाहिजे म्हणजे पाहिजेच...काय झाले असेल वरील तीन हवाई तळावर ? अमेरिकेने भारताला युद्धविराम करण्यास राजी केले हे मान्य पण अटी भारताच्या होत्या....त्यातील पहिली मुख्य अट म्हणजे युद्धविराम म्हणजे फक्त Pause अर्थात Stop नव्हे. भारत कधीही आपली आघाडी उघडू शकतो. लवकरच दुपारी  10 मे दुपारी 3.35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला संदेश पाठवला: "आम्ही आमचे शस्त्र खाली ठेवण्यास तयार आहोत." या प्रस्तावावर भारत आपल्या शर्तीवर राजी होणार हे अमेरिकेला माहीत होते....कारण पाकिस्तानात आक्रित घडले होते आणि भारत हा एक संवेदनशील जबाबदार देश आहे हे अमेरिका आणि संपूर्ण जग जाणून आहे

संध्या. 6.00 वाजता – भारत सरकारने युद्धविराम घोषणा केली....पण त्यापूर्वीच तिकडे अमेरिकेन डाव साधत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषण केली...

मग नेमके असे काय घडले असेल की, सर्व जग खडबडून युद्धबंदीच्या मागे लागले ? ते आलेले भूकंप नैसर्गिक होते काय ? की भारतीय ब्रह्मोस मिसाईलचा आवाज होता तो ? F - 16 विमाने त्यांचे काय झाले ? त्यांनी आकाशात झेप घेण्यापूर्वीच काही झाले असेल काय ? F - 16 परत एकदा जायबंदी म्हणजे अमेरिकेच्या शस्त्र उद्योगाला घरघर..किंवा भारतीय हवाई अगदी पाकिस्तानच्या वर्मावर घाव तर नाही केला...आणि जर हे सत्य आहे तर ते भारताचा विजय आहे...आणि इतकी मोठी आघाडी घेतल्यावर नरेंद्र मोदी माघार घेणारे व्यक्तिमत्व नाही... की, भारताने असे काही केले जे......म्हणून शांत रहा....विजय खूप मोठा आहे...पण तो जगजाहीर करता येणार नाही... आणि करायचा पण नसतो.

युद्ध हे नेहमीच संहारक असते यात कुठलाही वाद नाही पण भारताने यावेळी स्वतःची कमीत कमीत हानी होऊ देता...पाकिस्तानला एक जोरदार तडाखा दिला आहे...यासाठी आवश्यकता  असते ती संयम, सराव, आत्मविश्वास सोबतच तंत्रज्ञान आणि तज्ञांची. अफाट पैसा खर्च करून युद्धसामग्री विकत घेऊन युद्धे जिंकता येत नाहीत तर त्यासाठी निष्ठा आणि धर्म आपल्या बाजूने हवा असतो हे भारताने परत एकदा सिद्ध करून दाखविले आहे...अशा युद्धात अवकाश संशोधन,अर्थशास्त्र, देशाची एकता, हवामान आणि महत्वाचे म्हणजे अनुशासित सैन्यदले, परिपक्व राजकीय नेतृत्व आणि राष्ट्रवादी जनतेची साथ आवश्यक असते...जे भारताने जगाला परत एकदा सिद्ध करून दाखविले...सोबतच 0.5 फ्रंट लोकांनी जिओपॉलिटिक्स आणि संरक्षण यावर चिंतन करणे गरजेचे आहे......

0.5 फ्रंट काही आवडती वाक्ये....

पहलगाम हल्ला नंतर लोक

1) पाकिस्तान वर हल्ला करा, पाकिस्तानला कधी धडा शिकवणार

2) Mock ड्रील करून काय फायदा , बिहार निवडणुकी साठी फक्त वातावरण निर्माण केलं जातंय देशात युद्धाचं

पाकिस्तान मध्ये अतिरेकी तळावर हल्ला केल्यावर लोक

1) बिहार निवडणुकी साठी हल्ला केला..

2)दोन्ही बाजूच्या निष्पाप लोकांचा बळी दिला युद्ध करून.

3)देशाला युध्दाची गरज नाही. फक्त अतिरेकी शोधून मारा.

4) स्वतः ला इतिहासात अजरामर करण्यासाठी मोदी pok घेणार. देश भिकेला लागला तरी चालेल त्यासाठी...

5) देशाला युद्ध परवडणार नाही. देश 10 वर्ष मागे जाईल

मर्यादित हल्ले केल्यानंतर शस्त्रबंदी केल्यावर लोक

1) युद्ध का थांबवलं, ?

2) POK का नाही घेतला ?

3) शेपूट खाली घातलं....

ता . क.

जगातील अण्वस्त्र संपन्न चौथ्या क्रमांकाच्या सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे साहेब नुकतेच 11 मे रोजी आपल्या भाषणात सांगत आहेत की, युद्ध हा काही रोमँटिक सिनेमा नाही, युद्ध ही फार गंभीर आणि जोखमीची बाब आहे, युद्ध हा शेवटचा पर्याय असायला हवा. म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणाले होते की, हा युद्धाचा काळ नाही....पण अविचारी शक्ती आपल्याला युद्धात ढकलण्यासाठी प्रयत्न करतील....पुढे ते म्हणतात की, एक सैनिक म्हणून मी युद्धासाठी नेहमीच तत्पर आहे...पण युद्ध ही माझी प्राथमिकता नाही....सर्व प्रश्न हे चर्चेतून सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल...शस्त्र संघर्ष हा कुठलाही पर्याय असू शकत नाही....प्रश्न देशांतर्गत असो की, आंतरराष्ट्रीय हा चर्चेतूनच सोडविला गेला पाहिजे.....ही मुलाखत सगळ्यांनी अवश्य बघावी...आणि 0.5 फ्रंट वाल्यांनी आपण कुणाच्या तरी हातचे खेळणे अथवा शत्रू राष्ट्राच्या Spy War चे बळी तर नाही पडत आहोत ना याची खात्री जरूर करून घ्यावी.


म्हणून नेहमी लक्षात असू द्या युद्ध हा शेवटचा पर्याय असतो...त्यात लहरीपणा न करता ईप्सित साध्य झाले की Pause घ्यावाच लागतो.....

© गणेश

Friday, 13 September 2024

प्रतिपश्चंद्र

प्रतिपश्चंद्र' .......

    असं म्हणतात मानवी शरीर आणि निसर्गातील प्रत्येक वस्तू पंचमहाभूतांनी बनलेले आहे.पृथ्वी,आप,तेज,जल आणि वायू पण महाराष्ट्रातील मातीत,इथल्या प्रत्येक श्वासात,कणाकणात एक सहावे तत्व वास करते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! आज साडे तीनशे वर्षानंतरसुद्धा ज्या महाराजांच्या फक्त जय जयकाराने आपलं रोमांच प्रफुल्लित होतं त्या महाराजांचा ज्या मातीत आणि ज्या माणसांना सहवास लाभला मग तो शत्रू का असेना धन्य झाला. भारतात सगळीकडे निराशेचा अंधार पसरला असताना या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली.ते स्वराज्य अटकेपार नेले ते याच मातीतील मावळ्यांनी...याच धामधुमीच्या शिवकालीन महाराष्ट्रात अविश्वसनीय जे एक रहस्य कालौघात मागे पडलं होतं त्याचं रहस्याचा मागोवा घेतला आहे तो डॉ. प्रकाश सुर्यकांय कोयाडे यांच्या “ प्रतिपश्चंद्र ” या कादंबरीत. प्रकाशक  न्यू इरा पब्लिकेशन, पुणे
     सर्व साहित्यातील एक उत्कृष्ट प्रकार म्हणजे कादंबरी.खरं सांगायचं तर मला हा प्रकार किंचित कंटाळवाणा वाटतो..( क्षमस्व:) कादंबरी म्हटलं की थोडं मी दचकतो.माझा कल वस्तुनिष्ठ ऐतिहासिक ग्रंथाकडे. पण एके दिवशी फेसबुकवर सदर पुस्तकाविषयी पोस्ट बघितली.थोडे दिवस असेच गेलेत मग पुनःश्च एकदा प्रकाशकाने फेसबुकवर टाकलेली पोस्ट मन लावून वाचली आणि कुतूहल वाढलं कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज...कोण म्हणतयं सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे उलट मी तर म्हणेन ह्या समाज माध्यमामुळे वाचन संस्कृतीला एक नवी चालना मिळत आहे. मराठीतील बेस्टसेलर,पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी..म्हणजे प्रतिपश्चंद्र मला मिळाली ती ह्याच समाज माध्यमावर...
      एस.एम.पब्लिकेशनकडून सदर कादंबरी घरपोच मिळाली.. वाचनाची उत्सुकता शिगेला होतीच...हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अत्यंत विश्वासू मावळे व सैनिक त्यापैकी एक म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेत सुरुवातीपासून अग्रगण्य असलेले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी मिळून एक रहस्य संपूर्ण जगापासून अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले एक रहस्य आणि त्या भोवती फिरणारी ही कादंबरी...चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’! आपल्याला वास्को दी गामा भारतात आला हे शिकविले जाते पण त्या दर्यावर्दीला भारतात यायला मदत केली कुणी त्याला आणणारे दर्यावर्दी कोण होते ??? असं म्हणतात की,त्या काळातील युरोपातील सर्वात मोठे जहाज घेऊन वास्को दी गामा भारताच्या शोधात निघाला होता....पण इकडे भारतातील दर्यावर्दी ( व्यापारी, खलाशी ) त्याच्यापेक्षा बारा पट मोठे जहाजे घेऊन चौदाव्या शतकात संपूर्ण ज्ञात जागत व्यापार उदीम करत होते.हे सत्य आपल्या गावीही नाही...
       संपूर्ण पृथ्वीतलावर भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा दुवा कोणता?जेथील आठवडी बाजारात सोने विकल्या जात होते त्या साम्राज्यातील जनतेचे राहणीमान काय उच्च दर्जाचे असेल नाही ? राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती? काय होते ते रहस्य ? स्वराज्य स्थापनेनंतर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळापर्यंत तो न संपलेला संघर्ष यात स्वराज्याच्या सिहासनाचे नेमके काय झाले ? छत्रपती शिवाजी महाराज आणि आठ या अंकांचा संबंध...आपल्यासाठी फक्त प्रेक्षणीय स्थळ असलेल्या वेरुळच्या कैलास लेण्या त्याच्या निर्मितीचा इतिहास.त्यामागे लेखकाने गुंफलेले तर्क आणि वास्तव आपली नक्कीच मती गुंग करतात...आणि रहस्य उलगडत जातात.छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र! शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गूढ अर्थ...गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र!
     एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय थक्क करणारा  एक ऐतिहासिक प्रवास… डॉक्टर आणि त्याचा मित्र, प्रियल, ज्योती, शिवकथाकार सुर्यकांतराव मोरे, मा.राज्यपाल, यांच्या भोवती गुंफलेला कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास! विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदारी…महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र!इतिसातील काही सत्य घटना आणि त्यात गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक विचार करायला लावणारे  आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण!
दर्जेदार मराठी लिखाण!
प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे…  #प्रतिपश्चंद्र  !!!



लेखक:  डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन:  न्यू इरा पब्लिकेशन, पुणे
प्रकार:  मराठी ऐतिहासिक रहस्य कादंबरी
पाने:  ४४०
किंमत:  ३९० रुपये 
टपाल खर्च:१०₹ केवळ!
संपर्क - 8798202020
           9503585356

 - गणेश





Tuesday, 16 July 2024

हिंदू धर्माची व्याप्ती

                    हिंदू धर्माची व्याप्ती


   “ हिंदू धर्म म्हणजे पवित्रतेचा अनुभव ” वास्तविक पाहता जो धर्म माणसाहून श्रेष्ठ शक्ती असलेल्या श्रेष्ठ जीवांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो तो बहुधा त्या सर्व सजीव सृष्टीला पवित्र मानतो आणि आदरभाव जपतो असा आदी अनादी धर्म म्हणजे हिंदू धर्म. ईश्वर, देवता, मानवाहून श्रेष्ठ जीव, इत्यादी अनुभवातीत व पवित्र मानलेल्या गोष्टींच्या सान्निध्यात प्रतिक्रियारूपी जी श्रद्धांची व आचरण नियमाची प्रणाली उत्पन्न होते त्या जीवन पद्धतीलाच आपल्या आंतरिक अनुभवाशी जोडून आपले आचरण समस्त सृष्टीला हितकारक कसे असावे याचे मार्गदर्शन हिंदू धर्म निरंतर करत असतो. आज अति प्रगत मानवी समाज बिग बँग सारखे प्रयोग करून ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधत असताना त्यालाच समांतर  असा प्रश्न पडतो की, संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या कवेत घेणाऱ्या जगातील सर्वात प्राचीन आणि चिरंजीवी अश्या हिंदू धर्माचा उगम कधी आणि केव्हा झाला. हिंदू धर्माची सुरुवात कधी आणि कशी झाली याचा काहीही पुरावा सापडत नाही.मानवी उत्क्रांतीसोबतच वाढत आलेला सनातन हिंदू धर्म आजही    वसू धैव कुटुंबकम ची शिकवण देतो.

        सुखार्थं सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।

     सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥

         पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखाची लालसा असते परंतु धर्माचनाशिवाय सुख नाही म्हणून मानवाने धर्मपरायन बनावे असे हिंदू धर्म सांगतो. ह्या सुखप्राप्तीसाठी ( ऐहिक ) हिंदू धर्म थोडक्यात दोन सार सांगतो अ ) जगात एक सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी, अनादी, अनंत अंततः एकाच सत्य ( सत्व ) आहे. वैयक्तिक सत्व हा केवळ त्या सर्वव्यापी सत्वाचा एक अंश आहे आणि ह्या सर्वव्यापी सत्वाची जाणीव प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. ब ) आत्मप्राप्ती, सर्वव्यापी तत्वांशी एकरूपता आणि त्या दैवी तत्वांशी संबद्ध होणे किंवा मोक्ष हेच जीवन साधनेचे उद्दिष्ट्य आहे आणि यातच जीविताचे व संपूर्ण मानव समाजाचे सार्थक आहे. फक्त एका विशिष्ट असा समुदाय डोळ्यापुढे न ठेवता पृथ्वीवरील सर्व सजीव व अखिल मानव समाजाला आदर्श जीवन जगण्याची संकल्पना हिंदू धर्म आपल्यापुढे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत आहे. हिंदू धर्म कर्मप्राधान्य धर्म आहे. जीवनाच्या विविध टप्प्यात आपले कर्मप्राधान्य कोणते असावे याचे आदर्श विवेचन भगवान श्रीकृष्णांने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवदगीतेमध्ये सांगितलेले आहे म्हणूनच भगवदगीता संपूर्ण हिंदू आणि मानवी समाजाला मार्गदर्शक असा पवित्र ग्रंथ मानला जातो.

        आज संपूर्ण  जगात सर्वत्र हिंसेने थैमान घातले असताना हिंदुबहुल भारत देशात सर्व धर्मीय भारतीय मात्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत यातच हिंदू धर्माची खरी व्याप्ती दिसून येते. आ सेतू हिमालय पसरलेल्या या देशात सनातन असा हिंदू धर्म अस्तित्वात असताना देखील  ह्याच मातीत दोन नवीन धर्माने आपले अंकुर रोवले आणि जगाला परत एकदा अहिंसेच्या पुनरोच्चार व विश्व बंधुतेचा मार्ग दाखविला. त्यापैकी एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरा म्हणजे जैन धर्म. हिंदू धर्माची व्याप्ती इतकी मोठी की, या दोन धर्माला व त्यांचे पालन करणाऱ्या धर्मियांना आपले शत्रु न मानता ह्या देशात त्यांना धर्म परंपरा पालन करण्याची मोकळीक दिली...कारण सर्वच धर्म अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग सांगतात..असे हिंदू धर्म मानतो. आपल्या धर्माचा अर्थ कसा काढायचा हे मात्र त्या त्या धर्मीय बांधवावर अवलंबून आहे. जगात सर्व धर्मात आस्तिक ही संकल्पना अस्तित्वात आहे म्हणजे त्या त्या धर्माने सांगितलेल्या मार्गावर तुम्हाला चालावेच लागते. हिंदू धर्माची व्यापकता मात्र इतकी मोठी आहे की, एखादा व्यक्ती नास्तिक असेल तर त्यालासुद्धा हिंदू धर्म सामावून घेतो.

                   तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजू होय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिक विविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीत नाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत, असे मानतो… अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात. इह व पर किंवा प्रपंच व परमार्थ साधण्याचा मार्ग हेच हिंदू धर्माचे स्वरूप होय. परधर्माविषयी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो सत्य, अहिंसा, दया, प्रेम इ. सद्गुणांवर आधारलेला आहे. 

         समस्त जगाचे कल्याण व्हावे तसेच संपूर्ण मानव जातीवर विशेष संस्कार व्हावे यासाठी हिंदू धर्माने वैज्ञानिक कसोटीवर खरे असे सोळा संस्कार मानवाला सांगितले आहेत. हे सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत  गर्भाधान ,पुंसवन,अनवलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण,सूर्यावलोकन,निष्क्रमण,अन्नप्राशन,वर्धापन, चुडाकर्म,अक्षरारंभ,उपनयन,समावर्तन, विवाह,अंत्येष्टी..

        जगाला ज्ञान देणारे चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराण तसेच रामायण, महाभारत आणि संपूर्ण जगाला आपले विराट दर्शन घडविणारी भगवद्गीता ही हिंदू धर्माने संपूर्ण मानवजातीला दिलेला अमूल्य असा ठेवा आहे. वेद,भगवद्गीता हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्ममय नाही ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा, कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे. ७ नोव्हेंबर २००३ रोजी युनेस्कोने वेदांना ‘मौखिक’ म्हणजेच ‘अमूर्त अशी वाडवडिलोपार्जित मालमत्ता’, म्हणून घोषित केले आहे.संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट आहे. म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.परंतु, हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. जसे सज्जन असतात; तसे दुर्जनही असतात. सज्जनांमुळे समाज सुधारतो. समाजाला सन्मार्ग सापडतो. सज्जन समाजाच्या हितासाठी झटत असतो; पण दुर्जनाचा समाजाला त्रास होत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. अशा विघ्नसंतुष्ट लोकांच्या ठायी, दुष्ट, दुर्जनांच्या ठायी सद्विचार यावा, त्यांचे दुष्ट विचार गळून पडावेत अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे करतात.

           यत्र नार्यस्तु पूज्यंते, तत्र रमन्ते देवताः
              अर्थात जेथे नारी शक्तीची पूजा केली जाते तेथे देव देवतांचे वास्तव्य असते.आदी अनादी काळापासून हिंदू धर्मात स्त्रीला महत्वाचे आणि पूज्य असे स्थान हिंदू धर्मात आहे.म्हणूनच आजही हिंदू कुटुंबात स्त्रियांना मानाचे स्थान आहे. स्त्रियांचा शक्ती म्हणून पूजा करणारा हिंदू धर्म जगाला आजही मार्गदर्शक आहे. अगदी प्राचीन काळात सुद्धा स्त्रीला स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली दर्शविण्यात आलेले आहे. पण काही स्वार्थी अहंकारी मंडळींनी आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू याविरुद्ध आवाज उठविला गेला चळवळी झाल्यात आणि आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. हिंदू धर्म हा नवीन बदलानांही सामावून घेणारा असा सर्वसमावेशक धर्म आहे ज्यात कट्टरतेला थारा नाही. सकारात्मक बदलांकडे मार्गक्रमण करत मोक्ष प्राप्तीचा संदेश देणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. कुणाचाही व्यक्तिगत हक्कावर गदा न आणता स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धर्म म्हणून एकविसाव्या शतकातही इतर देशातील लोक शांततेच्या शोधात हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत.
        कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
        मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
              सर्व प्राणीमात्र आणि मानवजातीला भगवद् गीतेद्वारे  वैश्विक तत्वज्ञान सांगणारे भगवान कृष्ण. मनुष्याने कर्तव्यपरायन कसे असावे ह्याचे मार्गदर्शन केले आहे.  वेद उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानसा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. ‘गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. पांडुरंगशास्त्री सांगतात की, निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे...
      विश्वकल्याण आणि विश्वबंधुतेची कामना करणारा हिंदू धर्म समस्त सजीव आणि निर्जीव सृष्टीचा पाया आहे. थोडक्यात हिंदू धर्म सर्वव्यापी आहे...





 - गणेश 

Tuesday, 19 September 2023

शासकीय अपरिहार्यता.....व्यवस्थेचे अपयश की आणखी इतर....?

      सत्य हे कडू औषधासारखे असते. औषध एकतर रोग बरा करते किंवा रोगाच्या वेदना सुसह्य करते. हा लेख वाचल्यावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येतीलच किंवा घरी विचारल्याशिवाय सांबाराची काडी न आणणारे समाज माध्यमावर मात्र हिरीहीरीने निषेध वगैरे नोंदवतील हे बघणे फार गंमतीशीर असेल.उत्तम आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती विचारांवर चर्चा करत असतात.मध्यम आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती घटनांवर चर्चा करत असतात आणि कमी आकलन शक्ती असणाऱ्या व्यक्ती लोकांविषयी चर्चा करत असतात. हा मंत्र जगात सर्वत्र लागू होतो.
      आज संपूर्ण जगात कधी नव्हे ते वेगवान भुराजकीय, आर्थिक, सामाजिक बदल होत आहेत.“ मी ”
“ माझं ” ह्या कोषातून बाहेर निघालो की, आपल्याला जाणवेल ही उलथापालत व त्याचे परिणाम अगदी आपल्या दारात हात पसरून निर्विकारपणे उभे आहेत.आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा प्रचंड राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा देशाच्या भविष्यावर दूरगामी परिणाम घडविणाऱ्या घटना घडत आहेत. ह्या घटनांतून निघणारे फलित आज जरी अदृश्य असले तरी भविष्यात संपूर्ण भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. 
  6 सप्टेंबर रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत १३८ विविध पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.अशातच राज्यातील सरकारी शाळांचा पायाभूत विकास व्हावा यासाठी या शाळा सुरुवातीला दहा वर्षांसाठी कार्पोरेट उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था आदींना दत्तक दिल्या जातील. या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील सीएसआर निधीचा वापर करता येईल, तसेच या समूहांना आपल्या आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नावेही देता येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
    हे सर्व एका रात्रीत घडले का ? तर नक्कीच नाही.  सरकार कोणतेही असो त्यांची ध्येय धोरणे किंचित फरकाने सारखीच असतात.सामान्य जनता मात्र आमचे एक मत सरकार बदलवू शकते या भ्रमात जगत असते.शिक्षण व्यवस्थेवर पहिला आघात आणि खाजगीकरणाची सुरुवात झाली ती मुळात सन 2000 च्या “ शिक्षण सेवक ” योजनेने. प्रायोगिक तत्वावर, पथदर्शी प्रकल्प, राज्याच्या तिजोरीवर भार, तत्वतः असे गोंडस शब्द वापरून ही योजना सुरू केल्या गेली.तेव्हा ह्या योजनेला तीव्र असा विरोध नाही झाला.तदनंतर हळूच केंद्राच्या धर्तीवर 2005 नंतर नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांची हक्काची पेन्शन बंद करण्यात आली. तेव्हाही हवा तसा विरोध झाला असे आठवत नाही. ह्या योजना समाज आणि कर्मचारी वर्गाच्या मताची चाचपणी करण्यासाठी सुरू केल्या जातात आणि कालांतराने हळूच त्यावर शिक्कामोर्तब केले जाते...एखाद्या गोष्टीला आपण विरोध केला नाही तर त्या गोष्टीसाठी आपली मुकसंमती आहे असे मानले जाते.शासनाचा धोरणात्मक आर्थिक निर्णय म्हणून आपली न्यायालयेसुद्धा अशा प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे आठवत नाही.
      शिक्षणासारख्या मूलभूत घटनात्मक गरजेचे खाजगीकरण करण्याची सुरुवात शासनाने खूप आधीच केली होती आता जे आपण बघत आहोत ते शेवटचे पाऊल आहे.त्यामुळे आता आकांडतांडव करून हाती काय लागेल हा चिंतनाचा विषय आहे.खाजगी कंपन्यांकडून राज्यातील 65 हजार शाळांच्या भौतिक सुविधांचा विकास करण्याचा शासनाचा मानस आहे. खाजगी कंपन्या इतर बाबी सोडून शिक्षण क्षेत्रात कोणताही नफा न कमावता गुंतवणूक का करतील ? हा अतिशय महत्वाचा प्रश्न येथे उपस्थित राहतो. “दत्तक शाळा योजना”  सुरू करून सर्व शासकीय शाळा खाजगी कंपन्यांना दान देण्याचा अनाकलनीय अभिनव उपक्रम सरकार रेटून राबवत आहे.याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त होताना दिसत नाही आहे.काही सन्माननीय शिक्षक संघटना याला तीव्र विरोध करत आहेत.पण इतर विभागाच्या संघटनांची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.त्यात आज राजपात्रीत अधिकारी महासंघाने सरकार आंदोलनाचा इशारा दिल्याची बातमी वाचनात आली.मुळात महासंघाला सरकारच्या या निर्णयाची साधी पूर्वकल्पना नसावी याचे आश्चर्य वाटते.
    कंत्राटी कर्मचारी भरतीत अजून एक मेख अशी की कर्मचारी कंत्राटदाराचे असतील आणि काम सरकारचे करतील.यात पारदर्शकता आणि विश्वासार्हता किती असेल हे ज्याचे त्यालाच ठाऊक. शासकीय शाळांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास एकदा खाजगी कंपनीने भौतिक सुविधेच्या नावाखाली शाळा अधिग्रहित केल्या की, ग्रामीण भागातील शैक्षणिक कणाच मोडून जाईल. तसेही सरकार ते मग कुणाचेही असो त्यांना शिक्षण क्षेत्रापासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. हळूच सरकार आपले हात वर करून संपूर्ण शाळाच त्यांना “ ना नफा ना तोटा ” तत्वावर चालविण्यास देतील. मग सुरू होईल कंपन्यांची मनमानी फी वसुली.ज्यावर कुणाचेही नियंत्रण राहणार नाही.उठसुठ गुरुजींना जाब विचारणारा आणि धारेवर धरणारा पालक निमूटपणे ही सरंजामशाही स्वीकारेल यात मात्र तिळमात्र शंका नाही. तेव्हाच जनतेलाही शिक्षणाचा खरा अर्थ कळेल अशी आशा बाळगायला हरकत नसावी.
     गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात सर्वात जास्त जर नुकसान झाले असेल तर ते शैक्षणिक क्षेत्राचे.सर्व शिक्षक व त्यावर सनियंत्रण ठेवणारे केंद्र प्रमुख ते वरिष्ठ अधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा यशस्वी सपाटा चालविल्या गेला. पाठयपुस्तक व स्थानिक गरजा लक्षात न घेता आखले गेलेले उपक्रम, त्यात धरसोड, फोटो,link, अहवाल, चाचण्यांचा भडीमार, अशैक्षणिक कामे, ही यादी फार लांब आहे.हे सर्व करून झालं की मग आठवण येते ती गुणवत्तेची.शेवटी कारवाई. मागे एक अधिकारी होऊन गेलेत त्यांनी तर उपक्रमाचा धडाका लावला होता.100% डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, शाळाभेटी, दौरे, मेळावे सर्वत्र धामधूम माजली होती. घाईघाईत संपूर्ण शाळा 100% डिजिटल झाल्याची घोषणा झाली. आता प्रश्न परत तोच की, चार वर्षापूर्वी डिजिटल शाळा झाल्या होत्या सगळं झालं होतं तर मग आता दत्तक शाळा प्रयोजन कुणासाठी आणि का ?? म्हणजे नेमकं तेव्हा कुणी कुणाला फसवलं? कुणाला इतकी घाई झाली होती ? तो उपक्रम जर यशस्वी झाला होता तर त्या अधिकाऱ्याला बढती द्यायला हवी होती. किंबहुना इकडून तर आकड्यांची हेराफेरी झाली तर नसेल.
      दरवर्षी सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिले जातात तसेच शासनाच्या सर्व विभागाचेसुध्दा गोपनीय अहवाल तयार केले जातात. यात इतर विभाग सोडले तर शासन सर्वात जास्त ज्या विभागाच्या मुळावर उठले आहे त्या शिक्षण विभागाचे गोपनीय अहवाल काय सांगतात हा महत्वाचा विषय आहे. देशव्यापी सार्वत्रिक NAS परीक्षेत महाराष्ट्र राज्य जर सातव्या क्रमांकावर आहे तर मग दरवर्षी आम्हाला ASER चे अहवाल दाखवून धारेवर का धरल्या जाते.शासन नेमकं कुणाला विश्वासार्ह मानते हा मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यावरूनच हे असे कंत्राटी, दत्तक वगैरे धोरणे आखली जातात. प्रथम, सलाम यासारख्या अनेक NGO ने खूप चलाखीने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केली आहे. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री व सेवन करण्यास बंदी घालणे हे स्थानिक नगर पंचायत किंवा पोलीस विभागाचे काम असताना मु.अ.ने पाट्या लावून समाजकंटक सुधारले असते तर आज सर्व जग नंदनवन बनले असते.हे कुणाच्या लक्षात का येत नाही.शासनाला उपद्रवी उपक्रम सुचविणारे आपलेच काही दरबारी बांधव असतात.
       आज आपण कितीही विरोध करत असलो तरी झालेला निर्णय परत घेतला जाईल असे वाटत नाही. सामान्य जनतेकडून ह्या सर्व जुलुमी निर्णयांना विरोध होणे क्रमप्राप्त असताना तसे होताना दिसत नाही आहे. शासनाने योजनाबद्ध रितीने सामान्य जनतेत आपल्याविषयी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांविषयी नकारात्मक भावना तयार केली आहे. जनतेलाही ह्याचे फार कौतुक वाटत आहे.थोडासा जनतेलाही आपल्याविषयी आकस असतो.त्याची सर्व कारणे आपल्याला माहिती आहेत.पण त्यांना हा औट घटकेचा आनंद उपभोगू द्या....ह्याचे जे दुष्परिणाम भविष्यातील सामाजिक बैठकीवर होतील तेव्हा समाजही म्हणेल “जुनं ते सोनं होतं” कुणी वावगे वाटू नये याला आपणही तितकेच जबाबदार आहोत…हे सत्य कितीही नाही म्हटले तरी मान्य करावेच लागेल. ह्या गोष्टीवर जोपर्यंत चिंतन होत नाही तोपर्यंत सरकारला दोष देत बसण्यापालिकडे आपल्या हाती काहीही उरणार नाही कारण चलनी नाणे दोन्ही बाजूने सुस्थितीत असेल तरच समाज त्याला स्वीकारतो. मलातरी वरील चित्रात ??? याऐवजी खाजगी कॉर्पोरेट शाळाच दिसत आहे...म्हणून चिंतन आवश्यक आहे....



© गणेश कुबडे ©



    

Wednesday, 23 August 2023

We are on the moon......

चंद्रयान हे भारतासाठी नेहमीच एक आव्हानात्मक मिशन राहिले आहे. सलग दोन प्रयत्न फसल्यानंतर आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित होते. जे जगाने नाही बाळगले ते अशक्यप्राय असे दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे एक वेगळे लक्ष्य इस्रोने बाळगले होते. भले भले देश जे करू शकले नाही ते इस्रोने अत्यंत कमी म्हणजे 615 कोटींमध्ये करायचे ठरवले. अनेकांनी हे शक्य नाही असे म्हटले. पण आज इस्रोने सिद्ध केले की सगळचं शक्य आहे! भारत हा चंद्राच्या खडतर अशा दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी इस्रोचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. महत्वपूर्ण म्हणजे चंद्रावर आतापर्यंत जगातील फक्त चार देश यशस्वीरीत्या चंद्राला स्पर्श करू शकले आहेत...
हा प्रवास कधीच सोपा नव्हता.....
समस्त भारतीयांची मान आज अभिमानाने ताठ झाली आहे.
भारतीय वैज्ञानिक,त्यांचे तमाम समर्थक आणि समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.क्षणाक्षणाला आपली हुरहूर वाढत असताना आपल्या शास्त्रज्ञांनी अगदी काटेकोर नियोजन अखेर स्वप्नवत मोहीम पूर्ण केली...
विश्वविजेता भारत....
जागतिक महाशक्ती भारत...
भारत माता की जय....

We are on the Moon........

Saturday, 29 July 2023

ग्रेट भेट

ग्रेट भेट...

हिंदूधर्मसंस्कृती मंदिर, धंतोली चे वतीने दिनांक 28 जुलै 2023 शुक्रवारला संध्याकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध लेखक व संशोधक श्री अक्षय जोग ,पुणे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
व्याख्यानाचा विषय होता -  
       “ वैचारिक लेखन : महत्व,पूर्वतयारी आणि संधी.”
       या विषयावर त्यांनी अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले.भविष्यवेधी लिखाणाच्या गरजा,उद्दिष्ट्ये व स्वरूप कसे असावे याविषयी त्यांनी चिंतनीय असे संबोधन केले.
        अक्षय जोग यांनी अतिशय कमी वयातच एक उत्तम संशोधक व वैचारिक लेखक म्हणून ख्याती प्राप्त केली आहे. “ स्वा सावरकर : आक्षेप आणि वस्तुस्थिती ” या त्यांच्या पुस्तकाच्या 3 वर्षात 13 आवृत्त्या निघाल्या आहेत. स्वा. सावरकर यांच्यावर सलग दहा वर्षे संशोधनपर अभ्यास करून त्यांनी सावरकरांचे कार्य आपल्यासमोर मांडतानाच त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे सप्रमाण खंडन केले आहे.
 सर्वांनी नक्की वाचा 
 “ स्वा.सावरकर आक्षेप आणि वास्तव ” सावरकरांवरील आक्षेपाचे सप्रमाण खंडन

प्रकाशक : मृत्युंजय प्रकाशन, पुणे

Wednesday, 25 January 2023

राष्ट्रीय मतदार दिवस

भारत देश म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेला  जगातील सर्वात मोठा लोकशाही  देश.येथील  निवडणूक प्रक्रिया  जगातील सर्व देशांना आव्हानात्मक वाटते पण ही किचकट प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडते..या यशाचे श्रेय जाते ते अर्थातच सर्व अधिकारी , निवडणूक कर्मचारी, BLO, सरंक्षण दल आणि मुख्य म्हणजे सजग भारतीय मतदार यांना....हाच धागा पकडून 25 जानेवारी 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो...शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास,शिक्षक, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन.सी.सी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मतदानाचे महत्व

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया... हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळसच. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो.....कारण मतदार हा सुदृढ लोकशाहीचा आधस्तंभ आहे. चला तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशातील मतदार आपले कर्तव्य चोख बजावून लोकशाहीला बळकट करतील अशी आशा करू या..

राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..

गणेश तु कुबडे
BLO - 012 विखणी
046 - हिंगणघाट विधानसभा क्षेत्र.

Tuesday, 5 April 2022

अ-सत्यमेव जयते

साधारणतः मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला सदर पुस्तक “ असत्यमेव जयते " पोस्टाने घरपोच मिळाले. दरम्यान ह्या काळात मराठी चित्रपट  “ पावनखिंड ” सिनेमागृहात इतिहास घडवत होता. प्रखर स्वामीमिष्ठा आणि राष्ट्रप्रेम म्हणजे काय ? याचं ज्वलंत उदाहरण.छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या रक्ताने उभारलेले स्वराज्य. तर दुसरीकडे “ द काश्मीर फाईल्स ” नावाचा एक हिंदी चित्रपट स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्याच देशातील एका काळ्याकुट्ट इतिहासाची ज्याची तेव्हा आणि आजही कुणी दखल घ्यायला तयार नाही त्या विषयाची डोकं सुन्न करणारी मांडणी करत होता..प्रचंड सामाजिक व राजकीय चर्चा झडत होती व अजूनही सुरूच आहे..काश्मीरमध्ये तशी परिस्थिती का उद्भवली ??? मुळात काश्मीर ही कधीच समस्या नव्हती, शांततेची कबुतरे उडविण्याच्या नादात वास्तवाचे भान न ठेवता स्व - प्रतिमा संवर्धनाचा एक भाग म्हणून देशाच्या भु - राजकीय अस्मितेशी केलेला तो एक खेळ होता. या  पार्श्वभूमीवर मा.लेखक श्री अभिजित जोग लिखित व भीष्म प्रकाशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित “ असत्यमेव जयते ” हे पुस्तक हाती लागले किंवा फेसबुकवर जाहिरात बघून व शिर्षक वाचून कुतूहल वाढले म्हणून त्वरित पुस्तक मागविले.भारताच्या इतिहासातील दिशाभूल संदर्भासह उलगडून दाखविणारे महत्वाचे दस्तावेज असेच सदर पुस्तकाला म्हणावे लागेल.
        सत्यापेक्षा राजकीय सोय महत्वाची वाटली म्हणजे एखाद्या देशाच्या वैभवशाली व सुसंस्कृत इतिहासाची कशी वाताहात केली जाते याचे संदर्भासह बिनतोड स्पष्टीकरण आपल्याला सदर पुस्तकात प्रत्येक पानावर वाचायला मिळते. इतिहासाची शुद्ध वाताहात करून ज्या देशाच्या नागरिकांवर नेहमी पराभूत असा शिक्का मारला जातो तो देश म्हणजे आपला वैभवशाली भारत देश.  काही साम्राज्यवादी देश, संधीसाधू राजकीय नेतृत्व तसेच चाटूकार व विदेशी भाकरीवर जगणाऱ्या मुठभर लोकांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो आधुनिक भारताचा इतिहास ??? लिहिला तो वाचताना सुजाण माणसाला किंवा त्या त्या वेळेतील कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना सहज जाणवते की, आपण म्हणजे पराभूत. आपल्यावर फक्त आक्रमणे झालीत आणि विदेशी सुलतान, इंग्रज यांनीच राज्य केले. त्यांची लूटमार आणि कत्तली म्हणजे भारताचा इतिहास हेच आपणास शिकविले जाते.  
       एक देश म्हणून आपला इतिहास 1947 पासून सुरू होतो या अत्यंत भंपक मानसिकतेमुळे आपल्या हजारो वर्षांच्या सुवर्ण इतिहास हेतुपुरस्सर गहाळ करण्यात आला. साम्राज्यवाद्यांची नक्कल करणारा, नेहमी पराभूत मानसिकता जपणारा एक देश अशी आपली ओळख का तयार करण्यात आली ?? हा इतिहास दडपण्यामागे खरे लाभार्थी कोण होते किंवा आहेत असे अनेक रहस्य लेखकांनी या पुस्तकात संदर्भासह आपल्यासमोर मांडले आहेत. एखाद्या राष्ट्राचा समूळ नाश करण्यासाठी तेथील जनतेची बौद्धिक धारणाच संपवून टाकणे आवश्यक असते असे आचार्य चाणक्याने म्हटले आहे..नेमके आपल्या देशात हेच घडत आले आहे. परकीय आक्रमकांनी तलवारीने आपले डोके कलम केले आणि इंग्रजांनी त्यांच्या लेखणीने योजनाबद्ध पद्धतीने कशी आपली बुद्धी कलम केली याची मुद्देसूद मांडणी लेखकाने येथे करताना अगदी हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करताना प्राचीन भारतीय सामाजिक, आर्थिक, राजकीय व व्यवस्था यावर अगदी सखोल प्रकाश टाकलेला आहे.हे सर्व वाचत असताना नक्कीच आपल्याला स्वतःचा अभिमान वाटतो.
       आर्य म्हणजे कुणीतरी परकीय आक्रमक वगैरे तद्दन भंपक प्रचार का केला जातो ? आर्य म्हणजे नेमके कोण? आर्य म्हणजे कुणी परकीय नव्हते ते भारतीय होते असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. ( Writing and speeches Bol. VII ) किंबहुना तसे शेकडो पुरावे असताना आपल्याला मात्र वेगळेच काहीतरी का शिकविले जाते याचे उत्तर म्हणजे “ असत्यमेव जयते ” हे पुस्तक. आक्रमक उच्चवर्णीय आणि स्थानिक मूलनिवासी ही आग नेमकी कुणी लावली ? भारतीय भाषा त्यांचा संपूर्ण जगावर असलेला  गौरवशाली प्रभाव, मेकॉलेने भारतीय शिक्षण पद्धतीची वाताहत कशी केली हे तो स्वतः मान्य करतो त्याचे पुरावे. सुरुवातीला भारताचे वैभव व लोकजीवन बघून भारावलेले ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हे मान्य करतात की भारत एक सधन व वैभवशाली देश आहे. नंतर असं काय घडतं की, अगदी विरुद्ध आणि दिशाभूल करणारा इतिहास मांडला जातो.गुप्त घराणे,   चौल साम्राज्य, वैभवशाली विजयनगरचे साम्राज्य यांचा इतिहास आपल्याला का शिकविला जात नाही ? भारत देश खरंच परभुतांचा देश आहे काय ? बादशाह अकबर खरंच इतका महान होता काय ? सुफी संत आणि त्यांची भूमिका, भारताचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण त्याची कारणे, जातीव्यवस्था अधिक दृढ कशी झाली , स्त्री शिक्षण, सती प्रथा इत्यादी व अनेक विषय लेखकांनी अनेक संदर्भ देऊन त्यावर प्रकाश टाकलेला आहे. श्री राम जन्म भूमीचा मुद्दा सौहार्दाने निकालात निघत असताना तो नेमका का चिघळवला गेला ??? भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारकांचे अतुलनीय योगदान नेहमीच का नाकारण्यात येते ?? महत्वाचे म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा. भारताला स्वातंत्र्य नक्की कुणी मिळवून दिले याचे अगदी तर्कशुद्ध विवेचन तेही तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार व दिलेला कबुलीजवाब याचे संदर्भ देत लेखकांनी आपल्या डोळ्यावर पसरलेले झापड दूर केले आहे...
       “ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ” किंवा डाव्या इतिहासकारांनी सांगितलेला भारत म्हणजे भारत नव्हे तर तो आपल्याला शोधावा लागेल. नेमका हाच धागा पकडून मा.लेखक श्री अभिजित जोग यांनी सदर पुस्तकात प्रत्येक पानावर आपल्या अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध लेखनाची संदर्भासह छाप सोडलेली आहे. आपले कथित पुरोगामी ? मित्र जेव्हा भारताचा विकृत इतिहास सांगतील तेव्हा त्यांना उत्तर द्यायला म्हणून सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे...तसे त्यांना सांगूनही उपयोग नाही...कारण ते हे सत्य मान्य करणार नाहीत यावरच त्यांची दुकानदारी व रोजीरोटी सुरू आहे ना...भारतामध्ये भारताचा इतिहास खरा इतिहास दृष्टीआड करण्याचा कपटी प्रयत्न हा गेली कित्येक दशके मुद्दाम केला गेलेला आहे. पण सोशल मिडियावर आपले प्रत्येक मत व्यक्त करणारी आजची तरुण पिढी त्यांना अगदी सोप्या भाषेत आपल्या भारताचा वैभवशाली इतिहास उत्तमरित्या उलगडून दाखविला आहे तो मा.लेखक श्री अभिजित जोग सरांनी.खरे सत्य जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांनी सदर क्रांतिकारी पुस्तक नक्की वाचावे.
धन्यवाद.


- गणेश कुबडे


पुस्तकाचे नाव - असत्यमेव जयते
लेखक - श्री अभिजित जोग
प्रकाशक - भीष्म प्रकाशन, पुणे
संपर्क - 9503864401
       

Sunday, 5 December 2021

उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....

          

      जगातील सर्वात मोठा अक्षम्य गुन्हा कुठला असेल तर, तो म्हणजे एखाद्याची चूक नसताना त्याला शिक्षा देणे किंवा त्या व्यक्तीला अवमानित करून त्यास मरणयातना देणे...पण अशी वेळ येतेच कशी ?? सगळं सुरळीत सुरू असताना आपण नेमकं एका ठिकाणी चुकत असतो ते म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या किंवा आपल्या वागणुकीचे विश्लेषण कधी करतच नाही...वरवर सगळं सुरळीत सुरू असताना अचानक भावनांचा उद्रेक होऊन सर्व विस्कळीत होतं...हे विश्लेषण करायला खूप काही रॉकेट सायन्स वगैरे आत्मसात करायला हवं असंही नाही...“समोरच्या व्यक्तीला आता आपली फारशी गरज उरली नाही किंवा आपलं अस्तित्व आता तिच्या लेखी फार महत्वाचे नाही” याचे संकेत आपल्याला खूप आधीच मिळत असतात....आपल्याला जाणीव होत असते पण मन ती गोष्ट मानायला तयार नसते किंवा आपण शांतचित्ताने बसून त्यावर विचार करत नाही....हीच वेळ असते वास्तव मान्य करण्याची.
       आपली चूक असेल तर कुठलाही अहंपणा न बाळगता आपली चूक मान्य करून समोरच्याची माफी मागायची आणि त्याला आपलंसं करायचं.अशावेळी तो आपला self respect घरी कुठेतरी ठेऊन बाहेर निघायचं....चूक मान्य करायची...पण जर नेमकं याउलट असेल तर मग ??? आपली चूक नसेल तर ??  सरळ सरळ सांगून द्या आणि राम राम ठोका. शेवटचं बोलून घ्या..अजिबात शरणागती अथवा लाचारी पत्करू नका.एखाद्या व्यक्तीला आपला कंटाळा येऊ शकतो हे सत्य स्वीकार करा...कदाचित त्याला आपल्यापासून सुटका हवी असू शकते..त्याला त्याचं जीवन जगायचं असेल...त्यात तुमच्यासाठी जागा नसेल..“ गरजेचं नातं हे घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं ” (व.पु.)जगातील प्रत्येक व्यक्तीचं मन आणि विचार करण्याची प्रवृत्ती ही भिन्न असते हे एकदा आपण समजून घेतलेलं बरं...आपण उगाच त्रास करून घेत असतो...समोरचा व्यक्ती असताना आणि नसतानाही आपलं जीवन सुरूच होतं ना ??? ती व्यक्ती असताना काही क्षण आपण आनंदात घालवलेत आता ती वेळ निघून गेली असं समजायचं आणि पुढे निघायचं...रेल्वे गाडी तिचा प्रवास सुरु करताना सगळेच प्रवासी सोबत नसते ना घेत....काही समोरच्या स्टेशनवर चढतात काही उतरतात कारण त्यांचं इप्सित स्थळ आलेलं असतं...किंवा काहींना ते गाठायचं असतं...म्हणून आपण थोडा ना आपला प्रवास थांबवत असतो....ते प्रवासी काही काळापुरते आपली साथ देतात हेच सत्य आहे....हेच तत्व जीवनात लागू पडतं...
         माझं कसं होईल किंवा समोरच्याला काय वाटेल हा विचारच सोडून द्यायचा...येथे आपल्या एका श्वासाची शाश्वती नाही पण आपण उद्याच्या किंवा खूप लांबच्या योजना आखतच असतो ना...निसर्गाने आपल्यासाठी आधीच योजना आखलेल्या असतात...माझ्या आयुष्यात जे घडेल किंवा घडत आहे ते चांगलेच होत आहे हा दृष्टिकोन बाळगला की, सर्व गोष्टी सोप्या होतात...म्हणून ज्यांना आपण नको आहोत त्यांना एकदा कायमचा टाटा बाय बाय करून द्या...किंचित त्रास होईल पण समोरचा प्रवास सुखकर होईल...समोरच्याला माझं म्हणणं कळावं, त्याची चूक कळावी..त्याने आपल्या वर्तनात बदल करावा हे मानसिक युद्ध जेथे आहे तेथेच थांबविलेले बरे....कुणी मान्य करो व न करो प्रत्येक माणूस आपला अहंकार जपत असतो हळुवारपणे...त्यावर जर आघात झाला तर तो वार पचविणे आणि परतवून लावणे दोन्ही अवघड होऊन जाते....
         हे सगळं करत असताना एक व्यवहार्य गोष्ट मात्र करायची. “ समोरच्याला माफ करायचं नाही, आपल्या सोबत झालेला व्यवहार विसरायचा नाही पण सोबतच स्वतःला त्रास मात्र करून घ्यायचा नाही. ” कधीच काही विसरायचं नाही...नाहीतर विस्मरणाचा मानसिक रोग जडू शकतो. समोरचा व्यक्ती आहे तसाच रहाणार आहे ; तो नाही बदलणार. का बरं त्याने बदलावे....स्वभाव बदलत नसतो हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं आणि मनाला अन मेंदूला पटवून दिलं की अर्धी लढाई खलास होते. आपल्याला आलेल्या अनुभवातुन धड़ा घेण्यासाठी आणि सहन केलेल्या मानसिक त्राससमोर विसरून जाणं हा पर्याय असूच शकत नाही. पुन्हा ते अनुभव येऊ नयेत म्हणून शिकणे महत्वाचे. वाचतांना हे कितीही मनाला पटत नसेल तरी हाच अंतिम पर्याय आहे...विसरायचं काहीच नाही,समोरच्याला माफ करायचं नाही...आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही... आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे स्वतःसाठी आणि स्वतःच....कुणाच्याही समर्थनाशिवाय...जाऊ दे ना,सोडून दे सगळं हे म्हणून आयुष्य सोपं करता येत,पण समृद्ध नाही...

म्हणून
   

उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....


- गणेश

Friday, 21 May 2021

मी आणि नथुराम

    फेसबुकवर गेली अनेक दिवस एक पोस्ट लक्ष वेधून घेत होती आणि प्रत्येकवेळी मी लक्ष देऊन वाचत होतो.प्रकाशनपूर्व पहिली आवृत्ती...., तिसरी... आणि चौथी आवृत्ती... आता तर हे लिहीत असेपर्यंत सहावी आवृत्ती संपत आलेली आहे.आश्चर्य आणि ओढ लागली की, काय असेल ह्या पुस्तकात ? कारण पुस्तकाचे शिर्षकच इतकं लक्षवेधी की,आपण जरी त्या काळात नव्हतो तरी,जगाच्या राजकीय आणि भारताच्या भौगोलिक रचनेवर प्रभाव पाडणारी ती जागतिक आणि ऐतिहासिक घटना. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या पाच महिन्यात असे काय घडले की, एका सर्वसामान्य माणसाला वाटलं आपण म.गांधी यांना संपवावं...ह्याची कारणे अनेक आणि त्या घटनेवर वाद विवाद आजही सुरूच आहेत. तो न संपणारा विषय आहे..आणि सुजाण नागरिकांनी कुणाचीही बाजू घेऊन आपसात वाद विवाद करण्यापेक्षा दोन्ही बाजू जाणून घेणे इष्ट ठरेल.
        अशातच १९९८ साली एक मराठी नाटक भारतीय नाट्य मंचावर आलं शिर्षक “ मी नथुराम बोलतोय ” !!!शिर्षकच इतकं भेदक की नाटकात काय असेल हे सगळ्यांनाच कळलं होतं आणि ज्यांनी बघितलं ते एका परिपूर्ण नाट्य कलाकृतीचे साक्षीदार ठरले.परिपूर्ण यासाठी की, सदर नाटकात कुठेही नथुरामचे उदात्तीकरण किंवा म.गांधींचा अपमान होणार नाही याची घेतलेली काळजी. पुस्तक मुळात त्या नाट्य कलाकृतीविषयी भाष्य करत जरी असले तरी हे पुस्तक म्हणजे प्रत्यक्ष रंगमंचावर नथुराम या एका सामान्य व्यक्तिमत्वाची असामान्य भूमिका गाजविणारे कलाकार आणि लेखक मा.श्री शरद पोंक्षे यांचे अनुभव कथन आहे.
       एका अजरामर नाट्यकृतीसाठी ती भूमिका वटवणारे श्री शरद पोंक्षे सरांनी त्या नाटकासाठी केलेली धडपड किंवा जीवनसंघर्ष सदर पुस्तकात खुद्द त्यांनीच मनोगत म्हणून मांडलेले आहे...लेखक सुरुवातीलाच प्रांजळपणे कबूल करतात की,ते काही सिद्धहस्त लेखक नाहीत, तर नट आहेत. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्या पुस्तकात त्यांनी आपले अनुभव शब्दरूपाने मांडले आले आहेत ते एका सिद्धहस्त लेखकालाही अंतर्मुख करायला लावतील इतकं सुंदर अनुभव कथन यात केलं गेलं आहे.मराठी नाट्य सृष्टीतील एका अजरामर आणि ऐतिहासिक नाटकाचे मध्यवर्ती नट म्हणून स्वतःचे अनुभव स्वतः कुठलीही अतिशयोक्ती न करता लिहिणे हे काही साधे काम नाही....श्री शरद पोंक्षे सरांची एक गोष्ट मला फार आवडली.त्यांनी पुस्तकात कुठेही “ मी ही भूमिका जगलो ” वगैरे शब्दप्रपंच केलेला नाही ...तर “ त्या नथुराम ह्या आव्हानात्मक भूमिकेला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्या भूमिकेने मला मोठं केलं " अशी प्रांजळ कबुली ते देतात.खरं तर इतकी प्रसिद्धी मिळूनही ही शालीनता त्यांनी जपली याचंच आश्चर्य वाटते.
       ह्या पुस्तकात शुभेच्छा संदेश देताना ज्येष्ठ अभिनेते मा.विक्रम गोखले साहेबांचं एक वाक्य आलेलं आहे       “तुम्ही गांधीवादी असा किंवा नसू देत ; पण तुम्हाला  एका सच्च्या गांधीवादी व्यक्तीवर टीका करण्याचा अधिकार  नाही.आयुष्यात कोणी कोणता राजकीय विचार जपावा, जतन करावा हे लोकशाही व्यवस्था सांगत नाही,निदान सांगू पण नये ” असे ते म्हणतात.नाटक करताना लेखकाला अश्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले जिथे महात्मा गांधीजींच्या अनुयायांनीच त्याच्या विचारांनाच हरताळ फासला मग ते नाटकाला विरोध करून झाल्यावर त्यांची प्रतिमा रस्त्यावर सोडून जाणे असो किंवा फक्त निवडणुका आहेत म्हणून नाटकाला विरोध करणारे स्थानिक नेते असोत...त्यांची कृत्ये बघून आपण विचार करायला लागतो हे मोर्चे वगैरे नेमके काय प्रकार असतात ते.नथुरामची भूमिका करणारे लेखक श्री शरद पोंक्षे सरांना विरोध झाला,जाळपोळ झाली,मानसिक,शारीरिक त्रास खूप झाला पण आंदोलन करून झाल्यावर म. गांधींची प्रतिमा ( फोटो ) तसाच टाकून देणारे आंदोलक कुठे आणि त्यानंतर तोच फोटो अदबीने आपल्या घरी आणून त्यास योग्य सन्मान देणारे लेखक मला खुपच भावलेत...त्यांच्यात हा समृद्ध स्थायीभाव आहे म्हणूनच ते सलग २० वर्षे नथुराम हा विषय लोकांसमोर मांडू शकलेत.या वीस वर्षांत एक माणूस आणि नट म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भोगलेला त्रास,कष्ट,यातना ह्यांची जोड नक्कीच आहे.
    १९९८ साली आलेलं नाटक.प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद त्यानंतर आलेली बंदी.परत कोर्टातून खटला जिंकून सुरू झालेला नाटकाचा प्रवास ते ११०० प्रयोगाचा केलेला विक्रम आणि त्यात प्रत्येकवेळी लेखक आणि इतर कलावंतांनी केलेला अतोनात संघर्ष हे वाचत असतानाच आपण विचारमग्न होतो की, नेमकं आपण रहातो कोणत्या समाजात ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टी आपल्या देशात फायदा बघून केल्या जातात...म्हणजे तो मूलभूत अधिकार जरी असला तरी तो समोरच्याला द्यायचा की,नाही हे काही घटक त्यांच्या सोयीने ठरवणार ??? आम्ही ठरवू तसे आणि तेच ! भलेही आम्ही ज्यांचं नाव घेऊन राजकारण करतो त्यांचे विचार पायदळी तुडवू तरी चालेल. आणि ह्यात काही सन्माननीय अपवाद वगळता आपल्या लोकशाहीचा चौथा खांब म्हणून मिरवणारी वृत्तपत्रे देखील होती.हे पुस्तक वाचताना हा असा दुटप्पीपणा आपल्याला पदोपदी जाणवतो...आणि आपण त्यावर विचार करतो हीच ह्या पुस्तकाची आणि लेखकाची खरी किमया.
    नथुराम गोडसेना जेव्हा फाशी झाली तेव्हा त्यांचे वय ३९ वर्षे आणि २०१८ ला नाटकांचे प्रयोग करत असताना श्री शरद पोंक्षे सरांचं वय ५२ वर्ष. आता आपण हे नाटक थांबवू या..कारण आपलं वय आणि नाटकाच्या मध्यवर्ती पात्राचं वय यातील अंतर...हे ज्या नटाला कळतं ना तोच खरा नट...यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आपण थांबायला हवं...असं ज्या नटाला सुचतं ना तो एक व्यक्ती म्हणून महानच.सदर पुस्तक प्रकाशनात लेखकाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांची नावे लेखकाने उल्लेखित केलेली आहेतच...प्रकाशक म्हणून श्री पार्थ बावस्कर यांचे पण अभिनंदन करावे लागेलच...आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, प्रवचनकार, डॉ. सच्चिदानंद शेवडे साहेबांचा पण निर्मितीत सहभाग लाभला...त्यांचं एक वैशिष्टय आहे जे नमूद करावंसं वाटतं, इतके मोठं व्यक्तिमत्व पण त्यांना  Messenger वर एक संदेश जरी टाकला ना त्यांचा आवर्जून प्रतिसाद येतो...यापेक्षा माझे भाग्य ते काय ???
      मी प्रत्यक्ष नाटक बघितलं नाही ह्याची खंत आहेच पण आता CD उपलब्ध झालेली आहेच..ती मागवावीच लागेल...कारण आता सदर नाटक बघितल्याशिवाय ह्या पुस्तक वाचनाला पूर्णत्व येणार नाही. परत एकदा “ मी नथुराम बोलतोय ” ह्या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचे सर्व पडद्यावरचे कलाकार आणि पडद्यामागील कलावंत यांचे अभिनंदन....आणि मुख्य भूमिका साकारणारे श्रेष्ठ कलाकार तसेच “ मी आणि नथुराम ” ह्या पुस्तकाचे लेखक श्री शरद पोंक्षे सरांना खूप खूप धन्यवाद...एका जबरदस्त ऐतिहासिक नाटकाचे अनुभव कथन करताना कुणाच्याही भावनांना ठेच ना लागू देता...वाचकाला विचार करावयास भाग पाडणारे पुस्तक त्यांनी आम्हाला दिले...
    काहीतरी छान,वेगळं असं वाचनात आलं की ते इतरांना सांगावसं वाटतं...कारण त्याशिवाय वाचन अपूर्ण राहतं...म्हणून हा खटाटोप.मी कसं लिहू, कसं बोलू, शब्द कोणते वापरू हा विचार करायचाच नाही...समोरच्या व्यक्तीच्या मनाचा थेट ठाव घेणारी भाषा म्हणजे आपली मराठी भाषा....
   धन्यवाद...


पुस्तकाचे नाव  - “ मी आणि नथुराम ”
लेखक - श्री शरद पोंक्षे
प्रकाशक - पार्थ बावस्कर
                शब्दामृत प्रकाशन , औरंगाबाद  - ४३१००१
संपर्क -      ९९७००७७२५५



- गणेश




     

Monday, 4 January 2021

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था

डॉ.कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था 

         “ आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं,तर आपली झोप उडवते ते स्वप्न खरं असतं ”   - डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 
         काही माणसे त्यांना एखादं पद मिळालं की मोठे होतात. पण काही ऐतिहासिक युगपुरुष त्यांनी भूषविलेल्या पदाची शान आणखी उंचावतात. त्याच भारताच्या महान सुपुत्रापैकी एक म्हणजे भारताचे ११ वे महान राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, शास्त्रज्ञ, शिक्षक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.( जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ). आपल्या आगळ्या  कार्यपद्धतीमुळे ते जगात लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. पोखरण अणुचाचणी, पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्र असो ह्यांच्या निर्मितीत डॉ.कलाम साहेबांचे अतिशय मोलाचे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. देशाच्या सरंक्षण क्षेत्रात उंच गरुडभरारी घेणारे हे व्यक्तिमत्व अतिशय शांत, सवेदनशील आणि अतिशय साधे जीवन जगणारे होते. अगदी राष्ट्रपती भवनात आपले स्वत:चे दोन जोड कपडे घेऊन प्रवेश करणारे आणि तेथून परत येताना फक्त आपले दोन जोड कपडेच घेऊन परत येणारे असे हे निष्काम कर्मयोगी ह्या जगात फार कमीच म्हणावे लागेल.म्हणूनच संपूर्ण जगाला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली होती. ज्ञानाची अखंड साधना हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
   आयुष्यभर डॉ. कलामांचे एक वैशिष्ट्य होते आणि कुणीतरी त्यांना विचारले की, तुम्हाला कसे आठवणीत ठेवता येईल ? त्यांनी उत्तर दिले होते की मला शिक्षकाच्या रूपात लक्षात ठेवावे. हा शिक्षकांचा सन्मान तर आहेच पण त्यांच्या आयुष्यातील श्रद्धा काय होती,बांधिलकी काय होती याचीही ओळख होती. भारतासारख्या देशाला पुढे जाण्यासाठी, प्रभाव निर्माण करण्यासाठी गतीने चालायचे आहे तर येणार्‍या पिढ्यांना तयार करावे लागेल असे डॉ.कलाम नेहमी प्रतिपादन करायचे आणि त्यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारत बलवान व्हावा पण केवळ अस्त्र शस्त्रानी व्हावा ही त्यांची इच्छा नव्हती. शस्त्राचे सामर्थ्य आवश्यक आहे हेही ते नाकारत नव्हते पण त्यांना असे वाटायचे की देश सार्थ्यवान होतो तो त्या देशातील जनतेच्या सामर्थ्यावर आणी दुर्दम्य आशावादावार. म्हणून कलाम साहेब या दोन्ही प्रवाहाना एकत्र घेऊन चालत होते. एकीकडे नावीन्यपूर्ण शोध व्हावे,संशोधन व्हावे, संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा आणि हीच प्रगती सामान्य गरीब भारतीय तसेच जगातील इतर दुबळ्या देशांना उपकारक ठरो इतके त्यांचे विचार औदार्य दाखविणारे होते. 
   “ इंडिया २०२० : ए व्हीजन फॉर द न्यू मिलेनियम ” ह्या त्यांच्या पुस्तकांच्या आधारेच तत्कालीन नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.भारतीय लोकांच्या दुर्दम्य आशावाद आणि साहसी वृत्तीवर डॉ.कलामांचा अतूट विश्वास होता.त्यांनी बघितलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी देशातील तरुण, विद्यार्थी  आणि शिक्षक महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असे ते नेहमी प्रतिपादन करायचे. त्यांनी लिहीलेल्या साहित्यामध्ये आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्तींच्या यादीत त्यांच्या शिक्षकाचाही अग्रक्रमाने समावेश होता. इयत्ता ५ व्या वर्गात असताना रामेश्वर येथील शिव सुब्रमन्यम नावाचे शिक्षक होते. त्यांच्या शिकविण्याचा परिणाम म्हणून आपण संशोधन क्षेत्राकडे वळलो असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या स्वप्नातील भारत आणि  त्यासाठी त्यांनी रचलेला पाया हे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करायचे असेल तर आपल्याला आपली शिक्षण पद्धतीसुद्धा त्याचा पद्धतीने राबवावी लागेल. त्यादृष्टीने आजच्या शिक्षण पद्धतीकडे तटस्थपणे बघितले असता आपणास असे लक्षात येते की,भारतीय शिक्षण पद्धती ही संक्रमणातून जात आहे. जी शिक्षण पद्धती ही अगोदर फक्त शिक्षक केंद्रीत होती ती आता विद्यार्थी केंद्रीत होत आहे. विद्यार्थीपूरक ज्ञानरचनावाद आपण आता स्वीकारला आहे आणि त्याकडे आपण यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत. 
         डॉ. कलाम यांना अभिप्रेत असलेली शिक्षण पद्धती अजून आपण राबवू शकलेलो आहोत काय ? तर ह्या प्रश्नाचे १०० % उत्तर होय ! असे मी निदान आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत तरी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणू शकतो. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग आणि प्रत्यक्ष शिक्षकांनी गेल्या दहा वर्षात अथक प्रयत्न करून डॉ. कलाम यांना अभिप्रेत असलेली शिक्षण व्यवस्था अंमलात आणलेली आहे. ही झेप इतकी उत्तुंग आहे की, संपूर्ण भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगाला महाराष्ट्राच्या मातीतील ह्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दाखल घ्यावी लागली. हयाचेच ताजे उदाहरण म्हणजे सोलापूर येथील जि. प. शाळा परतेवाडी  येथील प्राथमिक शिक्षक श्री रंजीतसिंह डिसले गुरुजींना मिळालेला “ ग्लोबल टिचर  अवॉर्ड २०२० ”. शिक्षकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन त्यांच्यातील उपजत कौशल्य जाणून घेऊन त्यादृष्टीने शिक्षणाचा प्रवास हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे. 
             “ देशातील शिक्षक हेच वर्तमानातील विचारवंत असायला हवेत ” असे डॉ. कलाम नेहमी म्हणत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यानुसार आखलेला अभयासक्रम पूर्ण करत असतानाच शाळाबाह्य मुलांना मुळ शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेली “ बालरक्षक चळवळ ” “ तंत्रस्नेही शिक्षण व शिक्षक चळवळ “ “ डिजिटल शाळा ” “समाजसहभाग चळवळ ” विविध नवोपक्रम व विविध शाळाभेटी यामुळे महाराष्ट्र राज्याने स्वत:ला आधुनिक शिक्षणाची यशस्वी प्रयोगशाळा म्हणून सिद्ध केलेलं आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान हे कलाम सरांचे आवडते विषय. पुस्तकी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर विद्यार्थी अधिक परिणामकारपणे अध्ययन करू शकतो. शाळेतील छोटे छोटे चिमुकले आज विविध डिजिटल साधने अगदी कुशलतेने हाताळत आहेत आणि त्यांचे उपयोग सांगत आहेत हे बघायला आज डॉ. कलाम सर असते तर तेही त्यांच्या स्वप्नातील हे नाविन्यपूर्ण प्रयोग बघून नक्कीच भारावले असते. शाळेच्या वर्गखोलीत संपूर्ण ब्रम्हांड कवेत घेण्याचे सामर्थ्य आज आपण प्राप्त केले आहे. हा प्रवास नक्कीच साधा नव्हता. पण डॉ. कलाम सर नेहमी म्हणायचे “ तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण दुसर्‍या प्रयोगात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय हा केवळ नशिबाचा भाग होता, असे म्हणायला अनेक जण सज्ज असतात. ” म्हणून हा न थांबणारा प्रवास आपल्याला निरंतर सुरू ठेवावा लागेल हे मात्र नक्कीच.
     डॉ. कलाम साहेब शिक्षणाच्या बाबतीत फार आग्रही होते. ते नेहमी योगाचे महत्व सांगत. आध्यात्मिक समाजमूल्यांचा ते नेहमी पुरस्कार करायचे. म्हणूनच आपल्या शिक्षण पद्धतीत आपण आता योग शिक्षण समाविष्ट करून घेत आहोत. येणार्‍या काळात भारतात नावीन्यपूर्ण शोधांची नितांत गरज आहे.आपला देश संपूर्ण मानव जातीला काय देऊ शकतो ? याचा जर विचार करायचा झाल्यास आपण उभी केलेली मूल्याधारित शिक्षण व्यवस्था एक सशक्त पर्याय म्हणून नक्कीच समोर येऊ शकते. कलाम साहेबांना अभिप्रेत असलेले मूल्यशिक्षण आज प्रत्येक शाळेमधून बाल मनावर रुजविले जात आहे. “ आधुनिक शिक्षण संशोधनात्मक असावे सोबतच ते मूल्यनिष्ठ असावे ” असे कलाम साहेब नेहमी प्रतिपादन करायचे. त्यांचे हे विचार सत्यात उतरविण्याचा संकल्प आपल्या नवीन शिक्षण पद्धहतीने घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देऊन त्यांना नवीन संशोधनाची संधी आता आपण उपलब्ध करून देत आहोत. मी काय करू शकतो ? किंवा मी  जगाला काय देऊ शकतो ? ह्या गोष्टीचा विचार न करता आपली नवीन शिक्षण पद्धती आपला वैभवशाली वारसा जगाला देण्यास आणास वाव देत आहे. जो वारसा विश्व सहज स्वीकारू शकेल आणि विश्वाच्या कल्याणाच्या कामी येईल. आपली शिक्षण पद्धती डॉ. कलामांच्या ह्या विचाराला सामोरे नेण्यास आज पुर्णपणे सज्ज आहे आणि नवीन ऊर्जा प्राप्त शिक्षक हे शिवधनुष्य लीलया उचलण्यास पूर्णत: सज्ज आहेत असे माला वाटते.
“ आपले शोध, आपले विज्ञान, आपली साधनसंपत्ती, आपले मूल्य हे सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून येणारे असावे ” हे डॉ. कलाम सरांचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरविण्याची सुवर्णसंधी आपल्या शिक्षक बांधवावर आहे. यासाठी कलाम साहेबांचे आयुष्य कायम आपल्याला प्रेरणा देत राहील. आपण सर्व त्यांच्या आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अखंड प्रयत्न करू. हेच आपले कार्य कलाम साहेबांना खरी वंदना ठरेल यात काहीही शंका नाही. 
      “ यशासाठी माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच निराशा  येणार नाही ”. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.



गणेश तुकारामजी कुबडे 
स.अ. उच्च प्राथ. शाळा विखणी,
केंद्र – कांढळी, पं. स. – समुद्रपूर,
जि.प. – वर्धा 
संपर्क क्र. 9689248402 ( What’s app )
         9284226295


Saturday, 2 January 2021

NH - 7 ( तो अकरा तासाचा प्रवास )

   ( सदर कथा ही सत्य आहे वा असत्य, तसं काही नसतं, काहीही काय ? इत्यादी शंका उपस्थित करून वाचू नये.जे मी येथे लिहीत आहे तो माझा एक जुना अनुभव आहे...जो मी आजपर्यंत फार क्वचित लोकांना सांगितला आहे.ज्याचं उत्तर मी आजही शोधत आहे.नेमकं काय होतं ते ? ज्याची जखम आजही हनुवटीवर आहे आणि झोप तर कायमची रुसली आहे असंच म्हणावं लागेल..ना ही रहस्यकथा आहे ना भयकथा म्हणून कुठलाही प्रसंग अतिरंजित करून सादर केलेला नाही.)
     साधारणतः 2007 चा पावसाळा असेल कदाचित.नौकरीनिमित्य यवतमाळ जिल्ह्यातील करंजी ( रोड )  येथे राहणे होते.तेथून कार्यालय 25 कि.मी.दूर. नागपूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग 7 आणि चंद्रपूर - अमरावती राज्य महामार्गाच्या जंक्शन पॉइंटवर वसलेलं करंजी हे एक गांव भारताच्या नकाशात सहज बघता येतं..त्यावेळी माझ्याजवळ  TVS Max 100 ही दुचाकी होती.माझी आवडती गाडी होती ती.चालवायला मजा यायची.दर महिन्यात एकदा किंवा दोनदा नागपूर येणे व्हायचे कधी बसने तर जास्तीत जास्त दुचाकीने.छान प्रवास व्हायचा...नागपूर ते करंजी अंतर 135 कि.मी.मला गाडी वेगाने चालवायला आवडत नाही म्हणून साधारण साडे तीन लागायचे यायला..येताना जाताना रस्तावरील त्या त्या बाजूचे हॉटेल पण ठरलेले असायचे चहा घेण्याकरिता.
       नौकरीनिमित्य 2003 लाच नागपूर सोडलं होतं.एकटं राहणं, स्वतः स्वयंपाक करणं, जंगलात नौकरी तेही आदिवासी भागात त्यामुळे आता कसली भिती वगैरे मनात नसायची..माझी तशी खोली पण गावाबाहेर होती.रात्री लोकं घाबरायची तिकडे यायला..पण त्याचं मला काहीच वाटायचं नाही.बिनधास्त जगण्याची सवय झाली होती. दुचाकी चालविण्याचा अनुभव म्हणाल तर आतापर्यंत जवळपास पाऊणे दोन लाख कि.मी. अंतर पार केलेले आहे..रात्री अपरात्री प्रवास केला पण असा अनुभव फक्त एकदाच आला आणि आयुष्यभरासाठी पुरून उरला..
      एकदा घरी नागपूरला दुचाकीने येणं झालं.छान चार पाच दिवस मुक्काम केला..सर्व भेटीगाठी वगैरे पार पडल्या.गावाकडे परत जायचा दिवस उगवला...जायची इच्छा नव्हती पण जावं लागणार होतं.आई वडीलांना नमस्कार करून घरून दुचाकीने निघालो.पण मन तयार नव्हतं.क्रिकेटच्या दोन बॅट दुचाकीच्या डाव्या बाजूला.कपडे व इतर साहित्य असलेली एक बॅग गाडीवर बांधली सोबत डोक्यावर हेल्मेट आणि साधारण दुपारी एक वाजता घरून निघालो..मेडिकल चौकात येताच अजनी चौकाकडे न जाता त्या संपूर्ण चौकाला एक फेरा मारला आणि दुचाकी माघारी घरी परत वळवली.क्षणात परत विचार बदलला आणि दुचाकी अजनी चौक मार्गे आपल्या मार्गी लावली...पण तो दिवस काहीतरी वेगळं घेऊनच येणार होता... 
     नागपूर - बुटीबोरी - जाम यायला तीन साडेतीन वाजले...चहा प्यायला म्हणून जाम चौरस्त्यावर म्हणजे हैद्राबाद मार्गावर ( NH 7 ) डाव्या बाजूला एक छोट्या हॉटेलवर थांबलो, रस्त्यावरच खुर्च्या होत्या एक चहा मागवला..मी एकटा आपल्या विचारात चहा पित होतो..तेवढयात चंद्रपूर मार्गावरून एक बुलेट गाडी माझ्या बाजूला येऊन थांबली..मी काही तेवढं लक्ष दिलं नाही अगोदर.माझ्या समोरच बसले ते दोघे...माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे.नवविवाहित होते ते दोघे कारण त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता...दोघेही बघायला सुंदर आणि त्यांच्या हातावर मेहंदी पण होती...त्याचं पांढरं शर्ट आणि तिची ती पिवळी साडी( माणसांना फक्त साडीतले लाल,पिवळे,निळे, हिरवे गुलाबी,इ. रंग समजतात बाकी ते रंगछटा वगैरे आमच्या डोक्यावरून जातात ) इतकं बघितलं  आणि मी आपला बसलो होतो...त्या दोघांपैकी त्या माणसाने मला गूढ हास्य करत प्रश्न केला ,“ दादा कुठे जात आहात ? ” मी त्याला गाव वगैरे सांगून मोकळा झालो..व सहज विचारले “ आपण कुठे जात आहात ” तेवढ्यात ती नववधु बोलली “ नागपूर ” मी फक्त स्मित केलं. त्यांनी त्यांचे पैसे दिले आणि नागपूरच्या दिशेने  त्याचा प्रवास सुरु केला.साधारण दोनशे मीटर मी त्या दोघांकडे बघत होतो...मी परत चहा मागविला आणि आरामात बसलो..आकाशात काळे ढग दाटून आले होते..पाऊस नव्हता.पण मी कुठल्यातरी विचारात होतो . मला वेळेचं काहीच भान नव्हतं.शेवटी तो दुकानदार माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “ भाऊ कुठं जाणार आहात..कुणी येत आहे काय ? कुणाची वाट बघत आहात ? ” मी दचकलोच ! म्हटलं,  “कुणाचीच नाही, मी करंजी जात आहे ” तो दुकानदार म्हणाला “ साडे तीन तास झालेत तुम्ही येथे एकटे बसून आहात ” मी भांबावलो !  ( त्यावेळी अँड्रॉईड फोन नव्हता.त्यामुळे त्यात गुंग झालो असंही नव्हतं ) चक्क साडे तीन तास तेही एकाच ठिकाणी....सायंकाळचे पाऊने सात होत आले होते...
       मी लगबगीने माझी दुचाकी काढली.हलका मध्यम पाऊस सुरू झाला त्यामुळे रेनकोट चढविला..आणि समोरचा प्रवास सुरु केला.हिंगणघाट मार्गे वडनेर.पाऊस थांबला होता पण नेमकं माझं मला काही कळत नव्हतं.प्रवास एकदम आरामात सुरू होता.साडे आठ वाजले वडनेर यायला..पाऊस नसल्यामुळे रेनकोट काढला. भूक पण लागली होती..पण तेथे असं रात्रीचं काही विशेष मिळत नव्हतं...म्हटलं चहा घ्यावा.बसलो एका टपरीवर...आता मात्र मला घाई करावी लागणार होती समोरच्या प्रवासाची.मी पैसे दिले आणि निघणार तोच मागून माझ्या कानावर आवाज आला. “ दादा कुठे जात आहात ? ” मी वळून बघितलं आणि सांगितलं आपलं तेच करंजी इ. वडनेरवरून निघालो आणि दहा कि.मी.अंतरावर पोहणा हे गाव लागलं.माझा प्रवास सुरुच होता.अचानक डोक्यात लक्ख वीज कडाडली.वडनेरला ती गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. पण ती “ दादा कुठे जात आहात ? ” असं विचारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हती तर तेच जाम चौरस्त्यावर भेटलेले जोडपं होतं.सोबत बुलेट गाडी.ती त्याच्या मागून स्मित करत उभी होती..आता मी चक्रावलो..वडकी येथे कसाबसा पोहोचलो.आता माझं करंजी गाव होतं ते फक्त वीस कि.मी. रात्रीचे पाऊणे दहा वाजले होते..सर्व परिसर बंद होता फक्त काही हॉटेल सुरू होती.
    मी तेथेच थांबलो आणि विचार केला की, नेमकं हे सुरू काय आहे ? थोडं पाणी पिलं आणि गाडी सुरू करणार तोच एका बंद दुकानामागे थोड्याश्या प्रकाशात मला फक्त एक पिवळा पदर झळकला.आता मात्र मी गोंधळलो.कुणाला काय सांगावे तेच सुचेना.मागे परत फिरावं म्हटलं तर चाळीस कि.मी.हिंगणघाट येण्याशिवाय पर्याय नव्हता कारण तेथे रात्री मुक्कामाची सोय होती आणि करंजी फक्त वीस कि.मी.अंतरावर होतं.साधं कुणाला फोन करण्याचं भान सुद्धा राहिलं नव्हतं.पण माझ्यातील बेदरकार वृत्ती मला समोर जा म्हणून सुचवीत होती.मी गाडी काढली आणि पाऊस लागला.रेनकोट न घालता आता मी प्रवास सुरु केला...थोडा समोर गेलो आणि परत त्याच वडकीला आलो.हॉटेलचा मुलगा मला बघून परत गोंधळला, की आताच हे गेले आणि परत कसे आले म्हणून...? मी काहीच नाही बोललो...आता पर्याय नव्हता...मी घाबरलो होतो असंही नाही म्हणता येणार..मी परत पावसात गाडी काढली..थोडं समोर गेलं की,एक लहानसा ( कुख्यात ) घाट लागायचा.आता चौपदरीकरण झाल्यामुळे तो घाट तेवढा कठीण नाही राहिला.तेव्हा लहान रस्ता होता...
   मी एका ट्रकच्या मागे माझी गाडी चालवत होतो.पण घाटाच्या सुरुवातीला त्याचा वेग अतिशय संथ झाला होता.त्यामुळे मग मी माझी दुचाकी समोर नेली..घाट ओलांडला.आता थोडा जीवात जीव आला होता कारण करंजी आता जवळच होतं..रात्रीचे बारा वाजायला आले होते बहुतेक.आता करंजी गाव आलंच होतं...अंतर फक्त एक कि.मी.असेल बहुतेक...थोड्याच वेळात माझ्या गाडीच्या प्रकाशात मला ती बुलेट गाडी परत दिसली आणि त्या महिलेने आडवं होत मला हात दाखविला...मी कसाबसा सावरून तिला वाचवून गाडी समोर काढली तोच पाठीमागून मला एक जोरदार धक्का बसला.माझी दुचाकी सरळ 90 ° कोनात समोरच्या चाकावर उभी झाली.माझं हेल्मेट डोक्यातून निघालं आणि मी सरळ त्या रस्त्यावर आदळलो....हनुवटीला गिट्टीचा मार बसला...दुचाकीचा समोरचा लाईट,इंडिकेटर,आणि लेग गार्ड अक्षरशः चेंदामेंदा झाले होते.मी तसाच निपचित पडून होतो.दोन मिनिटाने उठलो बहुतेक हनुवटीत गिट्टी फसली होती ती काढली आणि रक्ताची धार लागली...पायाला आणि हाताला जबर मार बसला होता.एक बॅट तुटली.मला सगळं आठवलं मागे वळून बघितलं तर दूर एक बुलेट विरुद्ध दिशेने परत जात होती...( हे मी त्या निरव शांततेत आवाजवरून ओळखलं..) नेमकं त्यावेळी रस्त्याने एकही वाहन नव्हतं.गावात जावं म्हटलं तर सगळीकडे सामसूम दिसत होतं दुरूनच.सर्व हिम्मत एकवटत मी घाईत चाचपडत हेल्मेट उचललं आणि जवळच निर्जन ठिकाणी MSEB ऑफिस होतं तिकडे गाडी वळवली अंधारातच कारण लाईट फुटला होता..तेथे रात्री फक्त एक कर्मचारी असायचा.त्यांचा माझा परिचय होता. कार्यालयातील लाईट सुरू होता.मी दारात गेलो आवाज दिला...पण त्यांनी माझा आवाज ओळ्खलाच नाही..परत दार ठोकलं जोरदार . त्यांनी बाहेरचा लाईट लावला . दार उघडलं आणि मला बघताच त्याला प्रचंड घाम फुटला.  मला जोरदार धक्का मारत तो कर्मचारी बाहेर पळाला.मला वाटलं माझं रक्ताने माखलेला शर्ट बघून ते घाबरले असतील..खूप दूर उभा होता तो कर्मचारी.त्या निर्जन परिसरात आता फक्त आम्हीच दोघे होतो..त्यात मी जखमी...मी त्यांना थोडक्यात सांगितलं...त्यांनी मला घाबरतच कार्यालयातील आरसा बघण्याचा सल्ला दिला..त्या कार्यालयात एक मोठा आरसा होता मी एकटाच कसाबसा त्या आरश्यासमोर उभा राहिलो...आणि प्रचंड घाबरलो कारण माझ्या दोन्ही डोळे आगीसारखे लाल भडक झाले होते...फक्त लाल...त्या कर्मचाऱ्याला मग मी गावातील मित्राचा फोन नंबर सांगितला त्यांनीच फोन केला...चार पाच मित्र आलेत आणि कारमधून मला गावातीलच एका डॉक्टरकडे नेलं...माझे ते डोळे बघून ते मित्र आणि डॉक्टर सगळे प्रचंड घाबरले होते....
        ह्या सर्व प्रकारानंतर जवळजवळ एक आठवडा मी अखंड जागा होतो.इकडे घरी कुणालाच काही सांगितलं नाही... नंतर खूप काही बदललं.काही लोकं दुरावलेत..ती जखम आजही तशीच आहे....झोप कायमची माझ्यावर रुसली आहे...ज्या प्रवासाला साडे तीन तास लागायचे तो अकरा तासाचा प्रवास घडला. हे मी आज तेरा वर्षांनी लिहीत आहे त्यामागेही काहीतरी कारण आहे अज्ञात ; जे शब्दात नाही सांगता येणार...मला आजही तो प्रसंग आठवला की,प्रश्न पडतो की नेमकं काय कारण होतं तसं घडायला...? काय हवं होतं त्यांना ? कधी न घाबरणारा मी तेव्हा मात्र स्वतःला सावरताना त्रास झाला... ते सुंदर जोडपं मला आजही दिसतं अधून मधून...मी पण त्यांचा शोध घेत आहे...आज ते झोपताना परत दिसलं...म्हणून रात्री बारा ते आता साडे चार वाजता पर्यंत लिहितच आहे...कदाचित न संपणारं जागरण आयुष्यभराचं ????
 
- गणेश

Tuesday, 10 November 2020

एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास

शालेय जीवनात इयत्ता आठवीपासून एडॉल्फ हिटलर या नाझी जर्मन सेनानीची ओळख होऊ लागली नंतर या व्यक्तिमत्वाने मला ओढ लावली.मिळेल तेथे व जमेल तेवढी पुस्तके वाचलीत या योध्यावर...त्यांचं चरित्र,वार्सा ते हिरोशिमा,दुसरे महायुद्ध आणि जग,हिटलर,इ. अनेक पुस्तके वाचलीत वाचताना मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. असं कसं या एका योध्याने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं ? त्याने खरंच जे इतिहासात सांगितलं जातं तसा नरसंहार केला होता काय ? हिटलर खरंच युद्धपिपासू होता काय ? त्यावेळची नेमकी परिस्थिती काय असावी ? जी पुस्तके वाचलीत त्यांनी या प्रश्नाची उत्तरे कधीच नाही दिलीत...तेव्हा तेथेच थांबलो पण प्रश्न मनात कायम ठेऊन.
         मग शिक्षण आणि नौकरी निमित्त्यानं थोडं वाचन कमी झालं पण थांबलं नाही...एकदा एका मुलाखतीत आमच्या एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की,दुसऱ्या महायुद्धाला कोण जबाबदार होतं ? मी उत्तर दिलं इंग्लंड.त्यांनी थोडं स्मित केलं.वर्षे लोटलीत आणि फेब्रुवारी 2019 ला फेसबुक वर एका पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात म्हणू या किंवा निमंत्रण बघण्यात आले. पुस्तकाचं नावं होतं “ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ” शिर्षक बघताच माझ्यातील वाचक पुन्हा जागा झाला.मी सरळ पुस्तकाचे लेखक मा.श्री पराग वैद्य सरांना फोन केला पुस्तकाची माहिती घेतली आणि श्री सच्चिनानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशित सदर पुस्तकाची कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे येथे मागणी नोंदविली...लेखकांचा आणि माझा एवढाच काय तो परिचय...
          मनोगत व्यक्त करताना लेखक महोदयांनी पुस्तकाच्या नवव्या पानात आपल्या सर्व धारणांना हादरा दिलाय. हे पुस्तक म्हणजे काही कादंबरी नाही आहे.ना लेखकांनी कुठेही कल्पनेचे उंच झोके घेतले आहेत. जवळपास बारा वर्षे शेकडो पुस्तकांचे अखंड अध्ययन करून त्यांनी तटस्थपणे फक्त सत्यकथन केलेले आहे.यावरून लेखकांची प्रचंड मेहनत लक्षात येते.एखादया प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर ते आपल्या शत्रूच्या गोटातून मिळवावं असं म्हणतात.लेखकांनी नेमकं तेच केलं त्यांनी नाझी जर्मन शत्रूच्या गोटात लिहिली गेलेली पुस्तके..प्रतिवृत्ते...इंग्लंड,अमेरिका,पोलंड,फ्रान्स,रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख,त्यांचे परराष्ट्र मंत्री,सचिव, राजदूत,इतर देशातील उच्च पदावरील शासनकर्ते यांच्यातील गुप्त चर्चा, दूरध्वनी,त्यांचे पत्रव्यवहार,त्यांच्या वैयक्तिक नोंदी,जगात विविध देशात एडॉल्फ हिटलवर लिहिली गेलेली हजारो पुस्तके,जागतिक वृत्तपत्रे व त्यातील लेख यांचा सखोल अभ्यास करून सदर पुस्तक आपल्या समोर मांडले आहे.नाझी शत्रूंना नेमके हिटलर या असामान्य योध्याविषयी काय वाटत होते आणि हेतुपुरस्सर जगापासून तो इतिहास का लपवला गेला ???  संपूर्ण जगास उत्तरार्ध सांगितला गेला पण पूर्वार्ध आपणापासून का दडवून ठेवण्यात आला.?नेमका हाच वेध या पुस्तकात घेतला गेला आहे. आपल्याविषयीचे अचूक सत्यकथन आपला शत्रूच करू शकतो,याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही.सातशे अडतीस पानाच्या या पुस्तकात एकशे पंचवीस पाने फक्त संदर्भ ग्रंथाची यादी प्रसिद्ध करायला लागली आहेत.यावरून या पुस्तकाची सत्यता,भव्यता आणि मा.लेखक श्री पराग वैद्य सरांची चिकाटी आपल्या लक्षात येते.
        आज ऐतिहासिक संदर्भात आपण आपल्या अवतीभोवती जे बघतोय आणि आपली धारणा करून बसतो ते अर्धसत्य असते.अन्यथा ब्रम्हचार्याचे व्रत करताना टेकू म्हणून आपले हात ठेवायला स्त्रिया कशाला हव्यात? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध कशाला हवे ???? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.सत्याच्या आड कुणाची तरी चमचेगिरी करायची आणि शांततेच्या बाता मारताना आपले धार्मिक अहंगंड कसे पूर्णत्वास नेले जातात याचा नेमका वेध या पुस्तकाने घेतला आहे..जेमतेम फक्त सहा महिने पुरेल एवढी युद्धसिद्धता असताना हिटलरने खरेच जागतिक युद्ध पुकारले होते काय? एका असामान्य योध्याने आपल्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे साठ लाख ज्यूंची हत्या केली होती काय?? जर्मनीत नेमके ज्यूंचे स्थान काय होते अथवा एक नागरिक म्हणून जर्मन देश उभारणीत त्यांची भूमिका काय होती याचा इतिहास खूपच मनोरंजक आहे.जर्मनीत वास्तवात गॅस चेम्बर होते काय?? आपणास जे गॅस चेंबर दाखविले गेले मग ते कोणत्या देशात उभारले गेले होते ?? तेथे नेमके काय सुरू होते ? दुसरे महायुद्ध हे एखादया सिनेमाच्या कथेप्रमाणे जर्मनीवर नाझी शत्रूंनी का लादले त्यातुन त्यांना काय हस्तगत करायचे होते ?? हे आजही गूढ आहे. हे गूढ आपणापासून हेतुपुरस्सर का दडविण्यात आले ??? या जगात खरंच सहिष्णुता सर्वधर्म समभाव नावाच्या गोष्टी असतात काय ??? की आपल्याला फक्त मूर्ख बनविले जाते...याचे उत्तर शोधणे हे आपले कर्तव्य आहे.कर्तुत्वशून्य माणसाला महान(महात्मा) म्हणून सांगायचे आणि जो आपल्या वैयक्तिक स्वार्थाआड येतो त्या महान सेनानीला अगदी योजनाबद्ध पद्धतीने खलनायक ठरवायचे हा आजवरचा इतिहास तपासायची तयारी असेल तर नेमकं हे पुस्तक वाचावे...
       युद्ध हे ज्या देशांचे व्यसन होते आणि शस्त्र विक्रीतून मानवी संहार हे ज्यांचे ध्येय होते तेच देश आजही संपूर्ण जगाला शांततेचे आणि निशस्त्रीकरणाचे उपदेश देत असतात. जो अमेरिका आज संपूर्ण जगाला दहशतवाद विरोधी ब्रम्हज्ञान सांगत असतो, त्याचे स्वतःचे दुसऱ्या महायुद्धकालीन दहशतवादी कृत्ये या पुस्तकाने समोर आणली आहेत.तसेच आजच्या काळातील इराक व लिबिया येथे त्यांनी केली कृत्ये याचीच साक्ष देतात. जपान या देशाची अगतीकता त्यातून त्या देशाने स्वरक्षणार्थ उचललेले पाऊल याविषयी खूप विस्ताराने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे त्याउलट रशियाचा विस्तारवाद व त्यांच्या सेनेने संपूर्ण मानव जातीला लाजवून सोडतील अशी केलेली महाभयानक कृत्ये वाचतानाआपल्यालाही हादरवून सोडतात आणि नेमका हाच इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे.आपल्याला ज्ञात नसलेले जैविक व रासायनिक युद्ध नाझी शत्रूंनी कसे पुर्णत्वास नेले.याचे संपूर्ण विस्तारीत विवरण या पुस्तकात मा.पराग वैद्य सरांनी अगदी अचूक मांडले आहे.
        आपला छुपा धार्मिक विस्तारवाद जगावर थोपविण्यासाठी नाझी शत्रूंनी एक काल्पनिक शत्रू उभा करून संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले व वरून खोटा मानवता वादाचा बुरखा चढवत आपली पापे लपवून ठेवलीत.स्वतःला लोकशाही देश म्हणविणाऱ्या नाझी शत्रूंनी केलेल्या भयानक कत्तली जेव्हा या पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा आपणास चीड यावी इतके दुसरे महायुद्ध हे प्रकरण गंभीर आहे.या युद्धात खरंच अणूबॉम्ब वापरण्याची गरज होती काय ??? की अमेरिका ता देशाला त्याची युद्ध खुमखुमी भागवायची होती? नोबेल पारितोषिक विजेता व अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या माणसाची वास्तविकता काय होती?? मनात आणले असते तर सर्व नियम धाब्यावर बसवून हिटलरला हे युद्ध जिंकता आले असते काय??? या सर्व प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला गेलेला आहे.हे युद्ध पद्धतशिरपणे घडवून आणून इतका मोठा मानवी नरसंहार का केला गेला ? हे ज्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचवयास हवे.असं म्हणतात की युद्ध हे कोणत्याच समस्येवर उपाय नसते.पण ते आपल्या देशाच्या आणि वंशाच्या संरक्षणासाठी लढावेच लागते. हिटलर या असामान्य योध्याने व लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी ते लढून आपले कर्तव्य पार पाडले.
         मी काही समीक्षक नाही व तेवढी माझी पात्रता पण नाही. एक वाचक म्हणून मला जे वाटले ते मी येथे लिहिले आहे...खूप वर्षांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला मिळाले याबद्दल मी या पुस्तकाचे लेखक श्री पराग वैद्य सरांचे खूप खूप आभात मानतो. यासाठी त्यांनी जे शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण सहन केला आहे त्याला तोड नाही.लेखकाच्या मनोगतापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपणास लेखकांनी खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे आणि पुन्हा तोच विपर्यास केला गेलेला इतिहास आपल्या धारणांना हादरे देत जिवंत केला आहे. ज्या व्यक्तीवर आजवर हजारो पुस्तके लिहून त्याचं चारित्र्य हणन करण्यात धन्यता मानली गेली नेमकं त्याच प्रवाहाविरुद्ध बंड करून एका असामान्य योध्याला व राष्ट्रपुरुषाला न्याय देण्याचे धाडस या पुस्तकाचे लेखक मा. श्री पराग वैद्य सरांनी केले, त्याबद्दल मी स्वतः त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. नक्की वाचा....


“ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ”
लेखक - श्री पराग वैद्य
प्रकाशक - कॉन्टिनेंनटल प्रकाशन, पुणे
भ्रमणध्वनी - 9881493820

         

Thursday, 3 September 2020

मेटाकुटीस आलेल्या हेमाचे मनोगत

सांगा ना साहेब म्या गुन्हा काय केला
कोरोना का माया घरातून आला
शाळा तं साऱ्याच बंद हायेत
मंग रोज काऊन बा माईच गचांडी धरता
सकाळी एक अन दुपारी एक 
असे रोज काऊन तुमी कागदं नवे नवे मांगता
आलटून पालटून तेच तर विचारता
फक्त रकाने मांग पुढं करता...
सांगा ना सायेब ह्या कागदाचं
मंग खरंच तुमी काय बुवा करता ???
देतो ना जी माहिती वेळात 
पण काऊंनजी तुमच्या पत्रात सूचना कमी
इशारे जास्त असतात
फुकटात कोणी येत नाही जी आता शिकवाले
कोणता स्वयंसेवक आणि कोणते सेवानिवृत्त
सारेच आहेत घरात बसून
ते तुमालेच लय बरं वाटते कागदावर
त्यायची हाजी हाजी करता
इकडं माई जाते लागून....
सांगा ना सायेब म्या गुन्हा काय केला...
बरं सायेब एवढी माहिती मांगुन
एकातरी गरीबाले सरकारनं देला काजी घेऊन फोन
मी आपला करतो गावात जुगाड 
तर तिकडून बी तुमाले रोज पायजे माहिती हमखास
तांदूळ वाटले,मुंग,हरभरा वाटला,
तेल वाटलं, तिखट वाटून नाकाले आली खेस
अन ह्यो कागदं लिवता लिवता मा तोंडाले येते 
दिवसातून दोनदा फेस....
सांगा ना साहेब म्या गुन्हा काय केला...

- गणेश
©©©©©



Saturday, 1 August 2020

नात्याचं ऑडिट ...

       बालपणापासून ते अगदी वार्ध्यक्यापर्यंतचा  आपला प्रवास ; म्हटलं तर खूप लांबलचक खाच खळग्यांनी भरलेला किंवा अगदीच क्षणभंगुर.कधी कधी आनंदाची झालर.अतृप्त इच्छांची शिदोरी तर कधी सुखावलेले ते क्षण.ह्या साऱ्या प्रवासात आपण कधी एकटे असतो तर कधी आपले आप्तस्वकीय अथवा मित्र मैत्रिणी.ह्या सर्वांना सोबत घेऊनच आपण आपल्या सुख दुःखाना सामोरे जात असतो.कदाचित एखाद्याची सोबत असली तर आपल्यालाही धीर मिळतो.मग आपणही आपल्या  मित्र म्हणा अथवा मैत्रीण म्हणा त्याला तिला गृहीत धरू लागतो.प्रत्येकवेळी तो किंवा ती आपल्यासाठी हजर असला पाहिजे अशी आपली समजूत होऊन जाते.बघता बघता आयुष्याचा आपण अश्या टप्प्यावर येऊन थांबता जेथे रोज भेटणारे आपले सवंगडी नजरे आड झालेले असतात.त्यात परत नवीन लोकं जुळली जातात.जुन्या जाणत्या आपल्या सवंगड्यांना आता भेटण्यासाठी वेळ मागावी लागते.असं भरपूर काही घडतं.पण ती ओढ मात्र कायम राहते.
        एखाद्याला त्याच्या गुण दोषासह स्वीकारणे म्हणजे खरी मैत्री असं मला वाटतं.मी म्हणतो म्हणून तु असा वाग किंवा मी म्हणतो म्हणून तु असं जीवन जग याची जेथे सुरुवात होते ते नातं लादलेलं असतं.जगात खरं नातं असतं ते मैत्रीचं.कुठलीही अपेक्षा न बाळगता व्यक्त होणारं आणि दोन्हीकडून शेवटपर्यंत निभावून नेण्याची तयारी असलेलं.पण कधी कधी एक वेळ अशी येते (येथे फक्त मित्र अथवा मैत्रीण अपेक्षित नाही) की, एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं त्याच्यासाठी खरंच इतकं महत्वाचं असतं का जितकं आपण समजत होतो.की निव्वळ ती काळाची गरज होती.आपलं प्रेम, आपुलकी,आपण त्याला किंवा त्याने आपल्याला दिलेला आधार हा क्षणिक होता की चिरकाल टिकणारा ह्याविषयी पण शंका यायला लागते.आपण त्याला अथवा तिला स्वीकारलं म्हणजे नेमकं काय ? किंवा ते फक्त काळाची गरज म्हणून निर्माण झालेलं नातं होतं ह्याविषयी चिंतन करणे गरजेचं आहे.जेव्हा नात्यात तिकडून अथवा आपल्याकडून एकतर्फी गोष्टी व्हायला लागतात तेव्हा त्या नात्याला तपासून बघावं एकदा तरी.नात्याचं पण ऑडिट व्हायलाच हवं.
      एखाद्याच्या आयुष्यात आपण खूप महत्वाचे आहोत हा भ्रम शेवटी आपल्याला निराशेकडे घेऊन जाणारा असतो.आपल्यासारखे भरपूर असतात तिकडे जिवलग, विश्वासू,काळजी घेणारे वगैरे. तुम्ही स्वतःचा भ्रम करून घेतला याला समोरचा तरी काय करणार.एखाद्या विशिष्ट कालावधीत तुम्ही एखाद्याच्या संपर्कात आला असाल आणि तुमचं जर छान ट्युनिंग जमलं असेल तर याचा अर्थ असा नाही की, आयुष्यभर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजविण्यास मोकळे आहात.आपली गल्लत कुठे होते माहिती आहे.समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली भूमिका काय आणि कितपत असावी ह्याचा आपण अंदाजच घेत नाही....नंतर हळूहळू आपला भ्रमनिरास व्हायला लागतो. आजकाल सगळं Online झालं असल्यामुळे असेल कदाचित जिव्हाळा कमी आणि फक्त औपचारिकता म्हणून सारे सोपस्कार पार पाडले जातात....कधी एखाद्याशी आपण खूप बोलतो,खूप सांगतो समोरचा व्यक्ती पण खूप आतुरतेने आपली वाट बघतो...काही काळ हे सगळं छान वाटतं..पण समोरून जर सतत Hmm, Ok असे हुतुपुरस्सर reply यायला लागले  की, तेथेच सावध व्हा,स्वतःला तपासा. आपली खरी गल्लत होते ती येथे आपलं मन आपल्याला सांगत असतं पण आपल्याला स्वतःला समजून घ्यायला वेळ नसतो त्याक्षणी...
    वेळ पाहून वेळ देणारे आयुष्यात भरपूर भेटतील, पण वेळ नसतानाही इतरांकरीता वेळ काढणारे मजकेच असतात... आणि शेवटी अशाच लोकांच्या आयुष्यात तिरस्कार आणि अवहेलना येते. नीट एकदा तपासा नातं दोन्हीकडून तोलामोलाचं आहे की,तुम्हीच त्यात आपला मान सन्मान गमावून हरखून गेला आहात.तुमच्या असण्याने किंवा नसण्याने दोघांनाही सारखाच त्रास होणार आहे काय ? की तुम्ही त्याच्यासाठी एक टाईमपास आहात.कारण ज्याला तुमची गरजच नाही ते नातं टिकविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या लोकांना नकळत दुखावत असतो..समोरचा व्यक्ती आपल्याशिवाय छान जगत असेल तर आपण आपल्या जागीच थांबलेलं बरं कारण अश्या ठिकाणी आपल्याला कायमची निराशा हाती लागते.वेळ निघून गेल्यावर मागे वळून बघतो म्हटलं तर आपली सावलीही आपला साथ सोडून गेलेली असते...
     म्हणून लवकर जागे व्हा आणि नात्याचं ऑडिट करा.तुमचं आणि समोरच्या व्यक्तीच्या नात्याचं खाते तपासून बघा....आपले दोष आपण शोधलेले कधीही फायद्याचं...


गणेश