बोधकथा

Thursday, 3 September 2020

मेटाकुटीस आलेल्या हेमाचे मनोगत

सांगा ना साहेब म्या गुन्हा काय केला
कोरोना का माया घरातून आला
शाळा तं साऱ्याच बंद हायेत
मंग रोज काऊन बा माईच गचांडी धरता
सकाळी एक अन दुपारी एक 
असे रोज काऊन तुमी कागदं नवे नवे मांगता
आलटून पालटून तेच तर विचारता
फक्त रकाने मांग पुढं करता...
सांगा ना सायेब ह्या कागदाचं
मंग खरंच तुमी काय बुवा करता ???
देतो ना जी माहिती वेळात 
पण काऊंनजी तुमच्या पत्रात सूचना कमी
इशारे जास्त असतात
फुकटात कोणी येत नाही जी आता शिकवाले
कोणता स्वयंसेवक आणि कोणते सेवानिवृत्त
सारेच आहेत घरात बसून
ते तुमालेच लय बरं वाटते कागदावर
त्यायची हाजी हाजी करता
इकडं माई जाते लागून....
सांगा ना सायेब म्या गुन्हा काय केला...
बरं सायेब एवढी माहिती मांगुन
एकातरी गरीबाले सरकारनं देला काजी घेऊन फोन
मी आपला करतो गावात जुगाड 
तर तिकडून बी तुमाले रोज पायजे माहिती हमखास
तांदूळ वाटले,मुंग,हरभरा वाटला,
तेल वाटलं, तिखट वाटून नाकाले आली खेस
अन ह्यो कागदं लिवता लिवता मा तोंडाले येते 
दिवसातून दोनदा फेस....
सांगा ना साहेब म्या गुन्हा काय केला...

- गणेश
©©©©©



Saturday, 1 August 2020

नात्याचं ऑडिट ...

       बालपणापासून ते अगदी वार्ध्यक्यापर्यंतचा  आपला प्रवास ; म्हटलं तर खूप लांबलचक खाच खळग्यांनी भरलेला किंवा अगदीच क्षणभंगुर.कधी कधी आनंदाची झालर.अतृप्त इच्छांची शिदोरी तर कधी सुखावलेले ते क्षण.ह्या साऱ्या प्रवासात आपण कधी एकटे असतो तर कधी आपले आप्तस्वकीय अथवा मित्र मैत्रिणी.ह्या सर्वांना सोबत घेऊनच आपण आपल्या सुख दुःखाना सामोरे जात असतो.कदाचित एखाद्याची सोबत असली तर आपल्यालाही धीर मिळतो.मग आपणही आपल्या  मित्र म्हणा अथवा मैत्रीण म्हणा त्याला तिला गृहीत धरू लागतो.प्रत्येकवेळी तो किंवा ती आपल्यासाठी हजर असला पाहिजे अशी आपली समजूत होऊन जाते.बघता बघता आयुष्याचा आपण अश्या टप्प्यावर येऊन थांबता जेथे रोज भेटणारे आपले सवंगडी नजरे आड झालेले असतात.त्यात परत नवीन लोकं जुळली जातात.जुन्या जाणत्या आपल्या सवंगड्यांना आता भेटण्यासाठी वेळ मागावी लागते.असं भरपूर काही घडतं.पण ती ओढ मात्र कायम राहते.
        एखाद्याला त्याच्या गुण दोषासह स्वीकारणे म्हणजे खरी मैत्री असं मला वाटतं.मी म्हणतो म्हणून तु असा वाग किंवा मी म्हणतो म्हणून तु असं जीवन जग याची जेथे सुरुवात होते ते नातं लादलेलं असतं.जगात खरं नातं असतं ते मैत्रीचं.कुठलीही अपेक्षा न बाळगता व्यक्त होणारं आणि दोन्हीकडून शेवटपर्यंत निभावून नेण्याची तयारी असलेलं.पण कधी कधी एक वेळ अशी येते (येथे फक्त मित्र अथवा मैत्रीण अपेक्षित नाही) की, एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं त्याच्यासाठी खरंच इतकं महत्वाचं असतं का जितकं आपण समजत होतो.की निव्वळ ती काळाची गरज होती.आपलं प्रेम, आपुलकी,आपण त्याला किंवा त्याने आपल्याला दिलेला आधार हा क्षणिक होता की चिरकाल टिकणारा ह्याविषयी पण शंका यायला लागते.आपण त्याला अथवा तिला स्वीकारलं म्हणजे नेमकं काय ? किंवा ते फक्त काळाची गरज म्हणून निर्माण झालेलं नातं होतं ह्याविषयी चिंतन करणे गरजेचं आहे.जेव्हा नात्यात तिकडून अथवा आपल्याकडून एकतर्फी गोष्टी व्हायला लागतात तेव्हा त्या नात्याला तपासून बघावं एकदा तरी.नात्याचं पण ऑडिट व्हायलाच हवं.
      एखाद्याच्या आयुष्यात आपण खूप महत्वाचे आहोत हा भ्रम शेवटी आपल्याला निराशेकडे घेऊन जाणारा असतो.आपल्यासारखे भरपूर असतात तिकडे जिवलग, विश्वासू,काळजी घेणारे वगैरे. तुम्ही स्वतःचा भ्रम करून घेतला याला समोरचा तरी काय करणार.एखाद्या विशिष्ट कालावधीत तुम्ही एखाद्याच्या संपर्कात आला असाल आणि तुमचं जर छान ट्युनिंग जमलं असेल तर याचा अर्थ असा नाही की, आयुष्यभर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजविण्यास मोकळे आहात.आपली गल्लत कुठे होते माहिती आहे.समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली भूमिका काय आणि कितपत असावी ह्याचा आपण अंदाजच घेत नाही....नंतर हळूहळू आपला भ्रमनिरास व्हायला लागतो. आजकाल सगळं Online झालं असल्यामुळे असेल कदाचित जिव्हाळा कमी आणि फक्त औपचारिकता म्हणून सारे सोपस्कार पार पाडले जातात....कधी एखाद्याशी आपण खूप बोलतो,खूप सांगतो समोरचा व्यक्ती पण खूप आतुरतेने आपली वाट बघतो...काही काळ हे सगळं छान वाटतं..पण समोरून जर सतत Hmm, Ok असे हुतुपुरस्सर reply यायला लागले  की, तेथेच सावध व्हा,स्वतःला तपासा. आपली खरी गल्लत होते ती येथे आपलं मन आपल्याला सांगत असतं पण आपल्याला स्वतःला समजून घ्यायला वेळ नसतो त्याक्षणी...
    वेळ पाहून वेळ देणारे आयुष्यात भरपूर भेटतील, पण वेळ नसतानाही इतरांकरीता वेळ काढणारे मजकेच असतात... आणि शेवटी अशाच लोकांच्या आयुष्यात तिरस्कार आणि अवहेलना येते. नीट एकदा तपासा नातं दोन्हीकडून तोलामोलाचं आहे की,तुम्हीच त्यात आपला मान सन्मान गमावून हरखून गेला आहात.तुमच्या असण्याने किंवा नसण्याने दोघांनाही सारखाच त्रास होणार आहे काय ? की तुम्ही त्याच्यासाठी एक टाईमपास आहात.कारण ज्याला तुमची गरजच नाही ते नातं टिकविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या लोकांना नकळत दुखावत असतो..समोरचा व्यक्ती आपल्याशिवाय छान जगत असेल तर आपण आपल्या जागीच थांबलेलं बरं कारण अश्या ठिकाणी आपल्याला कायमची निराशा हाती लागते.वेळ निघून गेल्यावर मागे वळून बघतो म्हटलं तर आपली सावलीही आपला साथ सोडून गेलेली असते...
     म्हणून लवकर जागे व्हा आणि नात्याचं ऑडिट करा.तुमचं आणि समोरच्या व्यक्तीच्या नात्याचं खाते तपासून बघा....आपले दोष आपण शोधलेले कधीही फायद्याचं...


गणेश



Monday, 22 June 2020

“ रॉ " भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा

      स्थळ :- शत्रूराष्ट्राच्या राजधानी शहरापासून अवघ्या साठ कि.मी. अंतरावरील एक गाव. अनेक दिवसापासून तो त्या व्यक्तीच्या पाळतीवर होता.त्याचे जाणे -  येणे , त्याच्या सवयीवर तो स्वतःच्या जीवावर उदार होऊन पाळत ठेवत असतो. शत्रू राष्ट्राचा शास्त्रज्ञ होता तो . महिन्यातून एका विशिष्ट दिवशीच ती व्यक्ती एका सलूनमध्ये जात असे.बस्स असाच एकेदिवशी त्या शास्त्रज्ञाचा पाठलाग करत ही व्यक्ती त्या सलूनमध्ये प्रवेश करते.कुणाला काही समजायच्या आत कुणालाही धक्का न लावता तो तेथील एक साधारण वाटणारी  आपल्या सामान्य जीवनातील सूक्ष्म वस्तू हस्तगत करतो. मग काय इकडे भारतात शत्रूराष्ट्राने जीवापाड जपलेले गुपित उघड होते.त्या गावात एक हजार एकर परिसरात भूमिगत लष्करी प्रयोगशाळा असते अर्थात तेथे सुरू असते भारताविरुद्ध वापरासाठी अणुबॉम्बचा शोध. युरोनियम व प्लुटोनियम मिळविण्यासाठी गुप्तसंशोधन.जगापासून लपून असलेली ती प्रयोगशाळा..भारताचा हेतू एकच असतो तो म्हणजे शत्रू राष्ट्राची युरोनियंम मिळविण्याची तयारी कोणत्या टप्प्यात आहे… हेतु पूर्णतः साध्य होतो.कोण होती ती पाळत ठेवणारी व्यक्ती ? काय हस्तगत करते ती त्या सलूनमधून ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा मनोविकास प्रकाशन , पुणे तर्फे प्रकाशित श्री रवि आमले लिखित “ रॉ "  भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा  ”  ( सातवी आवृत्ती 26 जानेवारी 2020 )
       स्वर्गीय पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांच्या दूदृष्टीतून बाळसं धरलेली भारतीय गुप्तचर संस्था म्हणजे “ रॉ ”                ( स्थापना 1968 ) जगातील प्रथम पाच गुप्तचर संस्थेत गणली जाणारी भारताची “ रॉ ”. येता जाता इजरायलच्या “ मोसाद ” अमेरिकेच्या CIA किंवा रशियाच्या KGB चे गोडवे गाणाऱ्यांनी एकदा हे पुस्तक नक्की वाचावे. अदभूत, अकल्पनिय, अविश्वसनीय असे शब्दही कमी पडावे अशी ह्या " रॉ " ची कहाणी शब्दबद्ध केली आहे ती लेखक श्री रवि आमले यांनी. भारतीय गुप्तचर त्यांनी निवृत्तीनंतर लिहिलेले लेख, गोपनीय कागदपत्रे विविध संदर्भ ग्रंथ तद्वतच काही नाव न उघड करता येणाऱ्या “ रॉ ” प्रमुखांच्या मुलाखती यांचा आधार घेऊन लिहिलेले हे पुस्तक अतिशय रोमहर्षक पातळीवर आपणास नेऊन ठेवते. “ रॉ ” स्थापन झालीच मुळी शत्रूराष्ट्रात हेरगिरीसाठी. पण ही संस्था चालते ती आजही कौटिल्याच्या ( चाणक्य ) तत्वावर...छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श हेरखात्याच्या ( बहिर्जी नाईक ) यांना समोर ठेऊन. या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती  पुस्तकात दिली आहे. हेरगिरी म्हणजे काय ? शत्रूराष्ट्रातील लोकांना फितूर कसे करावे ? त्यासाठी कोणती माणसे निवडावी याचे फार तंत्रशुद्ध विवेचन केलेलं आहे सदर पुस्तकात.
    शत्रूराष्ट्र आक्रमक आहे,अनैतिक आहे. आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय मंचावर असणे हे आपल्यासाठी नेहमीच फायद्याचे असते आणि हे नैतिक बळ गामवणे हानिकारक असू शकते.म्हणूनच गुप्तचरांनी केलेल्या कारवायांच्या तत्कालीन परिस्थितीत बढाया मारायच्या नसतात.त्या अंधारातच असलेल्या बऱ्या.त्याचा फायदा मात्र संपूर्ण देशाला होत असतो. कालांतराने त्या समोर येतातच गूढकथा बनून.गेल्या सत्तर वर्षात आपल्या देशात काहीच नाही झाले. असा एक भ्रम पसरविण्यात येतो. राजकारणाचा भाग सोडला तर मी म्हणू शकतो की, गेल्या पन्नास वर्षात जे “ रॉ ” ने केलं ते कुणीच नाही केलं.साधं बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध जरी उदाहरण म्हणून घेतलं तरी हे आपल्या सहज लक्षात येईल.1971 च्या त्या लढाईत भारताने भुराजकीय स्थैर्य प्राप्त केले.एका देशाचा नकाशा बिघडविला आणि भारताला भविष्यात ज्या अनर्थाला तोंड द्यावयाचे होते त्यापासून मुक्तता दिली.त्याची गोड फळे आज आपला देश चाखत आहे..हे एक विस्तृत प्रकरण लेखकाने अतिशय नेटकेपणाने आपल्यासमोर मांडले आहे...ते युद्ध अपरिहार्य का होते तर त्यामागे अनेक अकल्पनिय असे संदर्भ होते. एक प्रश्न असाही येतो की, बांग्लादेश युद्धाच्या वेळी जे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले होते त्याबदल्यात मा.इंदिराजींनी पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर परत का नाही घेतला ??? पण त्यापेक्षा एक मोठी समस्या भारतापुढे पर्यायाने “ रॉ ” पुढे होती अन्यथा ते युद्ध जिंकूनही आपण हरल्यासारखे झाले असते.काय होतं ते गूढ ? याचाही मुद्देसूद उहापोह सदर पुस्तकात केलेला आहे. 
      आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते,तसेच असते, असे नसते. त्यामागे असतात ते अनंत जटील प्रश्न,राजकारण आणि स्वार्थ. जो प्रत्येकाला साध्य करून घ्यायचा असतो.ह्याच कुरघोडीच्या राजकारणात सतत कार्यरत असते ती आपली गुप्तचर संस्था. त्यांच्या या कार्यात नैतिक अनैतिक या शब्दाला कुठेच थारा नसतो.नैतिकतेच्या अगदी उच्च पातळीवर ते अनैतीकतेच्या अगदी खालच्या पातळीवर जाऊन आपले हेतू साध्य करणे हेच त्यांचे ध्येय असते.कारण त्यांच्यापुढे असते  एकच ध्येय ते म्हणजे आपला देश....त्यांचे सर्व कार्य पडद्यामागे ठेऊन त्याला नैतिकतेची झालर देण्याचे कार्य असते हे आपल्या देशातील तत्कालीन सरकारचे....आणि हेच सदैव सुरू असतं.हेरगिरीचा खेळ नेहमीच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामगे सुरू असतो...कधी समोर.तसेच “ रॉ ” ला प्रत्येकवेळी त्या त्या काळात सरकारी समर्थन मिळालेच असेही नाही.त्याचेही पडसाद आपणास अगदी विशिष्ट मर्यादेत बघायला मिळतात म्हणजे काही ठिकाणी तत्कालीन सरकारने “ रॉ ” ला आडकाठी सुद्धा आणली पण अगदी अपवादानेच.तो सुद्धा एक गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे.लेखकाने ही सर्व प्रकरणे कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या प्रतिमेला तडा न जाऊ देता आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहेत.
     सदर पुस्तकात “ रॉ ” च्या स्थापनेपासून ते अगदी अलीकडे घडलेल्या अगदी ठळक घटनांचा संदर्भासह उल्लेख करण्यात आलेला आहे. बांग्लादेश मुक्तीसंग्राम, सिक्कीम विलीनीकरण,पोखरण अणूचाचणी,ऑपरेशन ब्लुस्टार, खलिस्तान चळवळ,ऑपरेशन काहुटा, सियाचीन प्रकरण,श्रीलंका - लिट्टे प्रकरण, मा.पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, कारगिल युद्ध,मिशन नेपाळ, काश्मीर समस्या, कुलभूषण जाधव प्रकरण इ. अनेक विषयांवर “ रॉ ” भूमिका आणि कामगिरी याचा चित्तथरारक वेध घेण्यात आला आहे...पण ह्या सर्व यशाच्या पायऱ्या चढत असताना “ रॉ ” ला काही ठिकाणी हारसुद्धा पत्करावी लागली एक म्हणजे माजी पंतप्रधान मा.इंदिरा गांधी आणि मा.राजीव गांधी यांची झालेली हत्या...ह्या भळभळत्या जखमा घेऊन भारतीय गुप्तचर संस्थेचे कार्य अगदी चोवीस तास सुरू असतं कधीकधी काळाच्या एक पाऊल पुढे म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये.
       भारताचे सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता कायम ठेवत भारताचे हे हेर आपलं संपूर्ण आयुष्य एका ध्येयाला वाहून घेऊन कार्य करत असतात.याची झळ त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा पोहचत असते.पण त्याच्यासमोर देश मोठा असतो. “ रॉ ” च्या अनेक ज्ञात अज्ञात गुप्तचरांनी आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या मोहिमांची चित्तथरारक माहिती आपणास येथे मिळते.गुप्तचारांचे हे काम कधीही न थांबणारे आणि संपणारे असते.युद्धकाळात तर ते जोमाने सुरूच असते व शांतता काळात ते दुप्पट वेगाने सुरू असते कारण शांतता काळातच भविष्यातील योजना आखण्यास वाव मिळतो.रॉ च्या स्थापनेचा काळ ते आजपर्यंत खूप स्थित्यंतरे आली आहेत.साधने आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. “ रॉ " सुद्धा आता बदलली आहे पण कार्यप्रणाली आणि मूलमंत्र मात्र तोच आहे...
      स्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील  पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…!अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...


पुस्तकाचे नाव :- “ रॉ " भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा
लेखक :- मा.श्री रवि आमले
प्रकाशक :- मनोविकास प्रकाशन, पुणे 

टीप :- सदर पुस्तक हे online उपलब्ध असून मला हे पुस्तक घरपोच पोस्टाने मिळाले ते “ज्ञानसाधना" (श्री रावजी लुटे )  परभणी, यांचेकडून खरेदीसाठी संपर्क 9421605019 ( Whats app )

- गणेश

Sunday, 14 June 2020

चंदेरी दुनिया आणि वास्तविकता

आज दुपारीच सुशांतसिंग राजपूत या अवघ्या 34 वर्षाच्या अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी कळली  आणि नेमकं त्याच वेळ मी कबीर सिंग हा चित्रपट मन लावून बघत होतो.किती शोकांतिका नाही ...कबीर सिंग( शाहीद कपूर) चित्रपटात आपलं आयुष्य उध्वस्त करायला निघाला असतो पण स्वतःला तो सावरतो. अगदी प्रत्यक्ष जीवनातसुद्धा. छिछोरे आणि एम.एस धोनी हे चित्रपट एकहाती निभावणारा हरहुन्नरी कलावंत म्हणजे सुशांत.“ छिछोरे” चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय करताना जीवनातील सकारात्मकता आणि आत्महत्या ह्या विषयाला हात घातला होता तर दुसरीकडे दुसरीकडे  “ M.S.Dhoni the Untold Story ” ह्या चित्रपटात भारताचा यष्टीरक्षक, माजी कर्णधार, आयसीसी च्या तीनही मुख्य स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पडद्यावर अगदी हुबेहूब साकारला..त्यासाठी सुशांताने माजी भारतीय यष्टीरक्षक मा.किरण मोरे ह्यांच्याकडून जवळपास बारा महिने क्रिकेटचे धडे घेतले आणि खुद्द धोनीने आणि समस्त सिनेरसिकांनी त्याचे कौतुक केले.तसं पाहिलं तर धोनी आणि सुशांतमध्ये अनेक बाबतीत साम्य होतं.दोघेही लहान शहरातून आलेले संघर्ष करून आपलं ध्येयं पूर्ण करणारे त्यासाठी ना वशिला, ना बापाची पुण्याई... होता तो फक्त संघर्ष. ह्या संघर्षात त्यांनी काय बघितलं आणि काय सोसलं हे त्यांनाच ठाऊक कारण कुणाच्या जीवनातील सगळ्याच गोष्टी आपणाला पूर्णतः कळत नसतात.जे दिसलं आणि जे दाखविले तेच आपण सत्य मानतो.या मागे एक भयानक वास्तव असतं ज्याची कल्पना आपल्याला करायची नसते किंवा आपण हेतुपुरस्सर टाळतो..इतका हरहुन्नरी अभिनेता आणि त्याने वयाच्या ऐन उमेदीच्या काळात आत्महत्या करावी ?? का बरं ? ते ही कुणाला काहीच न सांगता.काय घालमेल असेल त्याच्या मनात.एकदा निवांत विचार करा. आजकाल माणूस एका भ्रमात वावरत आहे की जग हे आता एक गाव झालं आहे, मी माझ्या आप्तस्वकीयांच्या खूप जवळ आलो आहे..सगळं जग माझ्या मुठीत आणि मोबाईलच्या कीपॅडवर आलेलं आहे वगैरे वगैरे.पण हा सगळा आपला भ्रम आहे...सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण समुद्राची खोली सहज मोजू शकतो पण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा थांगपत्ता कसा मोजयचा ? कुणाची संपत्ती त्याचं यश किंवा त्याची जीवनशैली ह्यावरून जर आपण कुणाबद्दल आपल्या धारणा तयार करत असू तर आपण नक्कीच चुकत आहोत.एकेकाळी संपर्काचे कोणतेही साधन नसणारी एक पिढी आणि दुसरीकडे संपर्काची सर्व साधने असणारी आजची पिढी...मग असं काय झालं की सुशांत एकटा पडला ? त्याची आई गेली त्यावर त्याने एक आठवड्यापूर्वी एक भावनिक पोस्ट टाकली होती..मग प्रश्न असा आहे की त्याच्या आयुष्यात असं कुणीच नव्हतं काय जे त्याच्या मनाचा अंदाज घेऊ शकलं असतं...अर्थात नक्कीच असतील. त्यांना असा अंदाज घ्यायला किंवा आपला मित्र काय बोलत आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता होती काय ? त्याने ज्या भावना मांडायचा प्रयत्न केला त्याच्या जवळच्या किती लोकांनी त्याला समजून घेतले असेल.मित्रा सुशांत तु प्रतिनिधी आहेस या समाजाचा की तुला कुणीच नाही समजून घेतलं अन्यथा असा टोकाचा निर्णय तु का बरं घेतला असतास ? तु हतबल झाला होतास हे ही मान्य कारण दुसऱ्याने लिहिलेले संवाद तु अगदी उत्तमरित्या सादर केलेस पण तुझा आत्मकोलाहल कुणालाच समजू नये ? सगळंच तर होतं तुझ्याजवळ मग काय कमी पडलं ? कमी होतं ये फक्त आत्मबळ कारण तु दुसऱ्या व्यक्तीमध्ये स्वतःला शोधत होतास जे तुझे कधीच नव्हते. अरे एकदा आरश्यासमोर उभा राहिला असतास आणि विचारले असतं ना स्वतः स्वतःच्या नजरेला नजर भिडवून की, “ काय चुकलं माझं म्हणून ? ” मित्रा तुला उत्तरे सापडली असती पण तू या भ्रामक जगाच्या मोहात अडकलास आणि नैराश्यातून हे अघोरी पाऊल उचलले.येथे फक्त काळ आणि वेळ राज्य करत असतात.सगळेच आपल्या सोयीने वागत असतात.तु त्यात स्वतःला गुरफटून घेतलंस आणि नको तिथे स्वतःला शोधत बसला. तु एक स्वतंत्र जीव आहेस आणि तुझं प्रारब्ध फक्त तुझं आहे याची का बरं जण नाही ठेवलीस तु ?? अरे येथे सगळेच आपल्या सोयीने वागत असतात....तु दिलदार,तु राजबिंडा,तु हसमुख,यश तुझ्या पायाशी लोळण घेत होतं आणि तू असं करावं हे मी मानायला तयार नाही.तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा ह्या भ्रामक जगाने बळी घेतला..आता हेच बघ ना मागील तीन महिन्यात जवळपास बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात घेतली का कुणी त्यांची दखल ??  नाही ना कारण तु त्या मानसिकतेत जगणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी होतास. त्यांचं दुःख दाखवायला आणि तुझं दुःख समजायला वेळ कुणाजवळ होता ? मी व तुझ्या जवळ होतोच ना ह्या आभासी जगात.मला समजलं काय तुझ्या मनातलं.तुझे व मित्र मैत्रिणी असतीलच ना...तु तेथेही व्यक्त न व्हावं म्हणजे काय ?  सगळ्यांना वाटत होतं की तू मजेत आहेस कारण तसं दिसत होतं...आणि तुझा मनाचा थांगपत्ता घ्यायला तुझ्याजवळ जे होते ते आपल्याच आभासी विश्वात रमनाम होते...मग तु कुठे होतास ? तर तू एकटा होता.जे आम्हाला दाखविल्या गेलं आणि आम्ही समजत होतो तो एक भ्रम होता...आणि हेच सत्य आहे..
तु एकटा होतास सगळ्यांसारखा फक्त ते तुला जाणवलं नाही आणि जेव्हा तुला हे कळलं तेव्हा तुझा भ्रमनिरास झाला..
तु असं जायला नको होतं....


- गणेश




Tuesday, 26 May 2020

DP

तुझं फक्त ऑनलाईन दिसणं 
हे मजसाठी नक्षत्राचं लेणं असतं
DP मधून तुझं मंद हसणं
मन माझं न्याहाळत असतं....

तु अबोल, तु अव्यक्त
सखे नको होऊस ना व्यक्त 
मी मात्र तुला वाचत असतो
तुझ्या msg ची वाट बघत असतो...

तुला रोज ऑनलाईन बघण्याने
गुंततो रोज मी तुझ्यात नव्याने
चोरूनि तुझा DP  बघताना 
का जडतो गं छंद तुझा नव्याने...

पुरे झाल्यात तुझ्या झुकलेल्या नजरा
मला भावला तुझ्या नथीचा नखरा
नित्य मी तुज स्मरावे मनातुनी 
दे ना एकदा तू साद हृदयातुनी....

तु दिलेल्या विरह वेदना
मी हृदयात घेऊन फिरत आहे
तुला आवडत नाही उन्हाळा
म्हणून पाऊस बनून बरसत आहे....


शब्दांकन :-

गणेश















Wednesday, 5 February 2020

ह्या नराधमांचे काय करायचे...?

    समाजमन सुन्न करणाऱ्या हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेतील आरोपी नगराळेला नक्कीच फाशी व्हायला हवी यात दुमत असूच शकत नाही...पण आपल्या आजूबाजूला रोज आपणास भेटणारे पांढरपेशे विकृत नराधम यांचं काय करायचं...CAA व NRC सारख्या विषयावर आपली बुद्धी पाजळणारे कथित बुद्धीजीवी ; जेथे रोज संविधानाचे दाखले देऊन आपली राजकीय पोळी शेकली जाते आणि “ बेटी बचाओ बेटी पढाओ ” चळवळ राबविली जाते या आपल्या देशात खरंच स्त्री सुरक्षित आहे काय ??? आणि ती स्वतःला असुरक्षित समजत असेल तर मग दोष द्यायचा कुणाला ??? की, अजूनही आपण रानटी अवस्थेत जगत आहोत. नौकरी निमित्य घराबाहेर पडणाऱ्या देशातील करोडो स्त्रिया त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर आपण कधी चर्चा करणार आहोत ??? प्रवास करताना  एखादी महिला आपल्या बसमध्ये किंवा रेल्वेत बसली की, तिला टोमणे मारणारे, विकृत शेरेबाजी करणारे असे कित्येक कुबुद्धी प्राणी आपल्याला अवतीभोवती दिसत असतात. त्यात जर महिला ओळखीची असली तर तिच्या खाजगी आयुष्याचा तिच्या पाठीमागे उद्धार करणारी नीच मनोवृत्तीची माणसे यांचं काय करायचं...आपल्याच सोबत खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करणारी महिला आपल्यातच असुरक्षित असेल तर इतर महिला व त्यांना रोज सहन करावा लागणारा अपमान याचा विचार न केलेला बरा... शिक्षणाने कामधंदा मिळतो पण सुसंस्कृतपणा हा जो गुण लागतो तो आणायचा कोठून ???
     एकदा प्रत्येकाने आत्मचिंतन नक्की करावे की , खरंच माझ्यासोबत सहप्रवासी असलेल्या महिला भगिनींशी माझे वर्तन कसे आहे ? त्यांच्यासमोर त्यांना हेतुपुरस्सर ऐकू जाईल या भाषेत मी आपल्या सहकाऱ्यांशी कुठला वार्तालाप  करतो..एखाद्या महिलेला मी शेरेबाजी करतो तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असेल...असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आज लिहिता येईल...सामूहिक शेरेबाजी करून दात विचकावताना आपल्याला समाज बघत असतो याचसुद्धा भान आपल्याला राहू नये...म्हणजे किती हा निगरगट्टपणा..हिंगणघाट येथील नराधमाला शासन  नक्कीच होईल पण आपल्यातील सुशिक्षित नराधमांना शिक्षा कोण करणार ??? हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटत असताना आणि सोशल मिडियावर आपण आपला राग व्यक्त करत आहोतच व यासमोर जाऊन आपण महिलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व समजून त्यांना शांततामय जीवन जगण्याचा अधिकार देणार आहोत काय ??? शेवटी निर्णय आपला आहे..

  - गणेश

Saturday, 19 October 2019

एक पत्र.... आठवणींना..

         हल्ली भेट नाही होत आहे गं आपली. तशी तेव्हा ही नव्हती होत म्हणा.... वीस वर्षांपूर्वी कॉलेजला एका वर्गात बसायचो किंवा चुकून बोलायचो तीच आपली भेट होती...किती त्या आठवणी..। नंतर आपल्या वाटा बदलल्या...तेव्हा आपल्याजवळ मोबाईल नव्हता ना ! असता तर किती बरं झालं असतं.रोज msg करता आला असता.तुला त्रास देता आला असता, रोज तुला बघता आला असतं..पण बर झालं नव्हता तो मोबाईल ; नाहीतर तुझ्या आठवणी मनात कश्या जपता आल्या असत्या...आता तर आठवणी पण एका क्लिक वर गायब होतात. जग किती बदललंय ना ? तेव्हा सायकलने एखाद्याच्या घरी गेलो तरी मित्र भेटायचा...आता म्हणे जग जवळ आलंय ?? जग हे एक खेडं झालंय पण येथे सगळेच अनोळखी झाले आहेत...आता कुणीच भेटत नाहीत. अगदी भेटायचं ठरवलं तरी भेट नाही होत..
         आता रोजच तू कॉलेजच्या ग्रुपवर दिसतेस अप्रत्यक्ष बोलतेस.किती बदल झाला आहे आता.सगळं कसं बदललं आहे ना..तू आणि मी पण. तुझ्या सतत बदलणाऱ्या dp वरून हळू हळू उलगडत चाललीयस तू  आणि अगदी तुझं वागणं सुद्धा. आता किती बोलकी दिसतेस ना तु ; पण तुझे डोळे मात्र अजूनही अबोल दिसतात हं कदाचित त्यांना व्यक्त व्हायचंही असेल पण तू शिताफीने टाळतेस ते आता. 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि त्यात तुझं सौंदर्य... पण एक सांगू किती केविलवाणी दिसतेस गं तू....भूतकाळ आपला पाठलाग सोडत नाही आहे आणि तुला भविष्याचा वेध घ्यायचा आहे त्या मधला तुझा हा dp. इतक्या वर्षात काय घडलंय काय बिघडलंय काही कळायला मार्ग नाही...आणि  मनातले भाव पण तू कधी चेहऱ्यावर आणत नाहीस....मी कशी  मजेत आहे हेच सांगायचं आहे ना तुला...आता हे ही कसब अवगत केलंस वाटते...म्हणूनच मला नेहमी वाटायचं चित्रपटात काम करावं तू.
        तू मला भेटावं असंही म्हणणं नाही माझं...साधं बोलणंही होत नाही आपलं....याचा अर्थ आपल्यातील संवाद तुटला असही नाही...आपलं नातं तुटलं म्हणावं तर तेही शक्य नाही...तुझ्यात बदल झाला असंही नाही आणि जग जसं मला आधी म्हणायचे मी अजूनही तसाच आहे.....आजकाल तर online image building होत असते पण तिथेही मी कमीच पडलो..नाही जमत मला हे सगळं...म्हणूनच कदाचित....आपल्यातील संवाद संपलाय...बस्स आपण  थोडं आपल्या जगण्यात बदल केलाय. का तू स्वतःला अस बंदिस्त करून घेतलंय...तू स्वतःला जगापासून अलिप्त ठेऊ शकतेस पण  स्वतःला स्वतःपासून अलिप्त ठेवणं जमेल काय तुला ??
       तुझं बोलणं हसणं अगदी खळखळून वाहणाऱ्या झऱ्यासारखं होतं. तुझं असं साचलेलं मला आवडेल काय? मनातील भावनांना वाट मोकळी करून दे ना एकदा. तुझं हे तुझ्या स्वभावाविरुद्ध भावनांना बांध घातलेला नाही आवडत मला.एकदा बोलून तर बघ..बर वाटेल तुला आणि मला पण...वाहणाऱ्या झऱ्याचं असं अचानक थांबणं आणि त्याचं असं साचलेपण बेचैन करत आहे मला. नेमक झालंय काय हे विचारायचं म्हटलं तर तेही कठीण...संवादाचे सारे मार्ग आडवळणाचे झालेत...की तु हेतुपुरसर सर्व मार्ग बंद केलेस कळायला मार्ग नाही...
       मला वाटतं हे सगळं अगदी ठरवून करते आहेस तू ...अगं किती दिवस शांत राहशील आणि किती मनातल्या गोष्टींना अशी समाधी देणार आहेस...आणि हो आठवणी तर राहतील ना कायमच्या मनात कोरलेल्या...आणि हे सर्व करताना त्रास नाही का होणार तुला....?ह्या जाणीवेनेच काळजी वाटतेय मला तुझी...पण असो तुला आता आधार आहे आणि तू पण  आता खंबीर झाली आहेस....काळानुरूप .पण तू दिसतेस म्हणून बरं वाटतं...अशीच दिसत रहा.माझे डोळे मिटेपर्यंत....आणखी मागण्यासारखं काहीच नाही आता....
                         तोच तुझा.....

© गणेश

Monday, 5 August 2019

ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होताना ( कलम 370 )

         आजचा दिवस खरंच प्रचंड ऐतिहासिक म्हणावा लागेल.मागील आठवड्यात घडलेला घटनाक्रम बघितला तर सर्वांनाच याचा अंदाज लागला होता...अमरनाथ यात्रा रद्द करणे, कश्मीर मध्ये तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षाबले, पर्यटकांना तात्काळ हॉटेल्स रिकामे करण्याचे दिलेले आदेश हे सारेच काहीतरी सुचवत होते आणि झालेही तसेच. आज अत्यंत वादग्रस्त कलम 370 काश्मीरमधून हटविण्यात आले. सोबतच कलम 35 A सुद्धा संपुष्टात आले. आज संसदेत देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांचे भाषण किंवा त्यांनी मांडलेला मसुदा अगदी कान लावून ऐकण्यासारखा होता. ( विरोधक नेहमीप्रमाणे या निर्णयाला विरोध करत होते.आपल्याला दुसऱ्यांदा जनतेने विरोधी पक्षातच का बसविले ; याचे यांना अजूनही भान आलेले नाही. ) आपण इतिहासाचे साक्षीदार झालोत ही गोष्ट मनाला सुखावून गेली. अमितभाईंचा एक अंदाज आज मला खूप आवडला. ते संसदेत कुणाला विचारायला उभे राहत नाहीत तर घेतलेले निर्णय खंबीरपणे सांगायला उभे राहतात ; एव्हाना त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली असते. त्यामुळे विरोधक पार हतबल झालेले असतात, आणि नौटंकीबाज पुरोगाम्यांकडे तोंड लपविण्याशिवाय काही पर्याय राहत नाही..आता काश्मीर संवैधानिक अर्थाने भारताचे अविभाज्य अंग बनलेलं आहे... आधीही होतंच पण त्यांची घटना, त्यांचा ध्वज, त्यांना दुहेरी नागरिकत्व इ. खूप सुविधा होत्या. आज ते सर्व संपुष्टात येऊन आता तेथे आपला राष्ट्रध्वज डौलात फडकणार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अखंड भारताच्या दिशेने पडलेलं हे नुकतंच पहिलं पाऊल आहे...अजून पाकव्याप्त काश्मीर घेणे बाकी आहे. सिंध,गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांतसुदधा आपल्याला साद घालत आहेत. गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची. आपण लवकरच त्यादृष्टीने पाऊले उचलू याबद्दल विश्वास आहे..कारण माझा भारत आता बदलत आहे..
         मुळात कश्मीर ही कधी समस्या नव्हतीच, तो हजारो वर्षापासून भारताचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. ज्यांनी शालेय इतिहास वगळता थोडी ऐतिहासिक भटकंती केली त्यांना  हे लगेच कळून येईल. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी पाचशेच्या वर संस्थाने आपल्या राजकीय कुशलतेने भारतात विलीन करून घेतलीत फक्त जम्मू आणि कश्मीर हेच असे संस्थान होते जे भारतात विलीनीकरण करण्याची जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे नव्हती आणि आपला देशाचा घात झाला तो येथेच. फाळणीची बोलणी करण्यासाठी तत्कालीन व्हाइसरॉय माउंटबॅटन समोर बॅरिस्टर वीर सावरकर आणि  बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निष्णात व्यवहार चतुर महापुरुष असते तर नक्कीच चित्र वेगळे असते आणि त्यावेळी झालेला नरसंहार थांबविता आला असता..पण तत्कालीन नेतृत्वाच्या राजकारणाला व्यवहाराची जोड नव्हती हे आपल्याला मान्य करावेच लागेल...फाळणी ही तत्कालीन मागणी नव्हती तर तो एक हेतुपुरस्सर रचण्यात आलेला कट होता. फाळणीची बिजे खूप खोलवर रुजलेली होती. पण तिकडे साफ दुर्लक्ष करून भोळा आशावाद ठेऊन शांततेची कबुतरे उडवायची हौस असलेलं नेतृत्व आणि स्वप्नरंजनांत गुंग असलेले महान नेते असले ; म्हणजे लाखो लोकांच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या भळभळत्या जखमा तेवढ्या शिल्लक राहतात. कश्मीर म्हणजे नख लावून लावून मोठी केलेली जखम. टुकार आणि पुचाट शेख अब्दुल्ला कुणीतरी जिना यांना मोठं केलं कुणी ??? आणि वीर सावरकर व बाबासाहेब आंबेडकर यांना दूर लोटलं कुणी ??? याचं उत्तर शोधलं की, आपल्याला सर्व उत्तरे सापडतील. स्वातंत्र्यानंतर म्हणे टोळीवाल्यानी भारतावर म्हणजेच काश्मीरवर आक्रमण केले असे आपण नेहमी वाचतो. हे टोळीवाले म्हणजे कोण ???? तर हे जिनांच्या नेतृत्वातील पाक सैन्य होते..आपल्याला कधी हे सांगितलं गेलं काय ? म्हणजे येथेसुद्धा जिनाभाईवर ??? आरोप लागणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी चाललेली ही निरर्थक धडपड होती...तिकडे बंगालमध्ये सुरहावर्दीच्या पापावर पांघरून घालणारे कोण होते ?? याचा शोध घेतला की , आपल्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नाकारायचा आणि दुसरीकडे एका सार्वभौम देशात वेगळी घटना आणि एका राज्यासाठी वेगळी घटना तसेच ध्वज लावण्याचे पातक कुणी केले ?? त्यामागे कोण होते ??? हे येथे सहज लिहिता आले असते. पण ते वाचकांनी स्वतः शोधले तर उत्तम म्हणजे आपल्या अनेक धारणा दूर होतील..संसदेत जेव्हा कलम ३७० च्या बाबतीत चर्चेला सुरुवात झाली तेव्हा प्रचंड प्रमाणात उहापोह झाला. डॉ आंबेडकरांचा याला खूप मोठा विरोध होतात आणि त्यांनी थेट शेख अब्दुल्ला यांना असं म्हटलं होतं, "तुम्हाला भारताकडून सुरक्षा, पैसे, रस्ते, सामान हक्क  हवे आहेत पण भारताच्या नागरिकाला काश्मीरमध्ये कुठलाही हक्क नको. मी माझ्या देशाशी गद्दारी करूच शकत नाही" त्यांनी असे म्हणून कलम ड्राफ्ट करण्यास नकार दिला. पण अखेर हे वादग्रस्त कलम तयार करून लागू करण्यातच आले. भारत हा सार्वभौम लोकशाही गणराज्य आहे तर या देशात  370 हे अस्तित्वात आलेच कसे ? कलम 370 ने आपल्याला काय दिले ? हा चिंतनाचा विषय आहे. फुटीरवादी चळवळीला चालना मिळाली. काश्मिरी तरुणाला फुटीरवाद्यांनी भारताच्या मुख्य धारेत येऊच दिले नाही त्यामुळे तेथे आतंकवादला चालना मिळाली. तेथील जनतेत परकेपणाची भावना निर्माण झाली.भारताच्या संसदेने केलेला कुठलाही कायदा तेथे लागू होत नाही. त्यामुळे भारत सरकारने भारतात केलेल्या सुधारणा तेथे लागू होत नाही.उदा. सर्व शिक्षा अभियान असो वा विविध क्षेत्रात लागू असलेले आरक्षण असो. कलम 370 हे काश्मीरला भारतापासून तोडणारे आहेच शिवाय इकडे आणि तिकडे दोघांवरही अन्याय करणारे आहे. काश्मिरी तरुण सैनिकांवर दगडफेक करतात तेव्हा वाईट वाटतं.त्याचवेळी त्यांची बाजू घेऊन त्यांची माथी भडकविणारी नेते मंडळी यांची मुले मस्त विदेशात आलिशान जीवन जगत आहेत..हे कुठेतरी थांबले पाहिजे..याचीच सुरुवात केली आहे मोदी सरकारने. हे अन्यायकारक कलम रद्द करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती हवी होती ; ती आज संपूर्ण जगाने बघितले. आज काश्मिरी नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असं म्हणता येईल.
      ज्या तीव्र गतीने मोदी 2.0 सरकार कामाला लागले आहे ही गती बघता भविष्यात आणखी धडाकेबाज निर्णय होतील यात शंकाच नाही. कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे शहीद झालेत, फाळणीनंतर नाहक लाखो बळी गेलेत त्यांचा हा देश सूर्य - चंद्र असेपर्यंत ऋणी आहे व राहील त्यांचे आपल्याला पांग फेडायचे आहेत...एकट्या काश्मीरमध्ये आजपर्यंत आपले हजारो सैनिक शहीद झाले आहेत आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत...ते अमर शहीद  आता परत नाही येणार आहेत पण भविष्यात काश्मीरमध्ये आपले बहादूर जवान हकनाक बळी पडणार नाहीत अशी आशा आहे..ह्या एक निर्णयाने फुटीरवाद्यांचा नांग्या ठेचल्या गेल्यात यात काही वाद नाही. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहली गेली.थोडा वेळ मिळाला तर मा. अमितभाईंनी देशांतर्गत असलेले पाक समर्थक, तुकडे गँग, मेणबत्ती गँग, छद्म पुरोगामी यांच्याकडे पण  लक्ष द्यावे..आणि हो ज्यांना या देशात भीती वाटते त्यांची भीतीसुद्धा दूर करावी...
        इतिहास आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. शांततेची कबुतरे उडविण्याच्या नादात भारतीय इतिहासाने खूप वाईट प्रसंग बघितले आहेत...परंतु भविष्यात लिहिला जाणारा इतिहास घडविण्याची जबादारी भारतीय जनतेने आपल्या खांद्यावर दिली आहे आणि तो इतिहास समृद्ध आणि बलशाली असावा असे मला वाटते कारण “जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही.”
जय हिंद.
अखंड हिंदुस्थान हेच आमुचे स्वप्न....
- गणेश

Saturday, 29 June 2019

मला निसटलचं पाहिजे

रशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा काळ.
नोकरीच्या कारणाने आलेल्या अनेक परदेशी नागरीक सुद्धा या छळाला बळी पडत होते. स्लाव्हेमिर राविझ हा असाच 24 वर्षांचा पोलिश लेफ्टनंट.1939 साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली.25 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली.राविझची रवानगी झाली ती थेट उत्तर सायबेरिया येथे.मागच्याच आठवड्यात गिरीष कुबेर लिखित “ पुतिन ” हे पुस्तक वाचले होते, त्यामुळे रशियन गुप्तहेर,त्यांची कार्यपद्धती याचा अभ्यास झालाच होता.पण या पोलिश लेफ्टनंटने त्यांच्यासारखेच अमेरिका,जर्मनी, या देशातील आणखी सहा कैदी जमविले आणि त्या अभेद्य तुरूंगातून पलायन केलं.वाटेत मिळाली ती ख्रिस्तीना. सायबेरिया,गोबीचे वाळवंट, तिबेट आणि अजस्त्र हिमालय पार करत 4000 मैलाचा अत्यंत खडतर आणि जीवघेणा प्रवास पायी कापत आपले ध्येय गाठत ते भारतात आले. सगळेजण नव्हेत. पण त्यात राविझ होता. राविझ, ख्रिस्तीना, स्मिथ,पोलुका,कोलो,झोरो, इ.  निरपराध युद्धकैद्याची सपेशल खोटी वाटावी अशी सत्य कहाणी...

मानवी धाडस,जिद्द आणि भावभावनांचे, निसर्गाच्या रौद्र रूपाचे अप्रतिम वर्णन.

मूळ पुस्तक - Long walk
निवेदन - स्लाव्हेमिर राविझ
शब्दांकन - रोनाल्ड डाऊनिंग
अनुवाद - श्रीकांत लागू
प्रकाशक - राजहंस प्रकाशन

Thursday, 6 June 2019

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव

     “ देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो...”
         - स्वातंत्र्यवीर सावरकर
          आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात झोकून दिले त्या महान समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वरील वाक्य अक्षरशः खरे करून दाखविले.स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७२ वर्षानंतरही वीर सावरकर संपूर्ण मानव समाजाला राष्ट्रप्रेम आणि निस्सिम त्यागाची प्रेरणा देत आहेत.पण त्यांच्या या कार्याचा त्यांच्या हयातीत आणि स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत योग्य तो सन्मान केला गेला नाही ही खंत आजही मनाला चटका लावून जाते किंबहुना तसे हेतुपुरस्सर होऊ दिले गेले नाही असे म्हणणे योग्य ठरेल. वीर सावरकर यांच्याविषयी सदैव गैरसमज पसरविण्यात काही लोकांनी धन्यता मानली.पण त्यांना आपल्या हृदयात स्थान देणाऱ्या व्यक्तींनी आजही त्यांचे मोठेपण स्वतःच्या मनात जपले आहे. त्यांचे कार्य युगानुयुगे संपूर्ण मानव जातीस प्रेरणा देत राहील यात तिळमात्र शंका नाही.
          येत्या दशकात पुनःश्च भारतीय राष्ट्रवाद मूळ धरत असताना या राष्ट्रवादाचा वैचारिक पाया रचणारे वीर सावरकर त्यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर आलेत.वीर सावरकर यांच्यावर आजवर प्रचंड साहित्य प्रसिद्ध झाले आहे पण त्यांच्यावर घेण्यात येणाऱ्या धादांत खोट्या आक्षेपाचे सप्रमाण खंडण करण्याचा यशस्वी प्रयत्न “ स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव ” या पुस्तकात अत्यंत तर्कपूर्ण भाषेत करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे सूर्याला त्याचे अस्तित्व सिद्ध करावे लागत नाही त्याप्रमाणे मूठभर लोक वीर सावरकरांचे मोठेपण नाकारून त्यांना लहान करू शकत नाहीत.तरीपण या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग यांनी वीर सावरकरांविषयी पसरविले गेलेले गैरसमज व त्यामुळे तयार झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सर्व आक्षेपावर उत्तरे देताना वाचकांना एकाच पुस्तकात सप्रमाण माहिती मिळावी यासाठी अथक परिश्रम घेऊन मुत्युंजय प्रकाशन,पुणे यांच्या मदतीने सदर पुस्तक आपल्या भेटीस  आणले आहे.
            सध्या मराठी साहित्य विश्वात सखोल अभ्यासपूर्ण व पुराव्यासह लेखन करण्याचा कल वाढत आहे. त्याच मालिकेतील हे पुस्तक आहे. वीर सावरकर यांच्यासारखे निरलस देशभक्त आपल्या भारत भूमीला लाभले हे आपले सौभाग्य. पण काही बेगडी,महान?? लोकांनी वीर सावरकरांच्या मातृभूमीच्या निष्ठेला सतत नख लावण्याचं कार्य केलं त्यात ते अजूनही यशस्वी होऊ शकले नाहीत व भविष्यात होणारही नाहीत ही त्यांची खरी खंत आहे. सावरकर यांनी सदैव लोकहीताचा विचार केला व राष्ट्र सर्वतोपरी हे त्यांचे एकमेव ध्येय होते.त्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण केले.सदर पुस्तकात वीर सावरकर यांच्यावर जे प्रमुख खोटे आरोप केले जातात त्या सर्व आरोपांना स्वतंत्र प्रकरणात अगदी मुद्देसूद उत्तरे दिलेली आहेत.
        स्वातंत्रवीर सावरकर यांनी अंदमान येथे कैदेत असताना इंग्रजांकडे खरंच क्षमा याचना केली होती काय ? त्यांचं देशकार्य, भारतीय तिरंगा ध्वज व त्यांची भूमिका,मानवतावादी धोरण,अल्पसंख्याक धोरण,सावरकर आणि दुसरे महायुद्ध,चले जाव आंदोलन आणि सावरकर,सावरकर आणि द्विराष्ट्रवाद इ. अनेक प्रकरणातून लेखकांनी सावरकरांची भूमिका देशाला कशी हितकारक होती याचे पुराव्यासह अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे.यासाठी त्यांनी विविध ग्रंथ,ब्रिटिश गुप्तचर अहवाल,मा.भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल, असे संदर्भ दिलेले आहेत. हे पुस्तक वाचत असताना वीर सावरकर यांच्याविषयी सत्य काही वेगळे असताना चुकीचे भ्रम कसे पसरविण्यात आलेत हे आपल्या लक्षात येते.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय ? त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र काय होते ?? हिटलर, फॅसिस्टवाद,ज्यू राष्ट्र याविषयी त्यांचे रोखठोक विचार आपणास या पुस्तकातून कळतात. म.गांधी हत्येच्या कटातून निर्दोष मुक्तता होऊनही आजही त्यांचे नाव या कटात गोवण्यात कुणाला फायदा होत आहे या सर्वांचा उलगडा आपणास हळूहळू होत जातो.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते.
         संपूर्ण पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक थोर पुरुषांचा उल्लेख आलेला आहे.म.गांधींशी असलेले त्यांचे वैचारीक मतभेद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले त्यांचे संबंध,पं.नेहरू,सरदार पटेल,यांच्याविषयी असलेले यांचे मत इ. परंतु लेखक महोदयांनी सदर पुस्तकात या थोर महापुरुषांचा कुठेही अपमान होणार नाही अशी काळजी घेतली आहे.त्यांचे मोठेपण अबाधित ठेवतानाच सावरकर यांचे महान कार्य आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे. १९४२ च्या सातंत्रलढ्यात सावरकरांची भूमिका काय होती नेमकं त्यानं काय अभिप्रेत होते तसेच भारतीय युवकांनी ब्रिटिश सैनिकांत सामील का झाले पाहिजे या मागील वीर सावरकर यांची भूमिका स्तिमित करणारी होती. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास नसणारी काही संकुचित मनोवृत्तीची माणसे वीर सावरकरांवर नेहमीच टीका करण्यात धन्यता मानतात. ती त्यांची राजकीय गरज असू शकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने एक खंबीर पुरावा उपलब्ध झाला आहे..याबाबत कुठलीही शंका नाही.
        मराठी साहित्य विश्व कलाटणी घेत असताना आता लेखकही वाचकांना सहज उपलब्ध होत आहेत. वाचकांच्या शंकाचे निरसन करण्यात लेखक सदैव अग्रेसर असतात.या पुस्तकाच्या निमित्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्त्यकी सावरकर यांच्याशी बोलण्याचा योग आला.हे मी माझे सौभाग्य समजतो..या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग तसेच श्री सात्त्यकी सावरकर यांनी व्हाट्स एप आणि फेसबुकवर प्रत्येकवेळी अत्यंत व्यसत्तेतून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.समाज माध्यमावर वाचन चळवळ फोफावत आहे ही एक दिलासा देणारी बाब आहे...मलाही येथूनच या पुस्तकाविषयी माहिती मिळाली. मराठी वाचन चळवळीचा प्रसार करण्यास फेसबुक आणि व्हाट्स एपचा खूप छान उपयोग होत आहे.प्रकाशनपूर्व नोंदणीतच ज्या पुस्तकाच्या जवळपास १५०० प्रतींची नोंदणी झाली; असे हे अभासपूर्ण पुस्तक प्रत्येक सावरकर प्रेमी व अभ्यासकाने तसेच टिकाकारांनी सुद्धा अवश्य वाचावे......तरच कालजयी वीर सावरकर आपणास कळतील आणि उमजतील....
         धन्यवाद.
पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव
लेखक - श्री अक्षय जोग
प्रकाशक - मृत्युंजय प्रकाशन, पुणे
दूरभाष क्र. ९९२१३५१२५२
       
           
      
    

Tuesday, 12 March 2019

एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास

          शालेय जीवनात इयत्ता आठवीपासून एडॉल्फ हिटलर या नाझी जर्मन सेनानीची ओळख होऊ लागली नंतर या व्यक्तिमत्वाने मला ओढ लावली.मिळेल तेथे व जमेल तेवढी पुस्तके वाचलीत या योध्यावर...त्यांचं चरित्र,वार्सा ते हिरोशिमा,दुसरे महायुद्ध आणि जग,हिटलर,इ. अनेक पुस्तके वाचलीत वाचताना मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. असं कसं या एका योध्याने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं ? त्याने खरंच जे इतिहासात सांगितलं जातं तसा नरसंहार केला होता काय ? हिटलर खरंच युद्धपिपासू होता काय ? त्यावेळची नेमकी परिस्थिती काय असावी ? जी पुस्तके वाचलीत त्यांनी या प्रश्नाची उत्तरे कधीच नाही दिलीत...तेव्हा तेथेच थांबलो पण प्रश्न मनात कायम ठेऊन.
         मग शिक्षण आणि नौकरी निमित्त्यानं थोडं वाचन कमी झालं पण थांबलं नाही...एकदा एका मुलाखतीत आमच्या एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की,दुसऱ्या महायुद्धाला कोण जबाबदार होतं ? मी उत्तर दिलं इंग्लंड.त्यांनी थोडं स्मित केलं.वर्षे लोटलीत आणि फेब्रुवारी 2019 ला फेसबुक वर एका पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात म्हणू या किंवा निमंत्रण बघण्यात आले. पुस्तकाचं नावं होतं “ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ” शिर्षक बघताच माझ्यातील वाचक पुन्हा जागा झाला.मी सरळ पुस्तकाचे लेखक मा.श्री पराग वैद्य सरांना फोन केला पुस्तकाची माहिती घेतली आणि श्री सच्चिनानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशित सदर पुस्तकाची कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे येथे मागणी नोंदविली...लेखकांचा आणि माझा एवढाच काय तो परिचय...
          मनोगत व्यक्त करताना लेखक महोदयांनी पुस्तकाच्या नवव्या पानात आपल्या सर्व धारणांना हादरा दिलाय. हे पुस्तक म्हणजे काही कादंबरी नाही आहे.ना लेखकांनी कुठेही कल्पनेचे उंच झोके घेतले आहेत. जवळपास बारा वर्षे शेकडो पुस्तकांचे अखंड अध्ययन करून त्यांनी तटस्थपणे फक्त सत्यकथन केलेले आहे.यावरून लेखकांची प्रचंड मेहनत लक्षात येते.एखादया प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर ते आपल्या शत्रूच्या गोटातून मिळवावं असं म्हणतात.लेखकांनी नेमकं तेच केलं त्यांनी नाझी जर्मन शत्रूच्या गोटात लिहिली गेलेली पुस्तके..प्रतिवृत्ते...इंग्लंड,अमेरिका,पोलंड,फ्रान्स,रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख,त्यांचे परराष्ट्र मंत्री,सचिव, राजदूत,इतर देशातील उच्च पदावरील शासनकर्ते यांच्यातील गुप्त चर्चा, दूरध्वनी,त्यांचे पत्रव्यवहार,त्यांच्या वैयक्तिक नोंदी,जगात विविध देशात एडॉल्फ हिटलवर लिहिली गेलेली हजारो पुस्तके,जागतिक वृत्तपत्रे व त्यातील लेख यांचा सखोल अभ्यास करून सदर पुस्तक आपल्या समोर मांडले आहे.नाझी शत्रूंना नेमके हिटलर या असामान्य योध्याविषयी काय वाटत होते आणि हेतुपुरस्सर जगापासून तो इतिहास का लपवला गेला ???  संपूर्ण जगास उत्तरार्ध सांगितला गेला पण पूर्वार्ध आपणापासून का दडवून ठेवण्यात आला.?नेमका हाच वेध या पुस्तकात घेतला गेला आहे. आपल्याविषयीचे अचूक सत्यकथन आपला शत्रूच करू शकतो,याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही.सातशे अडतीस पानाच्या या पुस्तकात एकशे पंचवीस पाने फक्त संदर्भ ग्रंथाची यादी प्रसिद्ध करायला लागली आहेत.यावरून या पुस्तकाची सत्यता,भव्यता आणि मा.लेखक श्री पराग वैद्य सरांची चिकाटी आपल्या लक्षात येते.
        आज ऐतिहासिक संदर्भात आपण आपल्या अवतीभोवती जे बघतोय आणि आपली धारणा करून बसतो ते अर्धसत्य असते.अन्यथा ब्रम्हचार्याचे व्रत करताना टेकू म्हणून आपले हात ठेवायला स्त्रिया कशाला हव्यात? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध कशाला हवे ???? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.सत्याच्या आड कुणाची तरी चमचेगिरी करायची आणि शांततेच्या बाता मारताना आपले धार्मिक अहंगंड कसे पूर्णत्वास नेले जातात याचा नेमका वेध या पुस्तकाने घेतला आहे..जेमतेम फक्त सहा महिने पुरेल एवढी युद्धसिद्धता असताना हिटलरने खरेच जागतिक युद्ध पुकारले होते काय? एका असामान्य योध्याने आपल्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे साठ लाख ज्यूंची हत्या केली होती काय?? जर्मनीत नेमके ज्यूंचे स्थान काय होते अथवा एक नागरिक म्हणून जर्मन देश उभारणीत त्यांची भूमिका काय होती याचा इतिहास खूपच मनोरंजक आहे.जर्मनीत वास्तवात गॅस चेम्बर होते काय?? आपणास जे गॅस चेंबर दाखविले गेले मग ते कोणत्या देशात उभारले गेले होते ?? तेथे नेमके काय सुरू होते ? दुसरे महायुद्ध हे एखादया सिनेमाच्या कथेप्रमाणे जर्मनीवर नाझी शत्रूंनी का लादले त्यातुन त्यांना काय हस्तगत करायचे होते ?? हे आजही गूढ आहे. हे गूढ आपणापासून हेतुपुरस्सर का दडविण्यात आले ??? या जगात खरंच सहिष्णुता सर्वधर्म समभाव नावाच्या गोष्टी असतात काय ??? की आपल्याला फक्त मूर्ख बनविले जाते...याचे उत्तर शोधणे हे आपले कर्तव्य आहे.कर्तुत्वशून्य माणसाला महान(महात्मा) म्हणून सांगायचे आणि जो आपल्या वैयक्तिक स्वार्थाआड येतो त्या महान सेनानीला अगदी योजनाबद्ध पद्धतीने खलनायक ठरवायचे हा आजवरचा इतिहास तपासायची तयारी असेल तर नेमकं हे पुस्तक वाचावे...
       युद्ध हे ज्या देशांचे व्यसन होते आणि शस्त्र विक्रीतून मानवी संहार हे ज्यांचे ध्येय होते तेच देश आजही संपूर्ण जगाला शांततेचे आणि निशस्त्रीकरणाचे उपदेश देत असतात. जो अमेरिका आज संपूर्ण जगाला दहशतवाद विरोधी ब्रम्हज्ञान सांगत असतो, त्याचे स्वतःचे दुसऱ्या महायुद्धकालीन दहशतवादी कृत्ये या पुस्तकाने समोर आणली आहेत.तसेच आजच्या काळातील इराक व लिबिया येथे त्यांनी केली कृत्ये याचीच साक्ष देतात. जपान या देशाची अगतीकता त्यातून त्या देशाने स्वरक्षणार्थ उचललेले पाऊल याविषयी खूप विस्ताराने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे त्याउलट रशियाचा विस्तारवाद व त्यांच्या सेनेने संपूर्ण मानव जातीला लाजवून सोडतील अशी केलेली महाभयानक कृत्ये वाचतानाआपल्यालाही हादरवून सोडतात आणि नेमका हाच इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे.आपल्याला ज्ञात नसलेले जैविक व रासायनिक युद्ध नाझी शत्रूंनी कसे पुर्णत्वास नेले.याचे संपूर्ण विस्तारीत विवरण या पुस्तकात मा.पराग वैद्य सरांनी अगदी अचूक मांडले आहे.
        आपला छुपा धार्मिक विस्तारवाद जगावर थोपविण्यासाठी नाझी शत्रूंनी एक काल्पनिक शत्रू उभा करून संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले व वरून खोटा मानवता वादाचा बुरखा चढवत आपली पापे लपवून ठेवलीत.स्वतःला लोकशाही देश म्हणविणाऱ्या नाझी शत्रूंनी केलेल्या भयानक कत्तली जेव्हा या पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा आपणास चीड यावी इतके दुसरे महायुद्ध हे प्रकरण गंभीर आहे.या युद्धात खरंच अणूबॉम्ब वापरण्याची गरज होती काय ??? की अमेरिका ता देशाला त्याची युद्ध खुमखुमी भागवायची होती? नोबेल पारितोषिक विजेता व अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या माणसाची वास्तविकता काय होती?? मनात आणले असते तर सर्व नियम धाब्यावर बसवून हिटलरला हे युद्ध जिंकता आले असते काय??? या सर्व प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला गेलेला आहे.हे युद्ध पद्धतशिरपणे घडवून आणून इतका मोठा मानवी नरसंहार का केला गेला ? हे ज्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचवयास हवे.असं म्हणतात की युद्ध हे कोणत्याच समस्येवर उपाय नसते.पण ते आपल्या देशाच्या आणि वंशाच्या संरक्षणासाठी लढावेच लागते. हिटलर या असामान्य योध्याने व लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी ते लढून आपले कर्तव्य पार पाडले.
         मी काही समीक्षक नाही व तेवढी माझी पात्रता पण नाही. एक वाचक म्हणून मला जे वाटले ते मी येथे लिहिले आहे...खूप वर्षांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला मिळाले याबद्दल मी या पुस्तकाचे लेखक श्री पराग वैद्य सरांचे खूप खूप आभात मानतो. यासाठी त्यांनी जे शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण सहन केला आहे त्याला तोड नाही.लेखकाच्या मनोगतापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपणास लेखकांनी खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे आणि पुन्हा तोच विपर्यास केला गेलेला इतिहास आपल्या धारणांना हादरे देत जिवंत केला आहे. ज्या व्यक्तीवर आजवर हजारो पुस्तके लिहून त्याचं चारित्र्य हणन करण्यात धन्यता मानली गेली नेमकं त्याच प्रवाहाविरुद्ध बंड करून एका असामान्य योध्याला व राष्ट्रपुरुषाला न्याय देण्याचे धाडस या पुस्तकाचे लेखक मा. श्री पराग वैद्य सरांनी केले, त्याबद्दल मी स्वतः त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. नक्की वाचा....


“ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ”
लेखक - श्री पराग वैद्य
प्रकाशक - कॉन्टिनेंनटल प्रकाशन, पुणे
भ्रमणध्वनी - 9881493820
         

Saturday, 12 January 2019

We want Pension.....

Check out @kubde_ganesh’s Tweet: https://twitter.com/kubde_ganesh/status/1084005357335150593?s=09

Wednesday, 15 August 2018



देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

🙏🇮🇳🙏

Wednesday, 27 June 2018

प्रसारमाध्यमे आणि आमची राष्ट्रीय नकारात्मकता.....

       आपल्या भारतात यदाकदाचित यादवी अथवा गृहयुद्ध पेटलेच तर त्याला प्रत्यक्ष कोणताही धर्म जबाबदार असणार नाही. तर त्या भीषण परिस्थितीला फक्त आणि फक्त भारतीय प्रसारमाध्यमे जबाबदार असतील.यात आघाडीवर आहेत आपल्या बेजबाबदार वृत्तवाहिन्या आणि आपला आवडता सोशल मीडिया.वृत्तवाहिन्यांचे प्रशिक्षित?पत्रकार असोत वा सोशल मिडीयातील स्वयंघोषित एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला आपली अक्कल गहाण ठेवलेले विचारवंत;यांना एकाच रोगाने ग्रासले आहे ते म्हणजे हवी तितकी या देशाची बदनामी करणे व त्याबदल्यात मिळणारी विदेशी खिरापत लाटणे...
        मागील काही वर्षात एकंदरीत असेच चित्र रंगवले जात आहे की,भारत देशात काहीच ठीक नाही,प्रचारकी मिडिया दिवसरात्र फक्त आणि फक्त नकारात्मक व सनसनाटी बातम्या रंगविण्यात मग्न आहे.दिल्ली व दिल्ली NCR च्या बाहेर एक जग आहे हे यांच्या गावीही नसते.तामिळनाडू राज्यातील पालिपट्टी या छोट्याश्या गावातील रिफाथ शरूक या 18 वर्षीय मुलाने 2017 साली जगातील सर्वात वजनाने हलका ( 64 ग्रॅम) एक उपग्रह तयार केला.अमेरीकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने त्याच्या या कार्याची योग्य ती दखल घेतली.त्याची नोंद फक्त काही वृत्तपत्राने घेतली पण आपल्या स्वतःला नंबर 1 समजणाऱ्या कोणत्याही वृत्तवाहिनीने त्याची साधी दखलही घेतली नाही.संपूर्ण भारतीयांसाठी ही प्रेरणादायी बाब होती पण याचवेळी आमच्या तमाम वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपला राष्ट्रीय बालक तैमुरची शी धुण्यात व्यस्त होते.त्यांचेही बरोबर आहे म्हणायला हरकत नाही,कारण त्याची शी धुण्याचे यांना त्याच्या अब्बा आणि सुपर मॉमच्या PR कंपनीकडून योग्य ते अर्थकारण करण्यात येते.बिचारा रिफाथ पडला गरीब.
          India मध्ये एक दुर्लक्षित भारत वसतो हेच आजचे सत्य आहे.इंडियामध्ये सुपर मॉमची संकल्पना वेगळी आहे तर इकडे भारतात भर उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत आपल्या बाळाला पाळण्यात झोपवून आपल्या रक्ताचे पाणी करणारी माऊली अथवा विविध नौकरी करणाऱ्या स्त्रिया यांना सुपर मॉमचा दर्जा नसतो कारण यामागे ग्लॅमर नसतं.आदिवासींचे कुपोषण,त्यांची जीवन जगण्याची रोजची होरपळ,शैक्षणिक व सामाजिक सुविधांचा उडालेला बोजवारा याचे यांना कुठलेही भान नाही.काळजी आहे ती तैमुरच्या आईच्या वाढलेल्या वजनाची.त्यावर एक-एक तास चर्चा घडते आणि इकडे गरोदर माता कुपोषणामुळे मृत्यूला सामोरी जाते..नुकतेच एक पासपोर्ट प्रकरण माध्यमात गाजले.कुठलीही वस्तुस्थिती न जाणता आपल्या माध्यमांनी त्या सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवून देशात असहिष्णुता वाढत चालली आहे म्हणून ढोल बडवायला सुरुवात केली.दोन तीन दिवस गदारोळ माजला.आता सत्य जगासमोर आले आहे तो अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करत होता.आपला मीडिया तोंडघशी पडला...काही गरज नसताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले हसे करून घेतलेत ते वेगळे.
       सरकारी अधिकारीच हे भ्रष्टाचारी असतात आणि खोटी माहिती पुरविणारी जनता पिडित असते असेच चित्र रंगविण्यात आपले पत्रकार धन्यता मानतात.  देशात कोणता राजकारणी काय करतोय, कोण काय वादग्रस्त वक्तव्य करतोय, कुणी कुणाचा पाठिंबा काढला, कुणी कुणाला काय म्हटले, कोणत्या धर्माने काय केले, कोणत्या जातीच्या गटाने काय केले,एखाद्या पक्षाच्या तालुकाछाप उठवळ नेत्याने एखादे बिनडोक विधान केले की त्याचा सरळ राष्ट्रीय धोरणाशी जोडून त्यावर महाचर्चा घडवून आणली जाते,त्यात चर्चा कमी बौद्धिक दिवाळखोरी जास्त असते.नेमका तरुण वर्ग याच     पांचट पत्रकारितेला बळी जातो.एखाद्या पोरकट नेत्याने केलेले विधान गल्लीतून दिल्लीपर्यंत सफर करून शेवटी येथे कुठे तर आपल्या फेसबुक आणि व्हाट्स अपवर.तिकडे टी.व्ही.वर चर्चा करून तमाम बुद्धिजीवी झोपी गेले असताना आपला तरुण वर्ग आपआपल्या पक्षाचा किल्ला लढवितो.कधीकधी ही बिनबुडाची चर्चा इतकी विकोपाला जाते की वैयक्तिक सबंध खराब व्हायची वेळ येते.राजकारण्यांच्या मागे फिरणारे तरुण पाहिले की विचार येतो,काय होणार याचं? स्वतःच्या पॉकेटमणीतून वस्तीत स्वतःचेच फ्लेक्स लावणारा व आपले या या नेत्यांशी संबंध आहेत म्हणून फुशारक्या मारणारा तरुण नंतर नैराश्याच्या खाईत लोटला जातो.आपला मीडिया व राजकारणी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना त्यांच्या मुख्य ध्येयापासून परावृत्त करत आहे.कारण आपली अक्कल गहाण ठेवणे व गुलामी करणे हा आमचा आवडता छंद आहे.
           चार पाच दिवसापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे मुख्य संस्थापक बेझोस भारतात येऊन गेले.कशाला तर अजिंठा वेरूळ लेण्यांना दुसऱ्यांदा भेट द्यायला.तो त्यांचा खाजगी दौरा होता हे मान्य पण मीडियाने यावर चर्चा घेतली काय? त्यांची कार्यपद्धती तरुणासमोर आणण्याची गरज कुणालाही वाटली नाही.रतन टाटा,अंबानी,झुकेरबर्ग यांचा जीवनप्रवास कुठे दिसतो?नांव असतं का कुठे बातम्यांच्या एखाद्या कोपऱ्यात?……… तर नाही.आमचा मीडिया अजूनही मुन्नी आणि शिलातच गुंतून पडला आहे सोबतीला राष्ट्रीय बालक तैमु.आहेच.ह्या देशात फक्त खून,बलात्कार, चोऱ्या होतात असेच नाही पण ते कधीही दिसणार नाही आणि दाखविलेच तर 5 सेकंद यांना पुरेसे असतात.राजकारणत काही चांगले झाले तर ते न दाखविता यांना सांस- बहुच्या मालिका आठवतात.
        सगळेच राजकारणी अथवा राजकारण वाईट आहे असे म्हणता नाही येणार.देशाची प्रगती यांच्याच ध्येय धोरणावर अवलंबून असते.पण म्हणून तरुणांनी किती वेळ यामागे घालवावा हाही एक संशोधनाचा विषय आहे.एखादा राजकारणी आपले आयुष्य घडवेल अशी आशा करणेही चुकीचे आहे.जे करायचे ते आपल्यालाच करायचे आहे.हे जेवढे लवकर समजले तेवढे चांगले.कारण गेलेले आयुष्य परत येत नाही.एखादी महत्वाची चर्चा करायला आपल्याला वेळ नसतो.मित्राला एखादा कॉल करायला आम्हाला वेळ नाही पण राजकारणावर,धर्मावर,जातीवर बोलायला आम्हाला अखंड वेळ आहे... कारण चोवीस तास आमच्या मेंदूवर हेतुपुरस्सर याचाच मारा होतोय.देशात ना आरक्षण धोक्यात आहे ना ही कुठला धर्म संकटात आहे.कुठेही असहिष्णुता नाही आहे आणि कुणीही अराजक नाहीत.भारतीय राज्यघटना अगदी सुरक्षित आहे.तिचा मूळ गाभा अथवा संपूर्ण राज्यघटना पूर्णपणे सुरक्षित आहे.राज्यघटना हा काही कागदाचा चिटोरा नाही जो कुणीही येऊन बदलवून टाकेल अगदी कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी हे शक्य नाही.ही आपल्या नकरात्मक मीडियाने पसरविलेली एक एक अफवा आहे....
        त्यामुळे सर्वाना आपल्या जबाबदरीचे भान असणे आवश्यक आहे.

ता.क. अजूनही औरंगाबाद येथे रेल्वेखाली चिरडून मेलेल्या गरीब मजुरांचा धर्म मिडीयाला शोधता आला नाही हे आमचे नशीब. किंबहुना ते गरीब असावेत...

जय हिंद...

गणेश

Wednesday, 4 April 2018

होय आपला डेटा चोरी होतोय....

साधारण 10-12 दिवसा अगोदर मला  आर्थिक व्यवहार करणाऱ्या एका खाजगी कंपनीतून फोन आला.एक वर्षाअगोदार मी माझी आर्थिक गरज भागविण्याकरिता एका प्रतिष्ठित खाजगी बँकेतून वैयक्तिक कर्ज काढले होते.तेच कर्ज दुसऱ्या एका खाजगी बँकेत अत्यंत कमी व्याजदरात वळते करण्यासंबंधी तो फोन होता...सगळं बोलणं झाल्यावर मी त्या व्यक्तीला सहज विचारलं की,हे सगळं तुम्हाला कसं माहीत....त्यावर त्याची प्रतिक्रिया फारच भन्नाट होती.तो म्हणाला, “ हमारे पास सबकी जाणकारी होती है” त्याला माझ्या कर्जविषयक आणि वैयक्तिक सगळी माहिती होती.....सर्व बोलणं झाल्यावर मी सहज विचार केला की,माझं कर्ज आणि वैयक्तिक माहिती जर याला माहिती आहे, तर जी माहिती आपण हेतुपुरस्सर इकडे तिकडे शेअर करीत असतो त्याचं काय???
         आपण कुठे गेलो,काय जेवलो,कुणाला भेटलो ही इ.इ. माहिती आपण फेसबूकवर न चुकता पोस्ट करत असतो.नुकतीच फेसबुक ही कंपनी याच वादात ओढली गेली आणि संपूर्ण जगात याच चर्चेला उधाण आलं की, खरंच आपण आणि आपलं वैयक्तिक जीवन सुरक्षित आहे काय ??? फेसबुकने आपल्या युजर्सचा डेटा परस्पर एक दुसऱ्या कंपनीला विकला म्हणे....आपली कुठलीच गोष्ट तंत्रज्ञानाच्या या युगात खाजगी नाही आहे..मागे मी याच विषयावर एक ब्लॉग लिहिला होता त्याचा विषय होता “ आपला मेंदू हायजॅक झालाय " त्याची लिंक खाली पुनश्च एकदा देत आहे. शांत डोक्याने विचार केल्यास आपल्यावर सतत एका अनामिक गोष्टीचा भडिमार होतोय.नेमकं जे आपल्याला नको आहे तेच वारंवार आपल्या डोळ्यासमोर येते किंवा दाखविले जाते.आपल्या मित्राचा एखादा बूट अथवा मैत्रिणीची एखादी साडी आपण फेसबुक वर like अथवा शेअर केली रे केली की बघा त्याच गोष्टीची जाहिरात आपली वैयक्तिक फेसबुक वर झळकायला लागते.गुगलवर एखादी महागडी  वस्तू उदा. हिरा किंवा त्याचे दुकान शोधा आणि बघा नंतर आपल्यावर बरोबर नेमक्या त्याच जाहिरातीचा भडिमार सुरू होतो..हे सगळं चक्र कळत नकळत अव्याहत सुरू असते.
           फेसबुक,व्हाट्स अप,ट्विटर असो वा इन्स्टाग्राम यावर आपण शेअर केलेलं अथवा लिहिलेलं कधीच मिटत नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.इतक्यात एक नवं फिचर आलं आहे “ Delete for me” किंवा “Delete for everyone” ह्या दोन्ही सुविधा तात्पुरत्या आपल्या मनाला समाधान जरी देणाऱ्या असल्या तरी, आपण केलेली पोस्ट ही त्या त्या कंपनीच्या डेटा बँकेत ( सर्वर) अगदी चिरंतन जतन केली जाते.एखादा व्यक्ती सहा महिन्या अगोदर नेमक्या वेळी कुठे होता हे अगदी सहज सांगता येते.याच सोयीचा फायदा घेऊन पोलीस सहज एखाद्या गुन्ह्याचा तपास लावू शकतात..तुम्ही तुमचं अकाउंट बंद करा अथवा लॉग आऊट व्हा तुमची माहिती ही तुमच्या ह्या जगातून निरोप घेतल्यावरसुद्धा जतन करून ठेवली असते.साधं गुगल मॅप जरी उघडलं तरी आपण कुठे कुठे भेट दिली होती याची आपणास माहिती मिळते...
          आता महत्वाचा मुद्दा हा की,फेसबुकने आपली कुठली माहिती विकली अथवा चोरली..माफ करा चोरली असं म्हणता येणार नाही कारण भरपूर माहिती तर आपणच त्यांना दिली आहे...नियम व अटी न वाचता.(Terms & Conditions ). कुठलेही अँप्लिकेशन आपल्या फोन मध्ये घेताना जगातील 90% लोकं नियम व अटी वाचायला सरासरी फक्त 6 सेकंद वेळ देतात.यात माझा पण समावेश आहे.या सहा सेकंदात आपण काय वाचतो आणि सहमती कशी देतो हा संशोधनाचा विषय आहे.समजा भारतात 50 करोड लोक फेसबुक वापरत आहे तर फेसबुकला या सर्व लोकांचा वयोगट आधीच माहिती झालेला असतो.जन्म दिनांक आपणच नमूद केलेला असतो.कुठल्या वयोगट कोणत्या प्रकारच्या बाजारासाठी उपयुक्त ग्राहक बनू शकते याचा अभ्यास करणारी तज्ञ मंडळी तिकडे असतात.गुगल वर search करताना आपल्याला विविध जाहिराती येतात.तो हाच ग्राहक वर्ग तपासून.स्त्री - पुरुष असं वर्गीकरण सहज करता येतं(भारतात काही मुले मुलींच्या नावाने खोटे खाते उघडतात आणि भरपूर मुलांना गंडवितात हेही फेबू. ला माहिती आहे).आपलं लग्न,पत्नी,मुलबाळ,बहीण,भाऊ,याचीही माहिती त्यांना आहेच.आपला धर्म तर आपणच ओरडून सांगत असतो.भलेही मग आपण जाती अंताची लढाई लढणारे लढवय्ये कार्यकर्ते असू देत.तुम्ही कोणत्या राजकीय विचारसरणीचे आहात हेही सहज सांगता येते.(येथे तुम्ही राजकीय पोस्ट करणे अपेक्षित नाही.) तुमच्या आवडी निवडी,तुमचे मित्र मैत्रिणी त्यांचे वाढदिवस त्यांच्या विचारधारा इ.इ.सगळं फेसबुकला माहिती आहे.तुमचं relationship status म्हणजे तेच Married, Unmarried,Single,in a Relationship अथवा काही लोकं in a Complicated relationship मध्ये पण असतात.हा जो शेवटचा प्रकार आपल्या डोक्याच्या बाहेर असला तरी फेबूला हे सगळं समजतं..याचा विविध स्तरावर योग्य अभ्यास केला जातो..
            आता खरा खेळ येथूनच सुरू होतो,तुमचा वयोगट,तुमचा धर्म,लिंग,भाषा,जात,प्रांत,मित्र मैत्रिणी,आवडीनिवडी,तुमचे राजकीय विचार(ज्याला वाटतं की आपल्याला राजकारणात काडीचाही रस नाही,त्याला पण राजकीय मते असतातच.) ही सगळी माहिती फेबु.अथवा सारे  एकत्रित करतात.त्याचं विश्लेषण करून मग एखाद्या कंपनीला ती माहिती पुरविली जाते.कंपनी त्या माहितीचा उपयोग मग चातुर्याने करून घेते...निवडणुका आल्या की,तुमच्या मोबाईलवर त्यांना जसे हवे त्या त्या कौलाच्या बातम्या,फोटो अथवा इतर भडकविणाऱ्या पोस्ट टाकल्या जातात.सततचा भडीमार बघून हळूहळू आपला कौल आणि त्यांचा कौल जुळू लागतात.त्यांचे इप्सित साध्य होते.लिबियातील गद्दाफी शासनाविरुद्ध मागे सफल झालेली  मोहीम हे याचे उत्तम उदाहरण म्हणून देता येईल (आपल्या देशात भरपूर उदाहरणे आहेत पण लिहीत नाही.लोकं आपली सोय बघून गोटे मारतात).हाच सोशल मीडिया एक दिवस भारतात गृहयुद्ध घडवून आणणार हे नक्की.त्याची सुरुवात झालेली आहे.
            शांत चित्ताने विचार केल्यास आपण या सगळ्या प्रकाराला अगदी नकळत बळी पडतच आहोत.तुम्ही आपल्या आप्तेष्टांपासून कुठलीही गोष्ट लपवू शकता पण समाज माध्यमापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. तुमचं नाव हरिभाऊ ठक आहे आणि तुमचं फेसबुक खाते Harry या नावाने असेल तुम्ही मा.भालचंद्र नेमाडे लिखीत “कोसला” हे पुस्तक वाचताना सनी बाईंचा dp जरी लावला तरी तरी फेसबुकला माहिती असतेच की “ गंगाधर ही शक्तिमान है ” राहिली गोष्ट आपल्या आचार विचारांची ते तर कुणी आपल्याला डिवचले की लवकरच कळतात...एखाद्या वेळेला सार्वजनिक रस्ता साफ करताना हातात झाडू घेऊन एखादा फोटो फेसबूकवर टाकल्यास Analytics तुम्हाला समाजसेवक समजतील या भ्रमात पण कुणी राहू नये....(समाजसेवक म्हणून प्रतिमा निर्माण करण्याच्या भारतात नियम व शर्ती वेगळ्या आहेत) कारण प्रत्येकाची विचार करण्याची आणि अभ्यास करण्याची पद्धती वेगवेगळी असते...आपण घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी ही होणारच कारण
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात.सोशल मीडिया वापरा तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण विवेकाने...आणि हो नुसतंच @ आग्रा ताजमहाल,with my hubby किंवा with my love अश्या पोस्ट टाकून मित्रांकडून लाईकचे👍👍👍👍👍मिळविण्यापेक्षा किंवा तशी अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्यासाठी एखादा पेठयाचा तुकडा आणा आणि मग बघा फेबूच्या त्या अंगठयापेक्षा मित्र मैत्रिणीचे सुखद हास्य आपल्या आयुष्यात काय गोडवा आणते ते.....

टीप :-दिवसातून किती वेळा फेसबूकवर स्टेटस  अपडेट करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे व मी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो.
धन्यवाद.

---गणेश

आपला मेंदू हायजॅक झालाय.... http://mazemanogat1.blogspot.com/2018/02/blog-post.html