शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना!!! की काय हे,काहीही ??? आपला मेंदू हायजॅक झालाय.म्हणजे नक्की काय हो...? होय सत्य आहे वरील विधान.आपल्या विचारशक्तिवर कुणीतरी दुसऱ्यानेच ताबा मिळवलाय.अगदी काही अपवाद वगळता आपण वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात जे वर्तन करतोय त्याला आपण नसून दुसरं कुणीतरीच जबाबदार आहे आणि हे सगळं नकळत होत आहे. कप्पेबंद संकुचित विचारसरणीचा पायाच, आपल्यापेक्षा किंचितही वेगळ्या विचारसरणीची व्यक्ती ही कप्पेबंद संकुचित विचारसरणीची असल्याचा समज करून घेण्यात असतो. सत्य आणि असत्य यामध्ये जी दरी असते;ती दरी आपल्या मान्यतेची असते.हेच बघा ना काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मध्येपण एक छटा असते पण आपण भांडतो ते फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगासाठी.त्याचवेळी राखाडी रंग आपली मजा बघत असतो.दोन रंगाच्या फरकातच आपलं विश्व आपण गुंडाळून ठेवतो.या दोन ध्रुवातच आपण आपलं जग वाटून घेतो...आपल्या विचारांपेक्षा दुसरा एक विचार असू शकतो हे आपण मान्यच करत नाही...किंबहुना आपली जडनघडचं तशी झालेली असते आणि मग आपण आपल्या ध्रुवावर अढळ होऊन बसतो.आपण चांगले इतर वाईट, म्हणून आपल्याला कळलेलं, आपल्या समाजाचं सत्य हेच 'खरं' सत्य, अशी आपली भूमिका असते.आपल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका असू शकते हे आपण मान्यच करायला तयार नसतो.व्यक्तिनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, भूमिकानिरपेक्ष सत्य असं काही नसतंच. सर्वच सत्य हा विश्वासाचा मामला आहे.माझा विश्वास आणि दृष्टिकोन खरा; इतरांचा तो खोटा.म्हणून मीच खरा इतर सगळं खोटं असं का ??? कारण ते आमच्याविरुद्ध आहेत.सत्याकडून असत्याकडे प्रवास करताना आपण मधली रंगछटा हेतुपुरस्सर टाळतो.कृष्णाने अर्जुनाला उपदेश देताना सांगितलं होतं की,शत्रूवर प्रेम नको करुस युद्ध कर. त्यावेळी शत्रू कोण आहेत हे आधीच ठरलेलं होतं... महर्षी व्यासांनी सर्व व्यक्तिरेखांना न्याय देतांना मात्र पांडव वनवासात असताना इकडे हस्तिनापुरातील राजकीय व सामाजिक जीवनावर फार कमी प्रकाश टाकला आहे. व्यासाला अर्थातच या काळ्या-पांढऱ्यामधल्याची जाण होती. पण त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांना, 'आपलाच पक्ष सत्याचा' असं वाटत होतं. त्यामुळे शत्रू कोण तर 'जे आपल्याविरुद्ध उभे राहतात ते,' इतकं सोपं होतं.त्यामुळे एकदा शत्रू निश्चित झाला की त्यावर तुटून पडणे हेच आपले कर्तव्य आहे असे आपण समजतो.आपल्या समाजाचं सत्य तेच आपलं सत्य असा भरपूर लोकांचा विश्वास असतो.पण त्या विश्वासाचा फायदा घेत काही क्षुद्र मंडळी निव्वळ भावना भडकविण्याचे उद्योग करत असतात.विश्वासाचा फायदा घेऊन त्याचा उद्रेक ज्याला करता येतो तोच खरा राजकारणी,असंख्य लोकांच्या भावनेला ज्याला हात घालता येतो तो खरा नेता.थोडक्यात समाजात जगताना आपण एकच भावना घेऊन जगत असतो ,'मी विरुद्ध ते'...ह्याच भावनेमुळे मानवी समाजाचं ध्रुवीकरण फार वेगाने झालंय आणि होत आहे.
सत्य हे व्यक्तीनिरपेक्ष असतं हे मान्य करणे हेच एक मोठे आव्हान आहे.परके म्हणजे शत्रू आणि आमचं खरं,त्यांचं खोटं ही भावना वाढीस लागणे ही सामाजिक अधोगती आहे.आपण फेसबुक आणि व्हाट्स अप वर जेवढी भाऊबंदकी अथवा मैत्री जपतो तेवढी खऱ्या आयुष्यात जपतो काय ???सोशल मीडिया आपल्याला भावतो कारण तेथे आपल्या अस्मितांना सुखावणारी तेवढी सत्यं मांडता येतात, वाचता येतात. घरबसल्या आपण एकदम सामाजिक प्राणी झाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो.online भ्रामक जगात जर कुणी आपला विरोध केला की,मग आपण त्याला झोडपायला तयारच असतो. पुन्हा आपण सोयीस्कर वागायला मोकळे.स्वनिर्मित सत्याचं हवं तसं मिथक विणता येतं.मग त्या मिथकावर स्वार होऊन आपल्याला आपलं इप्सित साध्य करता येतं.आपण केलेल्या चुकांच योग्य ते निदान लावण्याऐवजी दुसरे कसे चुकले याचा शोध घेण्यातच आपण आपला वेळ व ऊर्जा घालवीत असतो.आपलं सत्य आपण आपल्या सोयीनुसार ठरवत असतो.आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला तसे करण्यास भाग पाडते.दैनंदिन जीवनात आपला बहुतांश वेळ हा केवळ दुसऱ्यांच्या शंकाचे समाधान करण्यात जातो अथवा बाह्य गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात जातो.आपल्या विचारावर कृती करण्यासच आपल्याला वेळ नसतो.सोशल मीडियावर आपण ज्या राजकीय अथवा सामाजिक पोस्ट फिरवत असतो त्या पोस्टचा आपण किती अभ्यास केलेला असतो??? की न करताच आपल्याजवळ आलेला कचरा आपण दुसरीकडे टाकून मोकळे होतो....एखाद्या धर्मावर अथवा एखाद्या महापुरुषावर आक्षेपार्ह टिका टिप्पणी करताना आपण कितीसा विचार केलेला असतो ??? म्हणजे इकडून तिकडून हेतुपुरस्सर जो आपल्यावर अविचारी व निंदनीय गोष्टींचा भडीमार होत आहे त्याला आपण नेमकं बळी पडत आहोत आणि नेमकं याच गोष्टीमुळे समाजात दरी वाढत आहे...सोशल मिडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टचा डेटा anyalisis (माहिती पृथकरण) केलं जातं आणि जे आपल्याला हवं अथवा जे आपल्या मनावर बिंबावायचं आहे नेमकं त्याचाच आपल्या मेंदूवर आघात केला जातो..आणि नेमकं हेच घडत आहे.येणाऱ्या काळात हीच (Strategy)आपल्या देशात गृहयुद्ध भडकवणार हे नक्की....
क्रमश:……………
गणेश तु.कुबडे.